दहशतवाद ही पाकिस्तानची युद्धनीती - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
गांधीनगरमधून  पंतप्रधान नरेंद्र मोदी
गांधीनगरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका करत दहशतवाद हा त्यांचा छुपा हल्ला नसून युद्धनीती असल्याचा घणाघात केला. “भारताच्या सैन्यापुढे काहीही चालत नसल्याने पाकिस्तानने सीमापार दहशतवादाचा आधार घेत भारताविरुद्ध युद्ध पुकारलं आहे,” असं ते म्हणाले. गांधीनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत सरदार वल्लभभाई पटेल यांचा 1947 चा सल्ला ऐकला असता, तर असे हल्ले टळले असते, असा दावा केला.

सरदार पटेलांचा सल्ला आणि ऐतिहासिक संदर्भ
मोदी म्हणाले, “१९४७ मध्ये भारताची फाळणी झाली. देशाचे तुकडे झाले. त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानने ‘मुजाहिदीन’ म्हणवणाऱ्या दहशतवाद्यांच्या मदतीने भारताचा भाग बळकावला. त्या वेळी सरदार पटेलांनी सांगितलं होतं, सशस्त्र दलांनी पाकव्याप्त काश्मीर पुन्हा घेईपर्यंत थांबू नये. त्या दहशतवाद्यांचा तिथेच नायनाट करायला हवा होता. पण त्यांचं कोणी ऐकलं नाही.”

पंतप्रधानांनी पुढे सांगितलं, “गेल्या ७५ वर्षांपासून आपण दहशतवादाविरुद्ध लढतोय. याच दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला केला. यामध्ये निष्पापांचा बळी गेला. भारताने प्रत्येक युद्धात पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पण हा प्रश्न कायम आहे.”

दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर टीका करत मोदी म्हणाले, “शरीर कितीही निरोगी असलं, तरी एक काटा टोचला, तरी सगळं अस्वस्थ होतं. आता आम्ही ठरवलं आहे, हा काटा काढायचाच.” ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत त्यांनी भारताच्या कठोर प्रत्युत्तराची आठवण करून दिली. भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबाच्या नऊ तळांवर हल्ले करत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सिंधू जलवाटप करार स्थगित
पंतप्रधानांनी सिंधू जलवाटप कराराचा (१९६०) करार स्थगित करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. “पाकिस्तानने भारताविरुद्ध दहशतवादाला प्रोत्साहन दिलं, त्याच्याशी पाण्याचं वाटप करणं योग्य नाही. हा करार काही दशकांपूर्वी झाला, पण आजच्या परिस्थितीत तो रद्द करणं आवश्यक आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

पाकिस्तानला इशारा
मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावलं, “शांतता हा पर्याय आहे. पण दहशतवाद सुरू राहिला, तर भारताचं प्रत्युत्तर कठोर असेल. आम्ही शून्य सहनशीलता धोरणावर ठाम आहोत.” त्यांनी पाकिस्तानच्या जनतेला आवाहन केलं, “तुमच्या देशाला दहशतवादमुक्त करायचं असेल, तर तुम्ही पुढे या. तुमच्या तरुणांनी विचार करावा, हा मार्ग तुम्हाला कुठे नेत आहे?” 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter