भारत निर्यातीत ८२५ अब्ज डॉलरचा टप्पा गाठणार : पीयूष गोयल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
उद्योगमंत्री पीयूष गोयल
उद्योगमंत्री पीयूष गोयल

 

जागतिक व्यापार गंभीर भू-राजकीय आव्हानांचा सामना करत आहे. परंतु, अशा आव्हानात्मक काळातही भारत सातत्याने सकारात्मक कामगिरी करत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात देशाची निर्यात निश्चितच ८२५ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल, असा विश्वास वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.

संपूर्ण जग रशिया-युक्रेन संघर्ष, इस्त्राईल हमास युद्ध आणि लाल समुद्रातील संकट अशा अनेक गंभीर भू-राजकीय आव्हानांना सामोरे जात आहे. काही संस्थांनी जागतिक व्यापार घटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही, देशाची एकूण निर्यात २०२३-२४ मध्ये ७७८ अब्ज डॉलरच्या तुलनेत ८२५ अब्ज डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली आहे. चालू वर्षातदेखील उत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा असून, गेल्या आर्थिक वर्षातील आकडेवारी निश्चितच या वर्षी ओलांडली जाईल, असे गोयल यांनी सांगितले. 

निर्यात एक लाख कोटी डॉलरवर जाण्याचा 'एफआयईओ'चा अंदाज सर्वोच्च निर्यातदार संघटना भारतीय निर्यात संघटनेने (एफआयईओ) असा अंदाज वर्तवला आहे, की २०२५-२६ दरम्यान देशाची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात वार्षिक २१ टक्क्यांहून अधिक वाढून एक लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचेल. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय खरेदीदार त्यांच्या स्रोतामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करत असल्याने ही निरोगी वाढ होऊ शकते, असे मत 'एफआयईओ'चे अध्यक्ष एस. सी. राल्हन यांनी व्यक्त केले आहे. 

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये, वस्तूंची निर्यात १२ टक्क्यांनी वाढून ५२५-५३५ अब्ज डॉलर होण्याची अपेक्षा आहे, २०२४-२५ मध्ये ४३७अब्ज डॉलर होती, तर सेवा निर्यात गेल्या आर्थिक वर्षात ३८७ अब्ज डॉलरवरून वार्षिक २० टक्क्यांनी वाढून ४६५-४७५ अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे, असे 'एफआयईओ'ने म्हटले आहे. या आर्थिक वर्षात इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, रसायने, कापड आणि कपडे, औषध आणि कृषी क्षेत्र या प्रमुख क्षेत्रांमध्ये निर्यातीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. यूएई, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनांसारख्या देशांसोबत मुक्त व्यापार करारदेखील येत्या काही महिन्यांत निर्यात वाढवण्यास मदत करतील. भारत-युरोपियन मुक्त व्यापार करार या वर्षी एक ऑक्टोबरपासून लागू होण्याची अपेक्षा आहे. भारत-युरोपियन मुक्त व्यापार संघटनेने (ईएफटीए) १० मार्च २०२४ रोजी व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. या करारांतर्गत, भारताला १५ वर्षांत १०० अब्ज डॉलर गुंतवणुकीची हमी मिळाली आहे. सरकार व्यवसाय सुलभता, नियमनमुक्ती, अनुपालनाचा भार कमी, व्यवसाय सुलभता यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे निर्यातीचे १०० अब्ज डॉलरचे आकडे सहजपणे आणि वेगाने ओलांडले जातील, असा विश्वास वाटतो, असेही गोयल यांनी नमूद केले. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter