मुलींच्या आरोग्यासाठी महाराष्ट्राचा 'मास्टर प्लॅन'; शाळा-शाळांमध्ये सुरू होणार HPV लसीकरण मोहीम

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 7 h ago
Maharashtra School Girls HPV Vaccine Campaign For Cervical Cancer
Maharashtra School Girls HPV Vaccine Campaign For Cervical Cancer

 

मुंबई

महाराष्ट्रातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) वाचवण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील शालेय मुलींना 'ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' (HPV) प्रतिबंधक लस देण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. अशी मोहीम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. राज्यातील सरकारी, निमसरकारी आणि खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना ही लस दिली जाईल. ज्या मुली शाळेत जात नाहीत, अशा मुलींना अंगणवाडी किंवा आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून या मोहिमेत सामावून घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे नऊ लाख मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे.

ही लस दोन डोसमध्ये दिली जाणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर सहा महिन्यांच्या अंतराने दुसरा डोस दिला जाईल. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील कर्करोगाच्या प्रमुख प्रकारांपैकी एक आहे. ही लस लहान वयातच दिल्यास भविष्यात होणारा या कर्करोगाचा धोका ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शालेय शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शाळांमध्ये यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. लसीकरणापूर्वी पालकांची संमती घेणे अनिवार्य असेल. पालकांमध्ये या लसीबद्दल जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये विशेष बैठका आणि मार्गदर्शन सत्रेही आयोजित केली जाणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या शिफारसींनुसार, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निर्मूलन करण्यासाठी मुलींचे वेळेत लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्र सरकारनेही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, त्याआधीच महाराष्ट्राने या मोहिमेची अंमलबजावणी करून देशासमोर एक आदर्श ठेवला आहे. या मोहिमेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील मुलींना कर्करोगाविरुद्ध एक भक्कम सुरक्षा कवच मिळणार आहे.