ईद एक दिवसाची की तीन दिवसांची? धर्म आणि परंपरा काय सांगते?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अर्सला खान

ईदचा चंद्र दिसताच आनंदाची एक नवी सकाळ सुरू होते. घराघरांत उत्साहाला उधाण येते. यंदा नुकताच २१ मार्च रोजी ईदचा चंद्र दिसला आणि सणाचा मोठा उत्साह सुरू झाला. मस्जिदींमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळते. गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा देण्याची आणि गोडवा वाटण्याची सुंदर प्रथा सुरू होते.

पण इथे अनेकदा एक प्रश्न उपस्थित राहतो. ईदचा सण तर फक्त एकाच दिवसाचा असतो. मग मुस्लिम समाज हा सण सलग तीन दिवस का साजरा करतो? हा खरोखरच एखादा धार्मिक आदेश आहे? की ही केवळ एक सामाजिक परंपरा आहे? या प्रश्नाचे उत्तर इतिहास, धर्म आणि समाज या तिन्हींमध्ये दडलेले आहे.

इस्लाममध्ये 'ईद-उल-फित्र' आणि 'ईद-उल-अजहा' या दोन्ही सणांचे मूळ स्वरूप एकाच दिवसाचे आहे. नमाज पठण, खुत्बा आणि कुर्बानी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या इबादती (उपासना) त्याच दिवशी केल्या जातात.

ईद तीन दिवस साजरी करणे बंधनकारक आहे, असा कोणताही स्पष्ट उल्लेख कुराण आणि हदीसमध्ये आढळत नाही. असे असूनही जगभरातील अनेक मुस्लिम समाजांमध्ये सलग तीन दिवस ईदचा मोठा उत्साह पाहायला मिळतो.

या प्रथेची पाळेमुळे मानवी गरजा आणि सामाजिक जडणघडणीत रुजलेली आहेत. जुन्या काळी लोक एकमेकांपासून खूप दूर राहायचे. नातेवाईकांना भेटण्यासाठी खूप वेळ लागायचा. एकाच दिवसात सर्वांच्या घरी जाणे शक्य नसायचे.

अशा वेळी सर्वांना एकमेकांना भेटता यावे, यासाठी ईदचा आनंद काही दिवस पुढे वाढवण्यात आला. हळूहळू या गरजेतूनच एका प्रथेचा जन्म झाला. तीच प्रथा पुढे रूढ झाली.

याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पाहुणचाराची जुनी परंपरा! मुस्लिम समाजात पाहुण्यांना एक अत्यंत खास आणि मानाचे स्थान दिले जाते. ईदच्या निमित्ताने नातेवाईक आणि मित्रांची सतत ये-जा सुरू असते.

पहिल्या दिवशी घरातील आणि जवळची माणसे भेटतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी दूरचे नातेवाईक आणि ओळखीचे लोक घरी येतात. अशा प्रकारे ईदचा आनंद आपोआप तीन दिवसांपर्यंत विस्तारत जातो.

'ईद-उल-अजहा'च्या बाबतीत ही गोष्ट अधिक प्रकर्षाने दिसून येते. कुर्बानीचे मांस वाटण्याचे आणि ते गरजूंंपर्यंत पोहोचवण्याचे काम अनेक दिवस चालते. याच कारणामुळे या ईदचा उत्साहही एका दिवसापेक्षा अधिक काळ टिकतो.

धार्मिक विद्वानांच्या मते, आनंद वाटणे हाच ईदचा खरा आणि मुख्य उद्देश आहे. हा आनंद एका दिवसाऐवजी तीन दिवस चालत असेल, तर त्यात काहीही गैर नाही. पण याला सक्तीचा धार्मिक नियम मानू नये, अशी अत्यंत महत्त्वाची अट त्यांनी घातली आहे.

ईदचा दिवस नक्कीच ठरलेला आहे. पण आनंद साजरा करायला कोणतीही कालमर्यादा नसते, असे अनेक उलेमा (इस्लामिक विद्वान) आवर्जून सांगतात.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात ही परंपरा आणखीच घट्ट होते. इथले सामाजिक संबंध अत्यंत खोलवर रुजलेले आहेत. गल्ली, मोहल्ले आणि कुटुंबे एकमेकांशी घट्ट जोडलेली असतात.

ईदच्या निमित्ताने हा जिव्हाळा अधिक मोकळेपणाने समोर येतो. सलग तीन दिवस चालणारा हा उत्साह खऱ्या अर्थाने नाती मजबूत करण्याचे एक अत्यंत प्रभावी माध्यम बनतो. काही लोक याला एक गैरसमज मानतात. त्यांच्या मते ईद फक्त एकाच दिवसाची असते.

पण बहुतांश लोक याला काळानुसार विकसित झालेली एक अत्यंत सोपी आणि नैसर्गिक परंपरा मानतात. सत्य हेच आहे, ईद सलग तीन दिवस साजरी करण्याचा कोणताही निश्चित नियम नाही. हा केवळ एक सामाजिक प्रघात आहे. तो लोकांच्या सोयीशी आणि भावनांशी थेट जोडलेला आहे.

आनंद वाटणे, नाती जपणे आणि एकमेकांच्या अधिक जवळ येणे, हाच ईदचा खरा अर्थ आहे. हे काम एका दिवसात झाले तरी उत्तमच आहे. आणि जर याला तीन दिवस लागले, तरीही त्यात कोणतेही नुकसान नाही.

शेवटी, ईद ही तारीख नाही, तर एक सुंदर भावना आहे. आणि ही भावना जितके दिवस जिवंत राहते, तितकीच ईद मोठी होत जाते. आणि आनंदही द्विगुणित होत राहातो.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter