‘द न्यू वर्ल्ड’ : भारताच्या नीतिमत्तापूर्ण जागतिक नेतृत्वाचा नवा आराखडा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
'द न्यू वर्ल्ड' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी आपले विचार मांडताना रणनीतीतज्ज्ञ, विचारवंत आणि या पुस्तकाचे लेखक राम माधव
'द न्यू वर्ल्ड' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी आपले विचार मांडताना रणनीतीतज्ज्ञ, विचारवंत आणि या पुस्तकाचे लेखक राम माधव

 

आज आपण सर्वोत्तम परंतु त्याचवेळी सर्वांत वाईट काळात जगत आहोत. आजचं जग म्हणजे एक प्रकारचं कोडंच बनलं आहे. बाहेरून समाधानकारक, परंतु आतून अतिशय अस्थिर. जागतिक तणाव, हिंसक संघर्ष आणि राजकीय विखंडन या गोष्टी आपल्या शांतता आणि प्रगतीसमोर आव्हाने उभी करत आहेत.

'या जगात नक्की काय चाललंय?' आकाशातून क्षेपणास्त्रांचा मारा होत असताना हा प्रश्न आपल्याला सतावतोय. कित्येक घरे आणि अनेक आयुष्यं उद्ध्वस्त होत आहेत. इस्रायल-इराणमधील वाढता तणाव असो किंवा जगभरातील इतर संघर्ष, हिंसा बऱ्याचदा मानवी शांततेवर विजय मिळवताना दिसतेय. 

शिक्षणव्यवस्था सुधारली, आरोग्यसेवा चांगली झाली, गरिबी कमी झाली. परंतु या सकारात्मक बाबी युद्ध आणि अराजकाच्या गोंगाटात मागे पडल्या आहेत. 

अशावेळी इतिहास स्वतःला पुन्हा सिद्ध करत असतो. मागील युद्धांचे आघात आणि तकलादू सांस्कृतिक वारसा आपल्याला आठवण करून देतो की शांतीचा पडदा किती पातळ आहे. एका जुन्या म्हणीप्रमाणे, जग तितकंक चांगलं किंवा वाईट असतं, जितकं तुम्ही पाहू इच्छिता.

आजच्या भूराजकीय वातावरणात वर्चस्व हाच नियम दिसतो. त्यामुळे शांततापूर्ण सहजीवन आता अपवाद बनले आहे. असुरक्षितता आणि अविश्वास वाढतो आहे, आणि भौतिक लाभासाठी सत्तेचा पाठलाग हे एक अखंड दुष्टचक्र बनले आहे. यामुळे खरा संवाद आणि परस्पर सहकार्य यांच्या संधी दडपल्या जात आहेत.

अराजकता किंवा त्याच्या जवळ जाणारी परिस्थिती हीच जणू पाश्चात्य उदार जगव्यवस्थेची नवी ओळख बनली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आणि शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर आकाराला आलेली ही व्यवस्था आता ढासळताना दिसत आहे. मग आता पुढे काय? आणि महत्त्वाचं म्हणजे, भविष्य घडवण्यामध्ये भारताने नेमकी कोणती भूमिका घ्यायला हवी?

या प्रश्नांचं उत्तर ‘द न्यू वर्ल्ड: २१व्या शतकातील जागतिक व्यवस्था आणि भारत’ या पुस्तकात आहे. रणनीतीतज्ज्ञ आणि विचारवंत राम माधव यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. भारतीय राजकारणातील उजव्या विचारसरणीशी त्यांचे नाव जोडले जाते. या पुस्तकात जागतिक बदलांचे ताजे आणि सखोल विश्लेषण केलेले आहे. तसेच भारताचे संभाव्य मार्गही या पुस्तकात बारकाईने मांडलेले आहेत.

काहीशा अस्वस्थ करणाऱ्या पण महत्त्वाच्या प्रश्नांना भिडण्याची तयारी दाखवल्यामुळे या पुस्तकाचे सर्वच स्तरावर विशेष कौतुक होत आहे. 
 
'द न्यू वर्ल्ड' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी डावीकडून - माजी विदेश सचिव श्याम सरन, ज्येष्ठ राजकारणी आणि अभ्यासक सुरेश प्रभू, उपराष्ट्रपती जगदीप धनकर, कॉंग्रेसचे खासदार मनोज तिवारी आणि पुस्तकाचे लेखक राम माधव.

पाश्चात्य उदारमतवादी व्यवस्थेला खरंच उतरती कळा लागली आहे का? त्याची जागा आता कोणत्या विचाराने घ्यायला घ्यावी? आणि त्या प्रक्रियेत भारताने स्वतःचं स्थान कसे निर्माण करायला हवं, या आणि अशा प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून वाचकांना मिळतात. फ्रान्सिस फुकुयामा, सॅम्युएल हंटिंग्टन, तारिक अली यांसारख्या विचारवंतांनी जागतिक संघर्षाची मुळं—मग ती विचारसरणी, संस्कृती किंवा धर्म असोत—यावर विस्तृत चर्चा केली आहे. पण सलोखा, नीतिमत्ता आणि परस्पर आदर यांच्यावर आधारित नव्या जागतिकव्यवस्थेची सकारात्मक दृष्टी फार कमी जणांनी मांडली आहे.आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून माधव यांनी नेमकी हीक उणीव भरून काढली आहे.

नव्याने आकाराला येऊ पाहणारी जागतिक व्यवस्था चिरकालीन मानवी मूल्यांवर उभारली पाहिजे, केवळ सत्तेच्या रचनांवर नाही. भूतकाळातील चुका मान्य करून त्या सुधारल्या पाहिजेत. केवळ अवशेष म्हणून नाही, तर सहजीवनाला मार्गदर्शन करणाऱ्या जिवंत परंपरा म्हणून सांस्कृतिक वारसा जपला गेला पाहिजे. बहुध्रुवीय जगात जर अण्वस्त्रधारी इराण धोका ठरतोय, तर भविष्यात पाकिस्तानही त्याला अपवाद नाही.एकासाठी योग्य असणारी बाब दुसऱ्यासाठीही उपयोगी ठरायला हवी. हुकूमशाही कालबाह्य व्हायला हवी.

राम माधव आपल्या पुस्तकात लिहितात, “भारताच्या भूमिकेमुळे अनेक देशांनी संयुक्त राष्ट्रांत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे पाश्चात्य शक्तींना धक्का बसला.” सत्तासमूहांमध्ये सामील न होण्याचा हा निर्णय भारताचा जागतिक मंचावरील वाढत्या आत्मविश्वासाचे द्योतक आहे. आणि हा एक संयमी मात्र प्रभावी कूटनीतिक बदल आहे.

पुस्तक प्रकाशनावेळी माधव यांनी प्रभावी आणि भविष्यवेधी राष्ट्रीय अख्यानाची गरज अधोरेखित केली. त्याला त्यांनी 'ब्रँड भारत' असं म्हटलं. हा केवळ प्रतिमा निर्माणाचा प्रयत्न नाही. तर खंडित जगात भारताने आपली भूमिका नव्याने  परिभाषित करण्याचे आवाहन आहे.

आज खासगी कंपन्या अनेक सरकारांइतके प्रभाव टाकत आहेत. दुसरीकडे पुराणमतवाद पुन्हा डोके वर काढतो आहे. गैर-राज्य घटकांना (non-state actors) अभूतपूर्व शक्ती मिळाली आहे. अशा जगात अमेरिकाप्रणीत जुनी रचनेचे पुनरुज्जीवन अशक्य आहे बहुध्रुवीय जग अपरिहार्य आहे आणि ते आता अस्तित्वात आलं आहे.

मात्र त्याच वेळी माधव बहुध्रुवीयतेच्या सुलभीकरण करणाऱ्या दृष्टिकोनाविषयीही सावध करताना म्हणतात, “सर्व ध्रुवांकडे समान शक्ती असावी हे गृहीतकच मुळी चुकीचं आहे. वेगवेगळ्या राष्ट्रांची ताकद वेगवेगळी असते. कधीकधी या असमानतेमुळेच पारंपरिक महासत्ताही प्रभावहीन ठरतात.”

भारताने या समानतेच्या मागे न लागता नीतिमत्तापूर्ण नेतृत्व स्वीकारावं, असं माधव सुचवतात. यालाच ते 'धर्मतंत्र' (Dharmacracy) म्हणतात. पाश्चात्य नोकरशाहीच्या तांत्रिक ताठरपणाच्या उलट, धर्मतंत्र म्हणजे शासनाला नीतिमत्तेच्या आणि सभ्यतेच्या मूल्यांचा आधार घेत योग्य गोष्ट करणं.

पुस्तकाच्या प्रकाशनावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी याच भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “हे पुस्तक उदारमतवादी व्यवस्था आणि भारताने जपलेली ओळख यांचे प्रतिबिंब आहे. भारताचा उदय हा सर्वांसाठी हितकारकच ठरला आहे. तो कोणासाठीही हानिकारक नाही. आम्ही स्वतःला सकारात्मक शक्ती म्हणून सिद्ध करून दाखवलं आहे.”

१४ प्रकरणांमध्ये  विभागलेले ‘द न्यू वर्ल्ड’ हे पुस्तक जागतिक व्यवस्थेतील भारताच्या महत्त्वाच्या स्थानाचा व्यापक आराखडा मांडते. त्यामध्ये भूराजकीय रणनीती, आर्थिक लवचिकता, पर्यावरणीय जबाबदारी आणि सामाजिक बदल या पैलूंचा समावेश आहे.

जागतिक अराजकतेच्या काळात, माधव आपल्याला आठवण करून देतात की भविष्य केवळ धोरणे किंवा सत्तेने नव्हे तर तत्व आणि मूल्यांनी घडवले जाते. त्यांचा संदेश स्पष्ट आहे :नीतिमत्तेचा आधार नसेल तर राष्ट्र दिशाहीन राहतात आणि जगाची व्यवस्था कितीही बारकाईने रचली तरी ती नीतिमत्तेविना ती अस्थिरच राहील.

आपण इतिहासाच्या निर्णायक वळणावर आहोत. जिथे जुन्या रचना कोसळत आहेत. नवी जागतिक रचना जन्माला येण्यासाठी धडपडत आहे. ‘द न्यू वर्ल्ड’मध्ये राम माधव केवळ विश्लेषणच करून थांबत  नाहीत, तर त्यात ते एक आराखडा मांडतात. भारताने आपला नीतिमत्तापूर्ण वारसा स्वीकारावा, आपला अनोखा विचार मांडावा आणि वर्चस्वापेक्षा सौहार्दाला महत्त्व देणारं जग घडवावं, असं आवाहन ते करतात. 

या खंडित युगात आपल्याला नव्या जागतिक व्यवस्थेपेक्षा नव्या जागतिक नीतिमत्तेची गरज आहे.

- आतिर खान 
(लेखक 'आवाज द व्हॉइस'चे मुख्य संपादक आहेत.)
 


The New World: 21st Century Global Order and India
(द न्यू वर्ल्ड : २१व्या शतकातील जागतिक व्यवस्था आणि भारत)
राम माधव 
रूपा पब्लिकेशन्स 
पृष्ठे - ४०८


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter