ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 22 h ago
Renowned Ecologist Madhav Gadgil Passes Away at 82 in Pune
Renowned Ecologist Madhav Gadgil Passes Away at 82 in Pune

 

प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आणि पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी सातत्याने आवाज उठवणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे बुधवारी (७ जानेवारी २०२६) रात्री उशिरा पुण्यात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. अल्पशा आजारानंतर पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी दिली.

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माधव गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शक आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पश्चिम घाटाचा संवर्धनकर्ता
डॉ. माधव गाडगीळ हे त्यांच्या 'पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समिती'च्या (गाडगीळ समिती) अहवालासाठी विशेष ओळखले जातात. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी दिलेला हा अहवाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. या कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल २०२४ मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांना पर्यावरणातील सर्वोच्च 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

आपल्या अहवालात त्यांनी पश्चिम घाटातील अतिसंवेदनशील भागांत रस्ते बांधणी, उत्खनन आणि बांधकाम क्षेत्रावर कडक निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. निसर्गावर लादलेले विकासाचे मॉडेल हे लोकांच्या विरोधात नसून ते निसर्गाच्या हिताचे असावे, असा त्यांचा नेहमीच आग्रह होता.

शैक्षणिक वारसा आणि कार्य
डॉ. माधव गाडगीळ हे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांचे सुपुत्र होते. त्यांचे शिक्षण पुणे आणि मुंबईत झाले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून 'मॅथेमॅटिकल इकोलॉजी' या विषयात पीएचडी मिळवली. अशा प्रकारची पदवी मिळवणारे ते पहिलेच जीवशास्त्राचे विद्यार्थी ठरले.

१९८३ मध्ये त्यांनी 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' (IISc) मध्ये पर्यावरण केंद्राची स्थापना केली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत उत्क्रांती, संवर्धन आणि मानवी पर्यावरण या विषयांवर २२५ हून अधिक शोधनिबंध लिहिले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना 'शांती स्वरूप भटनागर' पुरस्कार, 'पद्मश्री' आणि 'पद्मभूषण' या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

महत्त्वाचा वाटा
१९८६ मध्ये भारतातील पहिल्या 'बायोस्फीयर रिझर्व्ह' प्रकल्पाचा प्रस्ताव मांडण्यात तसेच २००३ चा जैवविविधता कायदा आणि २००६ चा वन हक्क कायदा तयार करण्यात गाडगीळ यांचा मोठा सहभाग होता. निसर्ग हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो मानवी अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे, हे त्यांनी आयुष्यभर जपले. त्यांच्या निधनाने पर्यावरण चळवळीतील एक मोठा आधारवड कोसळला आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी सुलोचना गाडगीळ, ज्या स्वतः हवामान क्षेत्रातील तज्ज्ञ होत्या, त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते.