पाकिस्तानी पंतप्रधानांनी मांडला भारतासोबत संवादाचा प्रस्ताव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

 

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत सर्व प्रलंबित मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. मंगळवारी (२४ जून) सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याशी दूरध्वनी संभाषणात त्यांनी ही भूमिका मांडली. ‘रेडिओ पाकिस्तान’ने दिलेल्या वृत्तानुसार, शरीफ यांनी या संभाषणात सांगितले की, “आम्ही जम्मू आणि काश्मीरसह पाणी, व्यापार आणि दहशतवाद या मुद्द्यांवर भारताशी अर्थपूर्ण चर्चा करण्यास तयार आहोत.” 

हा संवाद पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन महिन्यांनी झाला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार स्थगित केला तसेच पाकिस्तानबरोबरचा सर्व व्यापार थांबवला. त्याशिवाय ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. दोन्ही देशांदरम्यान चार दिवस तीव्र लष्करी संघर्ष झाल्यानंतर १० मे रोजी शस्त्रसंधी जाहीर होऊन ही लष्करी कारवाई थांबवण्यात आली.

भारताबरोबरच्या संघर्षादरम्यान सौदी अरेबियाने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल शरीफ यांनी कृतज्ञता व्यक्त केली असेही ‘रेडिओ पाकिस्तान’ने आपल्या वृत्तामध्ये नमूद केले आहे. यापूर्वी इराण आणि अझरबैजानच्या दौऱ्यावर असताना शरीफ यांनी भारताबरोबर याच मुद्द्यांवर शांतता चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पाकव्याप्त काश्मीर परत करणे आणि दहशतवाद थांबवणे याच मुद्द्यांवर पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते असे भारताने स्पष्ट केले आहे.