डॉ. जफर डारिक कासमी
अनेक मुस्लिम समाजांमध्ये एक गैरसमज कायम आहे. इस्लाम आणि विज्ञान यांच्यात संघर्ष असतो, असे त्यांना वाटते. खरे तर, हा विश्वास इस्लामच्या मूळ भावनेच्याच विरुद्ध आहे. इस्लाम ज्ञानाला केवळ महत्त्वच देत नाही, तर ज्ञान मिळवणे हे एक पवित्र कर्तव्य मानतो.
आज 'शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन' आहे. यानिमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो: विज्ञान केवळ भौतिक सुख-सोयी आणण्यासाठी आहे का? की त्याचा उद्देश शांतता, न्याय आणि मानवतेचे कल्याण करणे हा देखील आहे?
मानवी इतिहासाने हे दाखवून दिले आहे की, वैज्ञानिक आणि बौद्धिक प्रगतीने नेहमीच जीवनाचा दर्जा उंचावला. हा दिवस आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देतो. विज्ञान केवळ प्रयोगशाळा किंवा शोधांपुरते मर्यादित नाही. ते सलोखा, समानता आणि मानवी प्रगतीला चालना देण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे.
कुराणामध्ये सुमारे ७५० आयती (श्लोक) आहेत. या आयती विश्वाचा आणि त्यातील घटनांचा विचार करण्यास सांगतात. त्यातून श्रद्धा आणि बौद्धिक जिज्ञासा यांची सांगड घातली जाते.
"निश्चितच, आकाश आणि पृथ्वीच्या निर्मितीमध्ये, आणि रात्र व दिवसाच्या बदलण्यामध्ये, समज असलेल्या लोकांसाठी निशाण्या आहेत." (सूरह आल-ए-इमरान, ३:१९०)
हा श्लोक विज्ञानाचे सार - निरीक्षण, चिंतन आणि विश्लेषण - सुंदरपणे मांडतो.
इस्लाम, एक संपूर्ण आणि करुणामय जीवन पद्धती म्हणून, ज्ञान आणि विज्ञानाला मानवतेची सेवा करण्याचे आणि न्याय टिकवून ठेवण्याचे साधन मानतो. कुराण वारंवार लोकांना विचार करण्यास, चिंतन करण्यास आणि निर्मितीच्या चिन्हांचे निरीक्षण करण्यास सांगते. हे बौद्धिक चौकशी आणि नैतिक जागरूकता या दोन्हींना प्रेरणा देते.
२००१ मध्ये युनेस्कोने 'शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिना'ची स्थापना केली. त्याचा उद्देश हाच होता की, वैज्ञानिक प्रगतीला खरे मूल्य तेव्हाच प्राप्त होते, जेव्हा तिला नैतिकतेचे मार्गदर्शन मिळते आणि तिची दिशा शांतता व शाश्वत प्रगतीकडे असते. वैज्ञानिक जागरूकता वाढवणे, विज्ञानाला शाश्वत विकासाशी जोडणे, शिक्षणासाठी विज्ञानाचा वापर करणे, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण करणे, आणि सर्व वैज्ञानिक प्रयत्नांमध्ये नैतिक जबाबदारी सुनिश्चित करणे, हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.
इस्लाम मानवी जीवनासाठी एक व्यापक चौकट प्रदान करतो. तो आध्यात्मिक, बौद्धिक, नैतिक आणि भौतिक पैलूंवर भर देतो. तो केवळ उपासनेलाच महत्त्व देत नाही, तर ज्ञान, संशोधन आणि तर्कसंगत विचारांवरही मोठा भर देतो.
ऐतिहासिकदृष्ट्या, इस्लाम ही पहिली संस्कृती होती, जिने वैज्ञानिक चौकशीचे दरवाजे उघडले. कुराण विश्वास ठेवणाऱ्यांना आकाश आणि पृथ्वी, तारे, महासागर, वनस्पती, प्राणी आणि अगदी स्वतःच्या निर्मितीच्या रहस्यांचे निरीक्षण करण्याचे आवाहन करते. हे सखोल निरीक्षणच वैज्ञानिक तपासाचा पाया बनते.
कुराणाच्या शिकवणीतून प्रेरित होऊन, मुस्लीम विद्वानांनी इस्लामच्या सुवर्णकाळात (८ वी ते १३ वे शतक) जागतिक ज्ञानात उल्लेखनीय योगदान दिले. युरोप अजूनही अंधार युगात असताना, बगदाद, दमास्कस, कॉर्डोबा आणि बुखारा सारखी शहरे शिक्षण आणि नवनिर्माणाची केंद्रे म्हणून बहरत होती.
मुस्लिम शास्त्रज्ञांनी गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि अभियांत्रिकीमध्ये युगप्रवर्तक काम केले. त्यांनीच आधुनिक विज्ञानाचा पाया घातला.
यांच्यापैकी काही प्रमुख नावेही आहेत. अल-ख्वारिझमी यांनी 'अल्जेब्रा' (बीजगणित)चा शोध लावला; 'अल्गोरिदम' (Algorithm) हा शब्द त्यांच्याच नावरून आला आहे. इब्न अल-हैथम (अल्हॅझेन) हे 'ऑप्टिक्स' (प्रकाशशास्त्र) चे प्रणेते होते.
जाबिर इब्न हय्यान (गेबर) यांना 'रसायनशास्त्राचे जनक' म्हणून ओळखले जाते. इब्न सिना (ॲव्हिसेना) यांनी 'अल-कानून फी अल-तिब्ब' (The Canon of Medicine) हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ शतकानुशतके युरोपमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा मुख्य आधार होता. अल-बिरुनी यांनी पृथ्वीच्या परिघाची अचूक गणना केली. तसेच, इब्न रुश्द (ॲव्हेरोस) यांनी ॲरिस्टॉटलवर भाष्य लिहून श्रद्धा आणि तर्काचा मेळ घातला.
या विद्वानांना विज्ञान आणि श्रद्धेमध्ये कोणताही संघर्ष दिसला नाही. देवाच्या निर्मितीला समजून घेणे आणि मानवतेची सेवा करणे, हेच त्यांच्या संशोधनाचे मुख्य साधन होते.
आधुनिक विज्ञान निरीक्षण, प्रयोग आणि तर्कावर अवलंबून आहे. हीच तत्त्वे इस्लामने एक हजार वर्षांपूर्वी मांडली होती. फरक फक्त उद्देशात आहे. विज्ञान 'विश्व कसे चालते' याचा शोध घेते. इस्लाम 'ते का अस्तित्वात आहे' हे देखील स्पष्ट करतो.
कुराणामध्ये असे अनेक संदर्भ आहेत, जे आधुनिक विज्ञानाने शतकांनंतर लावलेल्या शोधांशी जुळतात. उदाहरणार्थ, विश्वाच्या विस्ताराचे वर्णन सूरह अद-धारियात (५१:४७) मध्ये केले आहे: "आणि आम्ही आकाशाला शक्तीने बनवले, आणि निःसंशय, आम्हीच त्याचा विस्तार करत आहोत." त्याचप्रमाणे, सूरह अल-मु'मिनून (२३:१२-१४) मध्ये मानवी गर्भ विकासाचे सांगितलेले टप्पे, आधुनिक गर्भशास्त्राच्या निष्कर्षांशी जवळून जुळतात.
अशा प्रकारे, इस्लाम केवळ वैज्ञानिक तर्कालाच समर्थन देत नाही, तर त्याला नैतिक दिशा आणि उद्देशही देतो. आजच्या जगात, "विकासासाठी विज्ञान" हे केवळ आर्थिक किंवा तांत्रिक वाढीच्या पलीकडे गेले पाहिजे. संयुक्त राष्ट्रांनुसार, शाश्वत विकास हा वैज्ञानिक प्रगतीला सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण आणि जागतिक शांततेशी जोडतो. याच तत्त्वांवर कुराणमध्ये फार पूर्वीपासूनच भर दिला गेला आहे.
"आणि पृथ्वीवर सुधारणा झाल्यानंतर त्यात बिघाड (फसाद) पसरवू नका." (सूरह अल-अराफ, ५६)
हा श्लोक पर्यावरणाचा समतोल आणि जबाबदारीची गरज अधोरेखित करतो. खरी प्रगती तीच, जी माणूस, निसर्ग आणि पृथ्वी यांच्यात सलोखा राखते.
इस्लामिक दृष्टिकोनातून, विज्ञानाने केवळ भौतिक यशाचे ध्येय ठेवू नये. त्याने निर्मात्याशी (देवाशी) आध्यात्मिक जवळीक साधण्याचेही काम केले पाहिजे. प्रत्येक नवीन शोध हा देवाच्या शहाणपणाचे आणखी एक चिन्ह उघड करतो. यामुळे विश्वास ठेवणाऱ्यांच्या मनात श्रद्धा अधिक दृढ होते.
जेव्हा मुस्लिमांनी ज्ञान आणि संशोधनाला महत्त्व दिले, तेव्हा त्यांनी एकेकाळी जगाचे नेतृत्व केले. जेव्हा त्यांनी बौद्धिक प्रयत्नांपासून पाठ फिरवली आणि जिज्ञासेऐवजी आरामाचा शोध सुरू केला, तेव्हाच त्यांची घसरण सुरू झाली. आज, मुस्लिम जगाने आधुनिक विज्ञानाला नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांशी जोडून, इस्लामची खरी शिकवण पुनरुज्जीवित केली पाहिजे.
इस्लाम आणि विज्ञान हे संघर्षात नाहीत; ते एकमेकांना पूरक आहेत आणि एकमेकांना मजबूत करतात. इस्लाममध्ये, ज्ञान मिळवणे हे एक 'ईबादत' (उपासना) आहे. वैज्ञानिक शोध हा कुराणाच्या 'चिंतन आणि शोध' करण्याच्या आवाहनाला दिलेला प्रतिसाद आहे.
विज्ञानाला श्रद्धा आणि नीतिमत्तेचे मार्गदर्शन मिळाले, तर ते शांतता आणि मानवी कल्याणाचे साधन बनते. 'शांतता आणि विकासासाठीचा जागतिक विज्ञान दिन' आपल्याला आठवण करून देतो की, नैतिक दिशेशिवायचे ज्ञान विनाशकारी असू शकते. त्याचबरोबर, समजुतीशिवायची श्रद्धा घसरणीला कारणीभूत ठरते.
खरी प्रगती ही ज्ञान आणि श्रद्धा, तर्क आणि नैतिकता, विज्ञान आणि अध्यात्म यांच्या सुसंवादात आहे. इस्लाम शिकवतो की, शिक्षण मनाला प्रकाशमान करते आणि हृदयाला शुद्ध करते. जेव्हा विज्ञान चांगुलपणा, न्याय आणि शांततेची सेवा करते, तेव्हा ते पृथ्वीचे रक्षक म्हणून मानवतेचा विश्वास सार्थ ठरवते.
श्रद्धा विज्ञानाला उद्देश देते, आणि विज्ञान श्रद्धेला बळकट करते. दोन्ही मिळून एक संतुलित, ज्ञानी आणि शांततापूर्ण जग निर्माण करतात.
(लेखक अलिगढस्थित इस्लामिक विद्वान आणि लेखक आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -