अहमदाबाद विमान दुर्घटनेत २४१ जणांचा मृत्यू, एअर इंडियाची पुष्टी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
अहमदाबाद विमान दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू.
अहमदाबाद विमान दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू.

 

एअर इंडियाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अपघातग्रस्त झालेल्या लंडनगामी विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. गुरुवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत बोईंग ७८७ -८  या विमानात २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होते. एअर इंडियाने गुरुवारी रात्री उशिरा निवेदन जारी केले. त्यात म्हटले, “२४२  प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे.”

या दुर्घटनेत एकमेव वाचलेली व्यक्ती ही भारतीय वंशाची ब्रिटिश नागरिक आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एअर इंडियाने सांगितले की, फ्लाइट AI-171 अहमदाबाद ते लंडन गॅटविकला १२ जून २०२५ रोजी दुपारी 1:38 वाजता उड्डाण केल्यानंतर अपघातग्रस्त झाली.  

एअर इंडियाने मृतांच्या कुटुंबीयांप्रती खोल दु:ख व्यक्त केले. “आमचे सर्व प्रयत्न पीडितांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या गरजांवर केंद्रित आहेत,” असे कंपनीने सांगितले. अहमदाबादमध्ये एअर इंडियाची काळजीवाहू टीम पीडितांना अतिरिक्त मदत पुरवत आहे. तपास यंत्रणांना कंपनी पूर्ण सहकार्य करत आहे.

एअर इंडियाने माहितीसाठी एक समर्पित हॉटलाइन क्रमांक जाहीर केला आहे. भारतातून 1800 5691 444 वर आणि भारताबाहेरून +91 8062779200 वर संपर्क साधता येईल. या दुर्घटनेमुळे देशभरात शोककळा पसरली आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter