'चले जाव' चळवळीच्या स्मरणार्थ देशभर ९ ऑगस्ट हा दिवस 'ऑगस्ट क्रांतिदिन' म्हणून साजरा केला जातो. २०१७ मध्ये 'चले जाव'ला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी साप्ताहिक साधनाने 'चले जाव' विशेषांक प्रकाशित केला होता. या विशेषांकाच्या निमित्ताने 'चले जाव' आंदोलनात गांधी, नेहरू, पटेल, आझाद या प्रभृतींनी केलेली भाषणे ७१ वर्षांनी पहिल्यांदाच मराठी वाचकांसमोर आली. या विशेषांकाच्या संपादकीयमध्ये 'चले जाव'ची पार्श्वभूमी, तिथला माहौल, चार नेत्यांची भाषणे, ऐतिहासिक घोषणा आणि त्याची मराठी पुस्तिका यांचा रोमहर्षक आढावा घेण्यात आला होता. 'चले जाव' विशेषांकातील ते संपादकीय किरकोळ संपादकीय संस्कार करून 'आवाज मराठी' वरून पुनःप्रकाशित करत आहोत. लेखाच्या शेवटी साधनेच्या 'चले जाव' विशेषांकाची लिंकही देण्यात आली आहे.
- संपादक
८ ऑगस्ट १९४२ रोजी, मुंबई येथील गवालिया टँक मैदानावर काँग्रेसच्या वतीने ‘चलेजाव’ची घोषणा केली गेली आणि ‘ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे’, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. तो निर्वाणीचा इशारा देण्याचा निर्णय १४ जुलै १९४२ रोजी, वर्धा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. ७ व ८ ऑगस्ट १९४२ रोजी, मुंबईत झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत तसा ठराव मंजूर करण्यात आला होता आणि त्यावर अखेरचे शिक्कामोर्तब ८ ऑगस्टच्या संध्याकाळी गवालिया टँक मैदानावरील जाहीर सभेत झाले. त्यावेळी मैदानावरील मंडपात काँग्रेसचे दहा हजार प्रतिनिधी उपस्थित होते आणि मंडपाच्या बाहेर काही लाखांचा जनसमुदाय होता.
'चले जाव' ची घोषणा अशी आली आकाराला...
ब्रिटिशांना अखेरचा इशारा देणारे आंदोलन व त्यासाठीचे नेमके शब्द काय असावेत, याबाबत गांधीजींनी अनेकांशी चर्चा केली होती. त्यापैकी काहींनी ‘गेट आऊट’ हा शब्दप्रयोग सुचवलाहोता, पण तो उद्धट आहे (पोलाईट नाही) या कारणामुळे गांधीजींनी नाकारला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ‘रिट्रीट इंडिया’ किंवा ‘विथ ड्रॉ इंडिया’ असे दोन पर्याय पुढे केले होते, परंतु सर्वसामान्यांपर्यंत आशय पोचवण्यास ते शब्द तितकेसे सुलभ नाहीत, म्हणून गांधीजींनी ते शब्दप्रयोगही नाकारले होते.
त्याचदरम्यान युसुफ मेहेरअली यांनी ‘क्विट इंडिया’ हा शब्दप्रयोग सुचवला आणि गांधीजींनी तो तत्काळ मान्य केला. कारण त्या शब्दप्रयोगात कणखरपणा आहे, उद्धटपणा नाही. शिवाय ‘भारत छोडो’, ‘चले जाव’ ही त्यांची रूपांतरे जनमानसाची पकड घेणारी आहेत.
८ ऑगस्टच्या त्या ऐतिहासिक सभेत चौघांची भाषणे झाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मौलाना अबुल कलाम आझाद होते, त्यामुळे त्यांचे भाषण सर्वप्रथम झाले. नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव सभेपुढे वाचून दाखवला आणि ठरावाचे समर्थन करणारे भाषण केले. त्यानंतर त्या ठरावाला अनुमोदन देणारे भाषण सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. आणि मग महात्मा गांधी यांनी, ‘हा ठराव सभेने मंजूर करावा’ असे आवाहन करणारे प्रास्ताविक भाषण केले. तो ठराव उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून मंजूर केला. ठरावाच्या विरोधात ज्या १३ कम्युनिस्ट प्रतिनिधींनी मत नोंदवले ते सर्वजण काँग्रेसचेही सभासद होते.
ठरावाला उपस्थित प्रतिनिधींची मंजुरी मिळाल्यानंतर गांधीजींनी लढ्यामागची कारणमीमांसा आणि पुढची दिशा यांवर हिंदीतून मुख्य भाषण केले आणि समारोपाचे भाषण इंग्रजीतून केले. ही तिन्ही भाषणे मिळून गांधीजी जवळपास सव्वादोन तास त्या सभेत बोलले. सायंकाळी ६ वाजता सुरू झालेली ती सभा रात्री १० पर्यंत चालली होती.
युसुफ मेहरअली आणि त्यांच्या लोकप्रिय घोषणा
‘क्विट इंडिया’ सारखा शब्द सुचण्यात केवळ योगायोग नसतो, त्यामागेही काही पूर्वतयारी किंवा कार्यकारणभाव असतो. युसुफ मेहेरअली यांना ती घोषणा सुचली, यामागचा कार्यकारणभाव दाखवता येतो. त्याआधी चौदा वर्षे म्हणजे १९२८ मध्ये जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन ब्रिटिशसरकारकडून भारतात पाठवण्यात आले होते. त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता; त्यामुळे त्या कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला होता.
जेव्हा ते कमिशन मुंबईच्या बंदरात उतरले(३ फेब्रुवारी १९२८ रोजी) तेव्हा ‘बॉम्बे युथ लीग’ या संघटनेच्या वतीने भल्या पहाटे बंदरावर जाऊन निदर्शने केली गेली होती. त्या तरुणाईच्या संघटनेचे नेते युसुफ मेहेरअली होते, आणि तेव्हा त्यांनी ‘सायमन, गो बॅक’ (सायमन, परत जा) अशी घोषणा दिली होती. तो शब्दप्रयोग इतका क्लिक झाला की, ते कमिशन भारतात जिथे-जिथे गेले तिथे-तिथे ‘सायमन, परत जा’ असे फलक झळकावून त्यांचे स्वागत(?) केले गेले. असे हे युसुफ मेहेरअली, ‘चले जाव’चे आंदोलन पुकारले गेले तेव्हा मुंबई शहराचे महापौर होते; काँग्रेसमधील समाजवादी विचारांच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यामुळे... युसुफ मेहेरअली यांचेही स्मरण करायला हवे.
'चले जाव'मधील गांधी, नेहरू, पटेल, आझाद यांची भाषणे
९ ऑगस्टच्या पहाटे, गांधी, नेहरू, पटेल, आझाद यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले. त्या चौघांच्या भाषणांचे त्रोटक वृत्तांत वृत्तपत्रांतून आले. परंतु नंतर त्या भाषणांच्या प्रकाशनावर सरकारने बंदी आणली. परिणामी, ती भाषणे देशभरातील मोठ्या जनसमूहांपर्यंत पोहोचलीच नाहीत. १९४६ मध्ये पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार अस्तित्वात आले, तेव्हा त्या भाषणांवरील बंदी उठवण्यात आली. त्यावेळी पुणे येथील स्वतंत्र हिंदुस्थान प्रकाशनाच्या वतीने, त्या चौघांच्या भाषणांची मराठी व इंग्रजी आवृत्ती तयार करून दोन स्वतंत्र पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या. माधव काशिनाथ दामले हे गृहस्थ ‘स्वतंत्र हिंदुस्तान प्रकाशन’ चालवत होते. तेच त्या पुस्तिकांचे संपादकही होते. मराठी पुस्तिका त्यांनी नोव्हेंबर १९४६ मध्ये प्रकाशित केली आणि तिचे शीर्षक ‘जगाला आव्हान’ असे दिले होते.
'जगाला आव्हान' या पुस्तिकेची वैशिष्ट्ये
दरम्यानच्या काळात, त्या चौघांची ती संपूर्ण भाषणे मराठीत अन्यत्र कुठेही प्रसिद्ध झालेली नसावीत, असे दिसते. कारण गांधीजींचे भाषण त्यांच्या संकलित वाङमयात व इंटरनेटवरही (इंग्रजीत) उपलब्ध आहे, परंतु त्याचा मराठी अनुवाद अन्य कोणीही प्रसिद्ध केल्याचे आढळले नाही. नेहरू, आझाद व पटेल यांची भाषणे इंग्रजीतही सहजासहजी उपलब्ध नाहीत, त्यांचाही मराठी अनुवाद झालेला असण्याची शक्यता फार कमी आहे.
माधव काशिनाथ दामले यांनी त्या पुस्तिकेला छोटेसे प्रास्ताविक लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘या भाषणांचा अनुवादकर्ता इतका प्रसिद्धीपराङमुख आहे की, तो अनुवादक म्हणून स्वत:चे नावही पुस्तिकेवर लावू इच्छित नाही.’ त्या अनामिक अनुवादकाने केलेला अनुवाद ‘अप्रतिम’ या संज्ञेस पात्र ठरणारा आहे, प्रस्तुत अंक वाचल्यावर हे कोणाच्याही लक्षात येईल. गांधीजींच्या भाषणांच्या इंग्रजी आवृत्तीशी हा अनुवाद आम्ही तपासून पाहिला आहे. आशयातील अचूकता आणि भाषेचा प्रवाहीपणा तर यात आहेच, पण मुख्य म्हणजे त्या भाषणांतील तेज व आवेश यांचेही रूपांतर नेमकेपणाने करण्यात तो अनुवादक यशस्वी ठरला आहे. ही भाषणे मराठीतूनच केली गेलीत, असे वाटण्याइतपत हा अनुवाद प्रभावी झाला आहे. त्या पुस्तिकेचे शीर्षक ‘जगाला आव्हान’ असे देण्यात माधव काशिनाथ दामले यांनी जरा अतिशयोक्ती केली, असे आज वाटू शकते. परंतु त्या वेळची एकूण परिस्थिती लक्षात घेतली तर त्याला अयोग्य म्हणता येणार नाही.
साधनेच्या 'चले जाव' विशेषांकाची वैशिष्ट्ये
दुर्मिळ झालेल्या भाषणांच्या या पुस्तिकेची एक प्रत बारा-तेरा वर्षांपूर्वी हाती लागली होती आणि तेव्हापासून ती सर्व भाषणे साधनाच्या वाचकांसमोर आणण्याचा विचार होता. २०१७ मध्ये ‘चले जाव’च्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने विशेषांकाच्या रूपाने ती प्रसिद्ध झाली. आता ही भाषणे पुस्तिकेच्या स्वरुपात उपलब्ध आहेत.