रुबिका लियाकत : महिला पत्रकारांसमोरील आव्हानांवर मात करत यशाच्या शिखरावर पोहोचलेली लोकप्रिय अँकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
रुबिका लियाकत
रुबिका लियाकत

 

विदुषी गौर  

भारतीय टेलिव्हिजन पत्रकारितेचे जग नेहमीच प्रचंड गोंधळाचे असते. इथे टीआरपी मिळवण्यासाठी अनेकदा विषयाच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष केले जाते. मोठ्या आवाजात अनेकदा महत्त्वाची तथ्ये हरवून जातात. अशा आव्हानात्मक काळातही रुबिका लियाकत यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत. प्राईमटाईम डिबेटमध्येही त्यांचा दृष्टिकोन नेहमीच संयमी आणि सुसंस्कृत असतो.

हिंदी वृत्तवाहिन्यांवरील त्या एक अतिशय प्रसिद्ध चेहरा आहेत. न्यूजरूममधील शिस्त, जमिनीवरील वार्तांकन आणि सर्वच भागांतील प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. स्टुडिओमधील दिवे आणि हेडलाईन्सच्या पलीकडेही त्यांचे एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्यावर त्यांचा गाढा विश्वास आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनातूनही हीच मूल्ये दिसून येतात.

रुबिका यांचा जन्म आणि जडणघडण उदयपूरमध्ये झाली. तिथले वातावरण, भाषा आणि सहजीवन या केवळ पुस्तकी गप्पा नव्हत्या. त्यांनी हे सर्व प्रत्यक्षात अनुभवले आहे. इतर अनेक पत्रकारांप्रमाणेच त्यांनाही लोकांविषयी, राजकारणाविषयी आणि सार्वजनिक घडामोडींविषयी प्रचंड कुतूहल होते. या आवडीमुळेच त्या पत्रकारितेकडे वळल्या. या क्षेत्रात टिकण्यासाठी केवळ गुणवत्तेचीच नाही तर जिद्दीचीही खूप गरज असते.

त्यांच्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवात मैदानी वार्तांकनाने झाली. यात ग्लॅमरपेक्षा कष्टाला जास्त महत्त्व होते. आज त्या घराघरात पोहोचल्या आहेत. पण त्यापूर्वी त्यांनी खूप पायपीट केली आहे. त्या स्वतः बाहेर फिरून बातम्या गोळा करायच्या आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरून रिपोर्टिंग करायच्या. यामुळे त्यांना बातमीच्या मुळाशी पोहोचण्याची सवय झाली.

अशा प्रकारे मिळालेला अनुभव कधीच विकत घेता येत नाही. ज्या अँकर्सना फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव असतो, त्यांना विषयाची जाण अधिक चांगली असते. रुबिका यांच्या कारकिर्दीतही हाच अनुभव त्यांच्या कामात दिसून येतो.

हळूहळू त्यांनी अनेक आघाडीच्या हिंदी वृत्तवाहिन्यांमध्ये काम केले. आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करत त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या. 'लाईव्ह इंडिया', 'न्यूज २४' आणि नंतर 'झी न्यूज' सारख्या वाहिन्यांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले. राजकीय घडामोडी, राष्ट्रीय घटना आणि वेगाने बदलणाऱ्या बातम्या कव्हर करण्यात त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले. त्यानंतर त्या 'एबीपी न्यूज'मध्ये दाखल झाल्या. तिथे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आणि त्या वाहिनीच्या मुख्य निवेदिका बनल्या.

टीव्हीवर बातम्या देणे हे सोपे काम नाही. दररोज रात्री तथ्यांची पूर्ण माहिती असावी लागते. प्रचंड दडपणाखालीही स्वतःला सावरण्याचे कसब लागते. रुबिका यांची शैली नेहमीच आत्मविश्वासाने भरलेली आणि थेट प्रश्न विचारणारी राहिली आहे. स्पर्धात्मक पत्रकारितेत याच गुणांमुळे त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. प्रेक्षकांसाठी त्या एक खंबीर निवेदिका आहेत. नवीन पत्रकारांसाठी त्या जिद्द आणि परिश्रमाचे उत्तम उदाहरण आहेत. मात्र, रुबिका यांची ही गोष्ट केवळ रेटिंग किंवा चर्चेपुरती मर्यादित नाही.

भारताच्या विविधतेने नटलेल्या सामाजिक संस्कृतीचे त्या उत्तम प्रतिनिधित्व करतात. सध्याच्या काळात माणसांना केवळ जाती-धर्माच्या चौकटीत पाहिले जाते. पण रुबिका यांनी या चौकटीच्या पलीकडचे वास्तव जगासमोर मांडले. भारतातील वैयक्तिक नातेसंबंध, मैत्री, कामाची ठिकाणे आणि कुटुंबे अनेकदा या भिंती ओलांडून एकत्र राहतात. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातही विविध परंपरांचा आदर केला जातो. हे केवळ दाखवण्यासाठी नाही, तर त्यांच्या आचरणातही दिसते.

आपली कृती आणि संदेशातून त्यांनी नेहमीच एक गोष्ट स्पष्ट केली आहे. ऐक्य हे केवळ भाषणांपुरते मर्यादित राहून चालत नाही. ते आपल्या घरात, सण-उत्सवात आणि रोजच्या भेटीगाठीत दिसले पाहिजे. सर्व धर्मांच्या सणांचा आदर करणे असो किंवा एकमेकांबद्दल सन्मान बाळगणे असो; त्यांची ही विचारसरणी भारतीयत्वाचे प्रतीक आहे. मनात कोणतीही भीती न ठेवता एकत्र राहणे म्हणजेच 'सहजीवन' होय.

हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण माध्यमांमधील व्यक्ती केवळ बातम्या देत नाहीत. समाजात त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून पाहिले जाते. जेव्हा राष्ट्रीय माध्यमांमधील एखादी व्यक्ती विविधतेचा अभिमान बाळगते, तेव्हा समाजात एक सकारात्मक संदेश जातो. आपली ओळख जपताना एकमेकांशी स्पर्धा करण्याची गरज नाही, हीच जाणीव त्या करून देतात.

भारताचे दैनंदिन वास्तव पाहिले तर आपल्याला सहजीवनाची अनेक उदाहरणे मिळतात. एकमेकांचे सण साजरे करणारे शेजारी किंवा एकमेकांच्या घरगुती कार्यक्रमांना उपस्थित राहणारे सहकारी आपण नेहमी पाहतो. हिंदू-मुस्लिम ऐक्यावर रुबिका यांनी दिलेला भर याच अनुभवांवर आधारलेला आहे. त्यांच्या बोलण्यात कोणत्याही घोषणा नसून जमिनीवरचे सत्य आहे.

महिला पत्रकारांसाठीही रुबिका यांची कारकीर्द खूप महत्त्वाची आहे. हिंदी टीव्ही पत्रकारितेत काम करणे सोपे नाही. इथे कामाचे तास ठरलेले नसतात आणि सतत लोकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. महिला निवेदिकेचा पेहराव, तिचा आवाज आणि तिचे वैयक्तिक आयुष्य यावर पुरुष निवेदकांपेक्षा अधिक कडकपणे टीका केली जाते. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही रुबिका यांनी आपले स्थान टिकवून ठेवले आहे. ही केवळ त्यांची कार्यक्षमता नाही तर त्यांची सहनशक्तीही आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे माध्यमांचे स्वरूप आता बदलत आहे. रुबिका लियाकत या अशा पिढीचे प्रतिनिधित्व करतात ज्यांनी टीव्हीवरील प्रभाव आणि सोशल मीडियाची गती या दोन्हीचा सुंदर मेळ साधला आहे. न्यूजरूममधील वर्षांच्या अनुभवातून त्यांचा एक स्वतःचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

थोडक्यात सांगायचे तर रुबिका यांची ही गोष्ट व्यावसायिक चिकाटीची आहे. बदलत्या काळानुसार स्वतःला बदलण्याची त्यांची क्षमता यात दिसते. त्याचबरोबर भारताच्या विविधतेवर असणारा त्यांचा विश्वासही यात दिसून येतो. आजच्या काळात त्यांचे हे विचार आणि कार्य खूप मोलाचे वाटते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter