उर्दू शायरीतून होणारे नेहरू दर्शन!

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 1 Years ago
१९४९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका उर्दू मुशायऱ्यात जवाहरलाल नेहरू. सोबत शायर जोश मलिहाबादी
१९४९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका उर्दू मुशायऱ्यात जवाहरलाल नेहरू. सोबत शायर जोश मलिहाबादी

 

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज ५९वा स्मृतीदिन. नेहरू स्वतः उत्कृष्ठ लेखक तर होतेच पण तत्कालीन हिंदू उर्दू साहित्यिकांशी त्यांचे उत्तम संबंध होते. नेहरूंच्या निधनानंतर साहजिकच साहित्यविश्वात एक पोकळी निर्माण झाली होती. त्यावेळी साहित्यिकांनी आपापल्या पद्धतीने नेहरूंना श्रद्धांजली वाहिली होती. उर्दूतील प्रसिद्ध शायर मंडळींनी आपल्या शायरीद्वारे नेहरूंना 'खिराज ए अकीदत' (श्रद्धांजली) पेश केली. 'उर्दू शायरीमध्ये नेहरू' याचा आढावा घेतला आहे ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी. साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हा संपादित भाग खास 'आवाज मराठी'च्या वाचकांसाठी.    
 
- संपादक
         
ज्ञानपीठ विजेते आली सरदार जाफरी हे पण उर्दूचे प्रगतीशील लेखक चळवळीतील महत्त्वाचे शायर व प्रगतीशील लेखक चळवळीच्या साहित्याची सैद्धांतिक समीक्षा करणारे समीक्षक. ते स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट पक्षावर बंदी असताना पक्षाच्या वतीने प्रगतीशील साहित्य संमेलन भिवंडीला आयोजित केलं होतं, म्हणून मुंबई प्रांतात मोरारजी देसाईंच्या काँग्रेस सरकारनं त्यांना तुरुंगात टाकलं होतं. (कैफीवर पण त्यासाठी वॉरंट निघालं होतं, पण ते भूमिगत झाले म्हणून त्याची जेल वाचली.) त्या वेळी नेहरू देशाचे पंतप्रधान होते. तरीही त्यांच्यावरील जाफरीचं प्रेम हा अन्याय होऊनही कायम होतं. त्यांच्या निधनानंतर जाफरींनी ‘रहबर की मौत’ (नेत्याचा मृत्यू) आणि ‘संदल-ओ-गुलाब की राख’ (चंदन व गुलाबाची राख) अशा दोन भावपूर्ण कविता लिहिल्या होत्या.  

२७ मे हा पंडित नेहरूंचा स्मृतिदिन! १९४७ मध्ये फाळणी पश्चात स्वतंत्र झालेल्या भारताची अवस्था काय होती? दंगे, खूनखराबा व लाखोंचं स्थलांतर... माणुसकी जणू मृत झाली आहे की काय असं वाटावं अशी सार्वत्रिक स्थिती होती. पण देशाच्या त्या अत्यंत नाजुक तणावाच्या, द्वेष आणि हिंसेच्या काळात एक राष्ट्रनेता होता, ज्यानं देशाला नवी उमेद दिली. माणुसकी जागवली आणि संकटातून- आपत्तीतून देशाला सावरलं, प्रगतीपथावर नेलं. नवा आधुनिक भारत घडवला. त्या राष्ट्रनेत्याचं नाव होतं- पंडित जवाहरलाल नेहरू. 

नेहरूजींचं आज मी स्मरण करणार आहे उर्दू काव्यातून. जे मुस्लिम मानस देशाच्या फाळणीला आणि दंग्याधोप्यासाठी नेहरूंना जबाबदार धरत होते, त्याच मुस्लिम समाजाचे कवी-कलावंत नेहरूंना मानवतेचे पुजारी, समाजवाद आणि सेक्युलॅरिझमचे रखवाले आणि आधुनिक भारताचे शिल्पकार मानत होते! हे सारे प्रमुख नावाजलेले उर्दू शायर हे प्रामुख्याने प्रगतीशील लेखक चळवळ (प्रोग्रेसिव्ह रायटर्स मूव्हमेंट) आणि इप्टा (भारतीय जन नाट्य मंच) शी संबंधीत होते. ते एक तर कार्डहोल्डर पक्के मार्क्सवादी कम्युनिस्ट होते किंवा त्यांचे वैचारिक सहप्रवासी होते. 

नेहरूंच्या हयातीत हे उर्दू शायर (जे हिंदी सिनेमाच्या सुवर्ण संगीत युगाचे बिनीचे लोकप्रिय गीतकारही होते.) पंडित नेहरूंच्या समाजवादी विचारांचा, सेक्युलर आचरणांचा आणि आधुनिक विज्ञाननिष्ठेचा काव्यातून प्रसार करत होते. त्यातून सामान्य भारतीयांना वाटणाऱ्या आशा-आकांक्षा प्रगट करीत होते. व नेहरूंकडून समताधिष्ठित समाजाची अपेक्षा करत होते. जेव्हा २७ मे १९६४ ला जेव्हा त्यांचे हृदय विकारानं निधन झालं, तेव्हा अर्धा डझन शायरांनी शोकगीतं लिहिली. तो केवळ भावनाविवशतेचा आविष्कार नव्हता, तर तो नेहरूंचं मोठेपण, कर्तृत्व आणि त्याही पेक्षा भारत नामक संकल्पनेचा, जी समाजवादी, सेक्युलर, सर्वसमावेशक व आधुनिक विज्ञाननिष्ठ होती, त्या साऱ्यांचा सार्थ आणि समर्थ अशा उद्‌घोषकाचा व कृतिशील नेतृत्वाचा तो उत्स्फूर्त शायराना आविष्कार होता! आज पन्नास-पंचावन्न वर्षांनंतरही पंडित नेहरूंवरच्या उर्दू कविता, नज्म आणि फिल्मी गीतं कालबाह्य आणि शिळी झाली नाहीत, उलट त्यांची सत्यता आणि मौलिकता आजच्या विखारी-खंडित कालखंडात अधिक प्रासंगिक आणि औचित्यपूर्ण वाटते! त्यामुळे आज पंडित नेहरूंचं स्फूर्तिदायक व मानवता जागवणारं पुण्यस्मरण उर्दू शायरी व फिल्मी गीतांद्वारे करू या. 

कैफी आझमींनी ‘नेहरू’ या शीर्षकाची कविता त्यांच्या निधनानंतर दोनच दिवसांत लिहिली, त्यात त्यांनी नेहरूंचं विवेकीपण एकाकी राहिलेले व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा सेक्युलॅरिझम अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केला आहे. कारण कैफीचं नेहरूंवर मतभेद असूनही डोळस प्रेम होतं. काँग्रेस पक्षातला हा एकच नेता खऱ्या अर्थाने भारतात समाजवाद, विवेकनिष्ठा आणि सेक्युलॅरिझम रुजवू शकतो, हे त्याचं अनुभवसिद्ध मत होतं. सदर कवितेची ही प्रभावी सुरुवात पाहा. 

‘मैने तनहा कभी उसको देखा नहीं 
फिर भी जब उसको देखा तो तनहा मिला 
जैसे सहरा में चश्मा कहीं 
या समंदर में मीनरे-नूर 
या कोई फिक्र औहाम में 
फिक्र सदियों अकेली-अकेली रही 
ज़ेहन सदियों अकेला-अकेला मिला 
और अकेला-अकेला भटकता रहा 
हर नये हर पुराने ज़माने में वो’

(मी त्याला एकटं कधी पाहिलं नाही, पण जेव्हा कधी पाहिलं, मला एकटा दिसला, वाळवंटात कुठे तरी झऱ्याप्रमाणे, समुद्रात दीपगृहाप्रमाणे, अंधविश्वासामध्ये विचाराप्रमाणे, शतकानुशतके विचार एकटाच राहिला आहे, शतकानुशतके विवेक एकटाच राहिला आहे.)

या ओळींद्वारे नेहरूंचं आंतरिक व्यक्तिमत्त्व जितकं अचूक प्रगट होतं, तेवढीच त्यांच्याबद्दल वाटणारी दर्दभरी आत्मियताही उजागर होते. नेहरूंची स्वप्नदर्शिता, त्यांचं ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांचं शोधक मनाचं कवितेत मिथकाचा वापर करून झालेलं स्नेहल चित्रण फारच क्वचित इतरांच्या लेखनात सापडेल. पुढे कैफी नेहरूंची विचारधारा- धर्मनिरपेक्षता धार्मिक प्रतीके वापरून किती अचूकपणे करतात ते पाहा -

‘जिन तकाज़ों मे उसको दिया था जनम 
उनकी आगोश में फिर समाया न वो 
खून मे वेद गूँजे हुए 
और जर्बी पर फुरोंजाँ अज़ाँ 
और सीने पर रक्साँ सलीब 
बे-झिझक सब के काबू मे आता गया 
और किसी के भी काबू में आया न वो’ 

(ज्या नियतीनं त्याला जन्म दिला होता, तिच्या मिठीत तो पुन्हा कधी परतला नाही, त्याच्या रक्तात वेदवाणी घुमत होती, त्याच्या माथ्यावर ‘अजाँ’ प्रकाशला होता, आणि छातीवर क्रूर नाचला होता, तो विनासंकोच सर्वांच्या प्रभावात आला, पण कुणाच्याही प्रभावाखाली नाही आला) 

सेक्युलॅरिझमची ही नेहरूप्रणित सर्वश्रेष्ठ अशी काव्यमय व्याख्या आहे! 

कैफी आझमीची ‘बांगला देश’नामक दुसरी एक नज्म आहे, त्यातील ओळी व्यक्तित्वाचा आणि विचारांचा प्रभावी आविष्कार आहे, असे मी मानतो. पंडित नेहरूंसारखे महामानव देशनायक नकाशामध्ये कागदांच्या तुकड्यात नसतात, तर ते दबलेल्या, पिचलेल्या गरिबांच्या स्वप्नात निवास करीत असतात, हे कैफी असं कथन करतात. 

‘ये जो दुनिया का पुराना नक्शा 
मेज़ पर तुमने बिछा रक्खा है 
इस में कावाक लकिरों कें सिवा कुछ भी नहीं 
तुम मुझे इसमें कहाँ ढूँढ़तो हो? 
मैं इक अरमान हूँ दीवानों का 
सख्त-जाँ ख्वाब हूँ कुचले हुए इन्सानों का 
लूट जब हद में सिवा होती है 
जुल्म जब हद से गुज़र जाता है  
मैं अचानक किती कोने में नज़र आता हूँ 
किसी सीने से उभर आता हूँ’ 

(हा जो जगाचा कालबाह्य नकाशा आहे, जो तुम्ही टेबलावर पसरून ठेवला आहे, तो म्हणजे निरर्थक रेघांखेरीज काही नाही, तुम्ही यात मला कुठे हुडकता? मी वेड्या माणसांची इच्छा आहे, पायदळी तुडविल्या गेलेल्यांचं अमर स्वप्न आहे, जेव्हा शोषण अधिक होतं, जेंव्हा अन्याय साऱ्या सीमा पार करतं, मी अचानक कुठल्या तरी कोपऱ्यात दिसू लागतो, कुणाच्या हृदयात उमलून येतो!) 

दुसरा पुरोगामी क्रांतिकारी उर्दू शायर साहिर लुधियानवी यांची पण एक अर्थपूर्ण नज्म आहे, ‘जिस्म की मौत कोई मौत नही होती’ त्यात त्यांनी नेहरूंच्या मानवतावाद, सेक्युलॅरिझम आणि समतावादी समाज स्थापनेसाठी कैफी आझमीं आणि साहिर लुधियानवी केलेल्या कामाची सार्थ तारीफ केलेली आहे, ती वाचकांच्या हृदयाचा वेध घेते

‘वो जो हर दीन से मुन्किर था, हर इक धर्म से दूर 
फिर भी हर दीन, हर इक धर्म का गम-ख्वार रहा 
जिसने इन्सानों की तकसीम के सदमें झेले 
फिर भी इन्साँ की उख़ुव्वत का परस्तार रहा 
जिसकी नजरों में था इक आलमी-तहजिब का ख्वाब 
जिसका हर सांस नए अहद का मेअमार रहा’ 

(जो कोणताच धर्म मानत नव्हता, तो सर्वधर्मापासून दूर होता, तरीही प्रत्येक धर्म-पंथाबाबत सहानुभूती बाळगत होता, ज्यानं माणसाच्या विभाजनाचे दु:ख झेलले, तरीही माणसाच्या भ्रातभावाचा पुजारी राहिला, ज्याच्या नजरेत जगाच्या सभ्यतेचे एक स्वप्न होतं, ज्याचा प्रत्येक श्वास नव्या जगाच्या निर्माणासाठी होता.) 

आणि नेहरूंच्या विचारांचा वारसा जपत आपण भारतवासियांनी वाटचाल केली पाहिजे, असं सांगत साहिर नेहरू निधनाचं व्याकूळ झालेल्या देशवासीयांना संदेश देताना म्हणतात, 

‘जो तुम्हे जादए-मंझिल का पता देता है 
अपनी पेशानी पे वो नक्शे-कदम ले के चलो 
दामने-वक्त पे अब खून के छींटे न पडे 
एक मर्कज की तरफ दैरो-हरम ले के चलो 
हम मिटा डालेंगे सरमाया-ओ-मेहनत का तजाद 
ये अकिदा, ये इरादा, ये कसम ले के चलो 
वो जो हमराज रहा, हाजिरो-मुस्तकबिल का 
उसके ‘वाबों की खुशी, रूह का गम लेके चलो!’ 

(जो तुम्हाला रस्ता व मुक्कामाचा पत्ता सांगतो, त्याचे पदचिन्ह आपल्या मस्तकी ठेवून चालू या, काळाच्या पदरावर आता रक्ताचे थेंब पडू नयेत, आपण आपल्या मंदिरासह एका निश्चित केंद्राकडे गमन करू या, मिटवून टाकू आपण भांडवलदार व कामगारांचे वाद, असा निश्चय व विश्वास घेऊन मार्गक्रमण करू या, जो आपल्या वर्तमान-भविष्याचा विश्वासपात्र आहे, त्याच्या स्वप्नांचा आनंद, त्याच्या आत्म्याचं दु:ख होऊन वाटचाल करू या.) 

सर्वच प्रगतीशील लेखकांप्रमाणे पंडित नेहरूंनी खरा समाजवाद भारतात साकार केला नाही, म्हणून साहिरचा पण मोहभंग झालेला होता; तरीही नेहरू हेच काँग्रेस पक्षामधील भारताच्या गरिबांचे, शेतकरी-कामगारांचे व सेक्युलॅरिझम आणि गंगाजमनी तहजीबचे एकमेव कट्टर पुरस्कर्ते आहेत, याचंही साहिरांना भान होतं, जाण होती, म्हणून नेहरूंचं निधन चटका लावून गेलं होतं! 

ज्ञानपीठ विजेते अली सरदार जाफरी हे पण उर्दूचे प्रगतीशील लेखक चळवळीतील महत्त्वाचे शायर व प्रगतीशील लेखक चळवळीच्या साहित्याची सैद्धांतिक समीक्षा करणारे समीक्षक. ते स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट पक्षावर बंदी असताना पक्षाच्या वतीने प्रगतीशील साहित्य संमेलन भिवंडीला आयोजित केलं होतं, म्हणून मुंबई प्रांतात मोरारजी देसाईंच्या काँग्रेस सरकारनं त्यांना तुरुंगात टाकलं होतं. (कैफीवर पण त्यासाठी वॉरंट निघालं होतं, पण ते भूमिगत झाले म्हणून त्याची जेल वाचली.) त्या वेळी नेहरू देशाचे पंतप्रधान होते. तरीही त्यांच्यावरील जाफरीचं प्रेम हा अन्याय होऊनही कायम होतं. त्यांच्या निधनानंतर जाफरींनी ‘रहबर की मौत’ (नेत्याचा मृत्यू) आणि ‘संदल-ओ-गुलाब की राख’ (चंदन व गुलाबाची राख) अशा दोन भावपूर्ण कविता लिहिल्या होत्या. नेहरू नेहमी जोधपुरी कोटाच्या बटनहोलमध्ये गुलाब लावायचे व त्यांचा देह चंदनाच्या चितेवर भस्मसात झाला होता, विमानानं त्यांची राख देशभरात शेता-वनात विखुरण्यात आली होती, त्याचा निर्देश करणारी ‘संदल-ओ-गुलाब की राख’ ही कविता आहे. 

‘रहबर की मौत’मध्ये जाफरी लिहितात, ‘वह वतन की आबरू, अहले वतन का इफ्तिकार महफिल-ए-इन्सान मे इन्सानियत का ताजदार’ 

(तो देशाची इभ्रत आणि देशवासियांचा अभिमान, माणसाच्या मैफिलीतला माणुसकीचा बादशहा) 

जाफरींच्या मते नेहरुंचा देह नष्ट झाला, पण त्यांचे विचार व कल्पना देशासाठी निरंतर मार्गदर्शक आहेत, म्हणून पुढे त्यांनी सदर कवितेत लिहिलं आहे, 

‘अब हमारी आँख मे है उस की बंद आँखो का नूर अब हमारे जिस्म मे है उस की रूह-इ-बेकरार उसका परचम ले के मैदान मे निकलना है हमे फर्श-इ-गुल से दूर अंगारो मे चलना है हमे’ 

(आता आमच्या डोळ्यांत त्यांच्या बंद नजरेतली स्वप्ने आहेत, आता आमच्या देहात त्याचा बेचैन आत्मा वास करतो आहे, त्याचा ध्वज घेऊन आता आम्हाला मैदानात उतरलं पाहिजे, फुलांच्या पायघड्या नाही तर आगीवरून चाललं पाहिजे)  जाफरनी नेहरूंचा समाजवाद आणि सर्वधर्मसमभाव ‘संदल-ओ-गुलाब की राख’मध्ये कैफीप्रमाणेच अत्यंत भावूकतेनं तरीही सार्थपणे असा वर्णिला आहे. 

‘सुना है जिसकी चिता से ये इक खाक आयी है 
वो फस्ले गुल का पयंबर था अहद-ए-नौ का रसूल 
वो बरहमन के जिसे मस्जिदों ने प्यार किया 
वह बुत-शिकन के जो बज्म-ए-बुलन मे था मकबूल’

(ऐकलं आहे की ही राख आली आहे, वसंताचा संदेश आणि नव व्यवस्थेच्या निर्मात्या प्रेषिताची, तो ब्राह्मण पंडित होता ज्याच्यावर मशिदींनी प्रेम केलं, मूर्तीभंजकासाठी पण तो मूर्ती-पूजक आदरास पात्र होता) वकार अंबवी हे फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेले शायर. त्यांनी नेहरूंचं 1964 मध्ये जे स्मरण केलं आहे, त्यावरून पाकिस्तानच्या सामान्य मुस्लिमांच्या मनातली भावना प्रकट झाली आहे. 

‘कुछ दूर तो हम भी साथ चले उसे बाँके तिखें हिरो के 
लेकिन जब हम साथ बिछडे तब भी वो इक रहबर था 
स्वराज से बरसो पहले हर दिल पर उसका राज रहा 
स्वराज भी उसके भाग से था’ 

पाकिस्तानच्या मुस्लिमांना अखंड भारतात स्वातंत्र्यलढा चालू असताना, नेहरूंचा त्यातला सहभाग स्मरत होता, त्यांनाही तो आपला नेता वाटत होता व भारताचं स्वराज्य नेहरूंमुळेच आलं होतं, असं वाटायचं. पाकिस्तानी मुस्लिमांच्या प्रातिनिधिक भावनांना या कवितेद्वारे वकार अंबवींनी उजागर केलं आहे. 

रशिद सिद्दीकींनी लिहिलं आहे. 

‘बादे इश्क से जब बाद-ए-सबा आयेगी 
दिल-ए-नेहरू के धडकने की सदा आयेगी’ 

(वेड्या प्रेमातून जेव्हा पहाटेच्या वाऱ्याची झुळूक येईल, मनातून नेहरूंच्या हृदयाचे ठोके निरंतर ऐकू येतील.)

राफत सरोश शायराच्या या ‘जवाहर ज्योती’ नज्ममधल्या दोन ओळी पाहा. 

‘शोला-ए-अम्न-ओ-मुहब्बत है जवाहर ज्योती 
इस की लौ है के तबस्सुम है लब-ए-नेहरू का’ 

(शांती व प्रेमाची ज्वाला आहे जवाहर ज्योती हा प्रकाश आहे की नेहरूच्या ओठावरचं स्मित?) 

१९५० ते ६० च्या दशकात नेहरू प्रणित भारत नामक संकल्पनेच्या विविध पैलूंचं दर्शन कधी कथेतून (उदाहरणार्थ- राज कपूरचे ‘बूट पॉलिश’, ‘जागते रहो’, ‘आवारा’ इत्यादी.) तर बहुसंख्य वेळा गीतातून प्रगट झाले आहेत. साहिरची ‘साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना’, ‘वो सुबह कभी तो आयेगी’ किंवा ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ ही गीतं नेहरूंच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारी आहेत. कैफी आझमीचं नेहरूंचं ‘मेरी आवाज सुनो’ हे गीत सर्वाधिक उल्लेखनीय आहे. त्यात नेहरूंचं निर्वाणानंतरच देशवासीयांप्रतीचं स्वगत आहे. 

‘मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो 
क्यूं सजाई है ये चंदन की चिता मेरे लिए 
मैं कोई जिस्म नही हूं के जला दोगे मुझे 
राख के साथ बिखर जाऊंगा मैं दुनिया में 
तुम जहाँ खाओगे ठोकर वही पाओगे मुझे’ 

भारतातल्या गरिबांना जेव्हा व जिथे ठोकर बसेल, तिथं तिथं नेहरू असतील ही कैफीची कविकल्पना नेहरूंची गरिबांबद्दलची संवेदना व समताधिष्ठित समाजरचनेची आस्था सार्थपणे प्रकट करणारी आहे. 

पण नेहरू युगाचं व त्यांच्या आधुनिक पुरोगामी, विज्ञाननिष्ठ व भविष्यवेधी विचार व कामाचं समग्र आणि प्रभावी वर्णन जर कुणी एकाच गीतातून केल असेल तर ते प्रेमधवन यांनी. ते उद्‌धृत करीत या सर्व उर्दू शायर व गीतकारांचे शब्द उसने घेत नेहरूंचे पुण्यस्मरण करीत लेखाचा शेवट करतो. 

‘छोडो कल की बाते, कल की बात पुरानी 
नये दौर मे लिखेंगे मिलकर नयी कहानी 
हम हिंदुस्तानी। आज पुरानी जंजिरों को तोड चुके है 
क्या देखे उस मंझिल को जो छोड चुके है 
चांद के दर पर जा पहुंचा है आज जमाना 
नये जगत से हम भी नाता जोड चुके है 
नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी 
हम हिंदुस्तानी’ 

- डॉ. लक्ष्मीकांत देशमुख 
 
(लेखक मराठीतील ज्येष्ठ लेखक असून ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. साधना साप्ताहिकाच्या २९ मे २०२१ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा मूळ लेख 'साधना' अर्काईव्हवर वाचता येईल.)