इराणमध्ये १० भारतीयांच्या अटकेची बातमी खोटी!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इराणमध्ये सुरू असलेल्या अशांततेदरम्यान १० भारतीय नागरिकांना अटक करण्यात आल्याच्या बातम्यांचे इराणच्या दूतावासाने जोरदार खंडन केले आहे. नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाने रविवारी यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिले. इराणमधील एका वृत्तवाहिनीने दावा केला होता की, इराणमधील सरकारविरोधी निदर्शनांच्या वेळी १० भारतीयांना अटक करण्यात आली आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे निराधार आणि असत्य असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे.

दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत आपली भूमिका मांडली. "आम्ही भारतीय नागरिकांच्या अटकेबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त ठामपणे फेटाळत आहोत. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही," असे दूतावासाने निक्षून सांगितले. अशा संवेदनशील विषयांवर माहिती मिळवण्यासाठी लोकांनी केवळ अधिकृत आणि विश्वसनीय स्रोतांचाच वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. खोट्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन इराणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

'इराण इंटरनॅशनल'च्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान या भारतीयांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, इराण सरकारने हे वृत्त फेटाळून लावत भारतीय नागरिक सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. इराणमध्ये सध्या इंधनाच्या वाढत्या किमती आणि आर्थिक परिस्थितीवरून तणाव निर्माण झाला आहे, परंतु यात भारतीयांचा कोणताही सहभाग नाही किंवा त्यांना अटक झालेली नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.