डॉ. जाहिदा खान : वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पसरवणारी मसिहा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
डॉ. जाहिदा खान
डॉ. जाहिदा खान

 

सानिया अंजुम

हुबळीच्या त्या शांत गल्ल्यांमध्ये, जिथे परंपरा आणि आधुनिकता आजही हातात हात घालून चालतात, तिथे एका लहान मुलीने आपल्या परिस्थितीपेक्षा मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस केले. तीच मुलगी पुढे जाऊन डॉ. जाहिदा खान म्हणून नावारूपास आली. त्या आज एक विदुषी, प्रशासक, उद्योजिका, समाजनेती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्यभर विद्यार्थी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे जीवन ही केवळ यशाची गोष्ट नाही, तर ती जिद्द, ठाम विश्वास आणि शिक्षणाच्या ताकदीवर असलेल्या अढळ श्रद्धेची साक्ष आहे.

हुबळीत जन्मलेल्या डॉ. जाहिदा खान यांचे शालेय शिक्षण अँग्लो-उर्दू हायस्कूलमध्ये झाले. याच शाळेने त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षेचे पहिले बी पेरले. अनेक वर्षांनंतर, जेव्हा त्यांनी व्यावसायिक यश आणि समाजात मान-सन्मान मिळवला, तेव्हा त्या पुन्हा याच शाळेत परतल्या. यावेळी त्या फक्त जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आल्या नव्हत्या, तर एका मोठ्या उद्देशाने आल्या होत्या. 

ज्या बाकांवर त्या स्वतः कधीकाळी बसल्या होत्या, तिथे आज बसलेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, "शिक्षण हेच माझे स्वातंत्र्य होते. शिक्षणाने माझ्यासाठी अशी दारे उघडली ज्यांचे अस्तित्वही मला माहित नव्हते. जर शिक्षणाने माझे आयुष्य बदलू शकते, तर ते तुमचेही आयुष्य नक्कीच बदलू शकते."

त्यांचे हे शब्द मनाला भिडतात, कारण ते त्यांच्या स्वतःच्या संघर्षातून आले आहेत. जाहिदा यांचे लग्न वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी झाले होते. हे वय खेळण्या-बागडण्याचे आणि स्वतःला ओळखण्याचे असते, पण त्यांना या वयातच मातृत्वाची जबाबदारी स्वीकारावी लागली. अनेकांसाठी हे त्यांच्या शिक्षणाचे पूर्णविराम असू शकले असते, पण जाहिदा यांच्यासाठी ही एका शांत क्रांतीची सुरुवात होती. आपल्या बाळाला कडेवर घेऊन त्याला सांभाळत त्यांनी आपल्या १० वीच्या परीक्षेची तयारी केली.
 

त्या दिवसांच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, "मला आजही आठवते, माझ्या एका हातात माझे बाळ असायचे आणि दुसऱ्या हातात पुस्तके. माझ्या जबाबदाऱ्यांमुळे माझे शिक्षण थांबावे असे मला कधीच वाटले नाही. उलट, शिक्षणाने माझ्या जबाबदाऱ्या पेलण्याची ताकद मला मिळावी, अशी माझी इच्छा होती."

हा त्यांचा बंडखोरपणा नव्हता, तर तो त्यांचा निर्धार होता. त्यांच्या कुटुंबानेही त्यांच्या या जिद्दीला पूर्ण साथ दिली. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी पत्रव्यवहाराद्वारे आपली दुहेरी पदवी (डबल ग्रॅज्युएशन) पूर्ण केली. त्या काळात शिस्त, त्याग आणि वेळेचे नियोजन या जोरावर ही पदवी मिळवणे हे खरोखरच कठीण काम होते. पण एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही. त्यांची ज्ञानाची तहान अजूनही कायम होती.

भाषा, साहित्य आणि संस्कृतीवरील प्रेमामुळे त्यांनी उर्दू साहित्यात पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा प्रवास केवळ अभ्यासापुरता मर्यादित नव्हता, तर तो अत्यंत वैयक्तिक होता. त्या म्हणतात, "उर्दू साहित्याने मला माझी ओळख दिली. त्याने मला भावना व्यक्त करायला आणि सत्य ठामपणे मांडण्याचे धाडस दिले."

शिक्षणासोबतच जाहिदा यांचा परिचय युनानी औषधोपचारांशी झाला. त्यांचे सासरे या पारंपारिक उपचार पद्धतीत निपुण होते. या उपचार पद्धतीतील सर्वांगीण दृष्टिकोनामुळे त्या भारावून गेल्या आणि त्यांनी त्याचे सखोल ज्ञान आत्मसात केले. हळूहळू त्यांनी युनानी तत्त्वांवर आधारित घरगुती आणि प्रभावी उपचार लोकांना सांगायला सुरुवात केली.
 

"आपली पारंपारिक ज्ञानसंपदा आपण विसरता कामा नये," असे त्या सांगतात. "हे ज्ञान आपल्याला आपल्या मुळांशी जोडते आणि खरे उपचार हे समजुतीतून सुरू होतात, हे आपल्याला शिकवते."

त्यांची जबाबदारी केवळ कुटुंब आणि अभ्यासापुरती मर्यादित राहिली नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि समानतेचा आग्रह धरणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये त्या सक्रिय झाल्या. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी त्या फक्त शांतपणे बघत बसल्या नाहीत. त्या ठामपणे सांगतात, "जर काही चुकीचे घडत असेल, तर आपण बोललेच पाहिजे. शांत राहिल्याने कोणाचाच फायदा होत नाही."

त्यांची स्पष्टवक्ती शैली आणि आत्मविश्वास यामुळे त्यांना दूरदर्शनमध्ये अँकर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कॅमेऱ्यासमोर त्या अत्यंत संयत आणि स्पष्टपणे बातम्या मांडत असत. त्यांच्यासाठी पत्रकारिता हे ग्लॅमर नव्हते, तर ती एक जबाबदारी होती.

त्यांच्या शब्दांत सांगायचे तर, "शब्दांमुळे आत्मविश्वास वाढू शकतो आणि समाजाला जागृतही करता येते. माध्यम हे सत्य आणि जनता यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे."

त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल लवकरच राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. केंद्र सरकारने त्यांची कर्नाटक राज्य वखार महामंडळावर (Karnataka State Warehousing Corporation) नियुक्ती केली. अन्न साठवणूक आणि वितरणाची जबाबदारी असलेल्या या पदावर त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम केले. ज्या देशात अन्नसुरक्षा ही थेट जगण्याशी आणि सन्मानाशी जोडलेली असते, तिथे अशा पदावर काम करताना मोठी जबाबदारी असते.

त्या म्हणतात, "अन्न ही केवळ चैनीची वस्तू नाही, तर तो प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. त्याचे जबाबदारीने व्यवस्थापन करणे म्हणजे त्यावर अवलंबून असलेल्या जीवांचा सन्मान करणे होय." या पदावरून त्या निवृत्त झाल्या तेव्हा त्यांची ओळख एक कार्यक्षम आणि पारदर्शक अधिकारी म्हणून झाली होती. निवृत्ती म्हणजे थांबणे नव्हे, तर त्यांच्यासाठी ही एका नव्या प्रवासाची सुरुवात होती.

पूर्णवेळ समाजसेवेत येण्यापूर्वी त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात उद्योजिका म्हणूनही आपले नशीब आजमावले. तिथेही त्यांनी मोठे यश मिळवले आणि हे सिद्ध केले की, नेतृत्व हे केवळ प्रशासनात नाही तर व्यवसायातही करता येते. मात्र, व्यवसाय बहरत असतानाच त्यांच्या मनाला समाजसेवेची ओढ लागली.

त्या विचारपूर्वक सांगतात, "संपत्तीला तेव्हाच मोल असते जेव्हा ती कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवते. जर आपण इतरांना वर उचलण्यासाठी मदत करू शकलो नाही, तर त्या यशाला काहीच अर्थ नाही."

अखेर त्यांनी आपला व्यवसाय बाजूला ठेवून स्वतःला पूर्णपणे समाजकार्यासाठी वाहून दिले. 'असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स' (AMP) या संस्थेसोबतचे त्यांचे कार्य हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. तीन वेळा कर्नाटक राज्याचे प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी तरुणांना मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि सक्षमीकरण यावर भर दिला. "एका व्यक्तीला सक्षम करा, म्हणजे संपूर्ण कुटुंब सक्षम होईल आणि कुटुंब सक्षम झाले की समाज प्रगत होईल," असे त्या नेहमी स्वयंसेवकांना सांगतात.

अनेक पदे आणि सन्मान मिळूनही जाहिदा यांचे पाय जमिनीवरच आहेत. 'समाजसेवेची सुरुवात स्वतःच्या घरापासून होते' या साध्या तत्त्वावर त्यांचा विश्वास आहे. त्यांनी आपल्या विस्तारित कुटुंबातील अनेक सदस्यांना शिक्षण आणि नोकरीसाठी मदत केली आहे. त्यांच्या मते, बदल हा आधी आपल्या जवळच्या लोकांपासून सुरू व्हायला हवा, मग तो समाजापर्यंत पोहोचतो.

गरजूंच्या शिक्षण आणि कल्याणासाठी त्यांनी 'मसिहा' (Masiha) नावाचा ट्रस्ट स्थापन केला आहे. या माध्यमातून त्या अशा विद्यार्थ्यांना संधी देतात जे कधीकाळी त्यांच्यासारख्याच परिस्थितीत होते - साशंक पण आशेने भरलेले.

त्या म्हणतात, "शिक्षणासाठी संघर्ष करणे म्हणजे काय, हे मी अनुभवले आहे. जर मी कोणा एकाचा मार्ग सुकर करू शकले, तर तेच माझे खरे यश असेल."

वयाच्या चौदाव्या वर्षी झालेलं लग्न, जिद्दीने केलेला अभ्यास, विदुषी, मीडिया प्रोफेशनल, प्रशासक, उद्योजिका आणि एक समाजनेती - अशा प्रत्येक भूमिकेत डॉ. जाहिदा खान यांनी एक विद्यार्थी म्हणून शिकणे कधीच थांबवले नाही. हेच त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

त्या हसून सांगतात, "मी आजही एक विद्यार्थिनीच आहे. हे जीवनच सर्वात मोठा शिक्षक आहे."

त्यांचा हा प्रवास आपल्याला आठवण करून देतो की, परिस्थिती आपले भविष्य ठरवत नाही, तर आपले निर्णय ठरवतात. जबाबदारी सांभाळून शिक्षण घेता येते, महत्त्वाकांक्षा आणि करुणा यांचा मेळ घालता येतो आणि नम्र राहूनही समर्थ नेतृत्व करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

हुबळीच्या वर्गापासून ते शासनाच्या दालनांपर्यंत आणि टीव्ही स्टुडिओपासून ते थेट लोकांच्या समस्यांपर्यंत, डॉ. जाहिदा खान म्हणजे चिकाटीचे मूर्तिमंत रूप आहेत. जेव्हा जिद्द आणि उद्दिष्ट एकत्र येतात, तेव्हा केवळ एका व्यक्तीचे नाही तर संपूर्ण समाजाचे परिवर्तन होते, याचा त्या जिवंत पुरावा आहेत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, "जेव्हा एखादी स्त्री शिकते, तेव्हा संपूर्ण पिढी उभी राहते."
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter