देशातील पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या मेहुल चोक्सी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पीएनबी बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मेहुल चोक्सी हा हिरे व्यापारी होता. १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे. मेहुल चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये त्याचा पुतण्या नीरव मोदीसह भारतातून पळून गेला. याप्रकरणी ईडी आणि सीबीआयने त्याला वाँटेड जाहीर केले होते. हा भारतातील दुसरा सर्वात मोठा बँक घोटाळा होता. हे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच चोक्सीने अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले होते. २०२१ मध्ये, जेव्हा तो क्युबाला जात होता, तेव्हा तो डोमिनिकामध्ये पकडला गेला.
काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सी आजारी असल्याची माहिती समोर आली होती. त्याला कॅन्सर झाला आहे अशीही शक्यता तेव्हा वर्तवण्यात आली होती. दरम्यान सीबीआयच्या विनंतीनंतर मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे.
मेहुल चोक्सीवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीच्या जप्त केलेल्या साऱ्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया तपासयंत्रणेने सुरू केली आहे. जेणेकरून त्याची आर्थिक कोंडी करणे शक्य होईल. मात्र मेहुल चोक्सीने प्रकृती अस्वस्थ्याचे कारण देऊन तूर्तास भारतात परतण्यास शक्य नाही असे त्याच्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे मेहुल चोक्सीची भारतात येण्याची प्रक्रिया आणखी काही काळासाठी पुढे गेल्याची माहिती फेब्रुवारी महिन्यात समोर आली होती.
दरम्यान मेहुल चोक्सीचा पासपोर्ट भारत सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. पीएमएलए न्यायालयात चोक्सीच्या पासपोर्टच्या निलंबनासंदर्भातील कागदपत्रे आणि त्याच्याविरुद्ध ईडीच्या प्रकरणाच्या तपास फाईल्स मागवण्याचे निर्देशही यापूर्वी देण्यात आले होते. बेल्जियम पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक केल्याने आता त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे असंही म्हटले जाते आहे.
मुंबई न्यायालयाच्या वॉरंटचा हवाला
मेहुल चोक्सीला अटक करताना, बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला. अहवालात म्हटले आहे की हे वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आले होते. तथापि, असे म्हटले जात आहे की मेहुल चोक्सी प्रकृती बिघडणे आणि इतर कारणांमुळे जामीन आणि तात्काळ सुटका मागू शकतो.