पाकिस्तानातील दहशतवादाचा समूळ नाश करायला हवा - असदुद्दीन ओवैसी

Story by  Fazal Pathan | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी
AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी

 

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घूसून 9 ठिकाणी हे हल्ले केले. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने आज ७ मेच्या पहाटे ही कारवाई केली. या करावाईत दहशतवाद्यांचे ठिकाणे उध्वस्त केल्याचा दावा सैन्याने केला आहे.सैन्याच्या या कारवाईवर देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. त्यापिकी हैद्राबादचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या तीव्र प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यांचं ओवैसी यांनी स्वागत केले आहे. त्यांनी लिहिलय, “आपल्या सैन्यदलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे मी स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेटला असा धडा शिकवला पाहिजे की पुन्हा पहलगामसारखा हल्ला होणार नाही. पाकिस्तानतील दहशतवादी पाया पूर्णपणे उद्ध्वस्त करायला हवा. जय हिंद!” या कठोर भूमिकेने राष्ट्रीय सुरक्षेविषयीचे त्यांचे स्पष्ट मत पुन्हा अधोरेखित झाले आहे.

पहलगाम हल्ला आणि ओवैसी यांची प्रतिक्रिया
२२ एप्रिल २०२५ ला जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेक नागरिक जखमी झाले होते. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यानंतर ओवैसी यांनी पाकिस्तानवर कडाडून टीका केली होती. महाराष्ट्रातील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हल्ल्याची तुलना ISIS च्या क्रूर कृत्यांशी केली. ते म्हणाले होते, "पाकिस्तान अण्वस्त्रांचा अभिमान बाळगतं, पण आपल्या भूमीवर धर्म विचारून लोकांना मारलं तर कोणी गप्प बसणार नाही. या हल्ल्याला इस्लामशी जोडणं चुकीचं आहे." 

पहलगाम हल्ल्याच्या निषधार्थ असदुद्दीन ओवेसींनी मुस्लिमांना शुक्रवारच्या दिवशी नमाज दरम्यान दंडाला काळ्या फिती बांधावून पहलगाम हल्ल्याचा निषेध करावा, असे आवाहन केले होतं. तसेच स्वतः मशिदीबाहेर मुस्लीम बांधवांना हातावर बांधण्यासाठी काळ्या फिती वाटल्या होत्या. त्यावेळी ते म्हणाले होते, "आम्ही सर्वजण या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. मुस्लिमांनी नमाजवेळी काळ्या फिती बांधून या हल्ल्याचा निषेध करावा. इस्लामच्या आडून दहशत पसरवणाऱ्या कृतीला आम्ही समर्थन देत नाही, असा संदेशही यातून देऊया." दहशतवादाविरोधात एकजुटता दाखविण्यासाठी आणि शांततेचा संदेश देण्यासाठी ओवेसी यांनी हे आवाहन केले होतं. 

पाकिस्तानविरोधी कठोर भूमिका
पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांनी सातत्याने पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांनी पाकिस्तानला ‘अयशस्वी राष्ट्र आणि दहशतवादाचा कारखाना’ संबोधलं. छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटलं, “हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगल भडकवण्याचा पाकिस्तानचा हेतू आहे. पहलगाममध्ये हिंदू बांधवांना ठार मारून मुस्लीमेतरांना काश्मीरात येऊ नये, असा संदेश ते देऊ इच्छित आहेत.” 

ओवैसी यांनी पाकिस्तानच्या नेत्यांवरही टीका केली. पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या युद्धाच्या धमक्यांना उत्तर देताना त्यांनी म्हटलं, “बिलावल यांच्या आईलाही दहशतवाद्यांनी मारलं. त्यांना आपल्या आईच्या मृत्यूचं दुःख समजत नाही, तर आमच्या माता-भगिनींच्या मृत्यूचं दुःख काय समजणार?”   

कारवाईची मागणी आणि सरकारला पाठिंबा
असदुद्दीन ओवैसी आणि देशभरातील मुस्लिम संघटनांनी पुढे येत केंद्र सरकारकडे दहशतवादावर कठोर कारवाईची मागणी केली होती. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीतही सरकारला कारवाई आणि पीडित कुटुंबांना न्याय देण्याची त्यांनी मागणी केली होती. त्यांनी संसदेच्या ठरावाचा हवाला देत पाकव्याप्त काश्मीर (PoK) भारताचा भाग असल्याचा पुनरुच्चार केला होता.  यावेळी ओवैसी म्हणाले होते, “पाकिस्तानने पुन्हा असा हल्ला करण्याची हिंमत करू नये, यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत.” 
 
"पाकिस्तानच्या दहशतवादी रचनेला उद्ध्वस्त करायला हवं. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. सरकारच्या प्रत्येक राष्ट्रीय हिताच्या पावलाला माझा आणि पक्षाचा पाठिंबा आहे.", असे म्हणत विरोधी पक्षांपैकी सर्वांत उघडपणे आणि ठळकपणे त्यांनी जाहीर भूमिका घेतली होती.