न्यूझीलंडने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आणले आहे. बुधवारी कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात फलंदाजीतील जबरदस्त पुनरागमनाच्या जोरावर किवींनी श्रीलंकेवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडने २० षटकांत १६८/७ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आपली चमक दाखवत यजमान संघाला केवळ १०७/८ धावांवर रोखले. सुपर-८ फेरीतील श्रीलंकेचा हा सलग दुसरा पराभव असून या पराभवामुळे ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दुसरीकडे, या मोठ्या विजयामुळे न्यूझीलंडने अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या आपल्या आशा पल्लवित केल्या आहेत. इंग्लंडने यापूर्वीच पात्रता मिळवली असून किवी संघ तीन गुणांसह गट २ मध्ये सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.
आता केवळ पाकिस्तानचा संघ त्यांना आव्हान देऊ शकतो. मात्र, सलमान आघाच्या संघाला श्रीलंकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल आणि न्यूझीलंडचा इंग्लंडविरुद्ध पराभव व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी ८४/६ अशा बिकट अवस्थेतून संघाला सावरत १६० धावांचा टप्पा पार करून दिला. कर्णधार मिचेल सँटनरने २६ चेंडूत ४७ धावांची खेळी करत चार षटकार आणि दोन चौकार ठोकले. कोल मॅककॉन्चीने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावा केल्या. फिनल ॲलनने संघाला वेगवान सुरुवात करून दिली होती, मात्र श्रीलंकेने तिसऱ्या षटकात पुनरागमन केले. महेश तीक्षणाने ॲलनला तर दुश्मंथा चमीराने टीम सायफर्टला बाद केले. रचिन रवींद्र (३२) आणि ग्लेन फिलिप्स यांच्यातील ४१ धावांच्या भागीदारीमुळे संघाला काही काळ दिलासा मिळाला.
मात्र फिलिप्स बाद होताच न्यूझीलंडच्या मधल्या फळीला गळती लागली आणि नऊ धावांच्या अंतरात त्यांनी चार विकेट गमावल्या. रचिन रवींद्र, मार्क चॅपमन आणि डॅरिल मिचेल केवळ आठ चेंडूंच्या खेळात बाद झाले आणि धावसंख्या ८४ वर स्थिरावली. न्यूझीलंडचा संघ अडचणीत असताना सँटनर आणि मॅककॉन्चीने पाय रोवून फलंदाजी केली. त्यांनी सुरुवातीला सावध पवित्रा घेतला आणि १७ व्या षटकात आक्रमक रूप धारण करत शेवटच्या चार षटकांत ७० धावा कुटल्या. या जोडीने सातव्या विकेटसाठी अवघ्या ४७ चेंडूत ८४ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडला सामन्यात परत आणले. फिरकीपटू तीक्षणा (३/३०) आणि वेगवान गोलंदाज चमीरा (३/३८) यांनी पहिल्या १५ षटकांत भेदक मारा केला होता, पण अखेरच्या षटकांत त्यांना फलंदाजांच्या प्रहाराचा सामना करावा लागला.
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचा प्रमुख फलंदाज पाथुम निसांका डावाच्या पहिल्याच चेंडूवर मॅट हेन्रीच्या अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत झाला. पहिले षटक निर्धाव टाकत विकेट घेणाऱ्या हेन्रीने पुढच्या षटकात चरित असलंकाला बाद केले. हेन्रीने दोन षटकांत केवळ ३ धावा देऊन २ बळी घेतले. सहा षटकाअखेर यजमान संघाची अवस्था २०/२ अशी होती, जी त्यांची टी-२० विश्वचषकातील पॉवरप्लेमधील निचांकी धावसंख्या ठरली. परिस्थिती अधिक बिकट झाली जेव्हा कुशल मेंडिस आणि पावन रथनायके लागोपाठ दोन चेंडूंवर रचिन रवींद्रच्या फिरकीवर यष्टीचीत झाले. डावखुरा फिरकीपटू रचिनने २७ धावांत ४ बळी घेत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
कामिंदू मेंडिस (३१) आणि दुनिथ वेल्लालागे (२९) यांनी थोडा प्रतिकार केला, पण तोपर्यंत विजयाचे पारडे न्यूझीलंडच्या बाजूने झुकले होते. यजमान संघाने केवळ नियमित अंतराने विकेट गमावल्या नाहीत, तर त्यांना प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकता येईल अशी एकही भागीदारी करता आली नाही. श्रीलंकेला चौकार-षटकारांच्या माध्यमातून केवळ ३८ धावा करता आल्या, तर न्यूझीलंडने सीमापार फटक्यांच्या मदतीने १०० धावा वसूल केल्या होत्या.