शस्त्रविरामाची कोणतीही कालमर्यादा नाही - भारतीय सेना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 12 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. यामुळे हादरलेल्या पाकिस्तानने 10 मे रोजी शस्त्रसंधीची विनंती केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली आणि भारतानेही त्यास दुजोरा दिला. मात्र १८ मे २०२५ ला ही शस्त्रसंधी संपून पुन्हा संघर्षाची स्थिती निर्माण होईल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. भारतीय लष्कराने या चर्चांना पूर्णविराम देत शस्त्रसंधीची कोणतीही कालमर्यादा निश्चित नसल्याचे स्पष्ट केले आहे.  

भारतीय लष्कराने १९ मे ला सांगितले की, “१० मे रोजी लागू झालेल्या शस्त्रसंधीला कोणतीही कालमर्यादा नाही. युद्धविरामानंतर मागील आठवडाभरात सीमेवर गोळीबार थांबला असून, तणाव कमी झाला आहे. पाकिस्तानच्या लष्करी कारवाईविषयक महासंचालकांशी (डीजीएमओ) पुढील चर्चेची वेळ अद्याप ठरलेली नाही.”  यापूर्वीच्या डीजीएमओ बैठकीत दोन्ही देशांनी आक्रमक भूमिका टाळणे, सीमेवरील सैन्य कमी करणे, आणि तणाव कमी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय लष्कराने युद्धविरामाच्या उल्लंघनाबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले.

 जयशंकर यांचा विदेश दौरा
भारताची दहशतवादविरोधी भूमिका आणि ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी जागतिक मंचावर मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे नेमली आहेत. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा १९ ते २४ मे दरम्यान नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीचा सहा दिवसीय दौरा सुरू होत आहे. हा दौरा ऑपरेशन सिंदूरनंतरचा त्यांचा पहिला युरोपीय दौरा आहे.

जयशंकर या दौऱ्यात तिन्ही देशांच्या नेत्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटणार असून, द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक, डिजिटल सहकार्य, पर्यावरण बदल, आणि सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करतील. विशेषतः, ते पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर याबाबत भारताची भूमिका मांडतील आणि पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतील. या तिन्ही देशांशी भारताचे आर्थिक आणि रणनीतिक संबंध महत्त्वाचे असून, हा दौरा भारताच्या जागतिक सहभागाला बळकटी देणारा ठरेल.

सर्वपक्षीय शिष्टमंडळ
केंद्र सरकारने 30 हून अधिक सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळे युरोप, आखाती देश, आफ्रिका, आणि इतर महत्त्वाच्या देशांमध्ये पाठवण्याचे नियोजन केले आहे. या शिष्टमंडळांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया सुळे, शशी थरूर, सुदीप बंदोपाध्याय, सलमान खुर्शीद, आणि गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. ही शिष्टमंडळे २२ किंवा २३ मे पासून दौरे सुरू करतील. तसेच ओमान, इजिप्त, केनिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, यूके, कतार, आणि UAE यासारख्या देशांना भेटी देऊन भारताची भूमिका मांडतील.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter