जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने खचलेल्या जनतेच्या आणि पर्यटकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं. त्यांनी पहलगाम क्लब येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेतली आणि दहशतवादाला घाबरणार नाही, असा ठाम संदेश दिला. “पर्यटन आणि जम्मू-काश्मीरच्या विकासाला दहशतवाद खीळ घालू शकत नाही,” असं अब्दुल्ला यांनी स्पष्ट केलं.
पहलगाममधील ऐतिहासिक बैठक
जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाच्या बैठका नेहमीच उन्हाळ्यात राजधानी श्रीनगर किंवा हिवाळ्यात राजधानी जम्मू येथे होतात. मात्र, उमर अब्दुल्ला यांच्या कार्यकाळात प्रथमच ही बैठक या दोन शहरांबाहेर, दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या पहलगाम येथे घेण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाने ‘एक्स’वर या बैठकीची छायाचित्रे पोस्ट करत म्हटलं, “ही केवळ प्रशासकीय बैठक नव्हती, तर भ्याड दहशतवादी कृत्यांना आम्ही घाबरत नाही, हा संदेश होता. जम्मू-काश्मीर खंबीर, मजबूत आणि निर्भय आहे.”
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात २६ जणांचा बळी गेला. या हल्ल्याने काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर, अब्दुल्ला यांनी पहलगामच्या रहिवाशांना धीर देण्यासाठी आणि एकजुटीचं दर्शन घडवण्यासाठी ही बैठक आयोजित केली. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराला स्थान नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी देशविरोधी आणि समाजविरोधी शक्तींना दिला.
पर्यटन पुनरुज्जन आणि अमरनाथ यात्रेवर चर्चा
पहलगाममधील या बैठकीत मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने पर्यटन क्षेत्राच्या पुनरुज्जन, आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. मंत्री सकीना इट्टू यांनी सांगितलं, “ही बैठक पीडित कुटुंबांबरोबर एकजुटीचा संदेश देण्यासाठी होती.” तर मंत्री सतीश शर्मा यांनी सुरक्षा दलांचं कौतुक करत म्हटलं, “पहलगामच्या जनतेनं यापूर्वीही दहशतवादाचा सामना केलाय. आता पुन्हा आम्ही त्याला तोंड देऊ.”
अब्दुल्ला यांनी २४ मे रोजी निती आयोगाच्या बैठकीत केंद्र सरकारला काश्मीरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना (PSUs) काश्मीरमध्ये बैठका आयोजित करण्याची आणि संसदीय समित्यांच्या सत्रांचं आयोजन करण्याची सूचना केली. “पर्यटन हे संघर्षापासून अलिप्त असलं पाहिजे. ते सामान्यतेचं मापदंड नसावं,” असं ते म्हणाले.
अमित शहांचा संभाव्य दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २९ आणि ३० मे रोजी जम्मू-काश्मीरचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑपरेशन सिंदूरनंतरचा त्यांचा हा पहिला दौरा असेल. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची शक्यताही आहे. शहा यांनी यापूर्वी पहलगाम हल्ल्यानंतर २६ एप्रिल रोजी श्रीनगरला भेट देऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला होता.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter