खान साहेबांनी परत केले भंगारात सापडलेले १५ लाखांचे सोन्याचे दागिने

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
भंगाराचा व्यवसाय करणारे खान साहेब
भंगाराचा व्यवसाय करणारे खान साहेब

 

दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरीदाबाद या औद्योगिक शहरातून एक अशी बातमी समोर आली आहे, जिने अनेकांची मने जिंकली आहेत. जेव्हा माणुसकी आणि विश्वासावरून उडत चाललेला भरवसा डळमळीत होऊ लागतो, तेव्हा असे किस्से आशेचा किरण जागवतात. एका भंगारवाल्याने (कबाडी) तब्बल चार महिन्यांनंतर सुमारे १०० ग्रॅम सोने त्याच्या खऱ्या मालकाला परत केले. हे सोने चुकून भंगारात गेले होते. कुटुंबाने ते परत मिळण्याची आशा जवळपास सोडूनच दिली होती. मात्र, प्रामाणिकपणाने अखेर आपला मार्ग शोधून काढलाच.

ही घटना हरियाणातील आहे. येथे भंगाराचा व्यवसाय करणारे खान साहेब यांनी असा आदर्श प्रस्थापित केला आहे, ज्याची चर्चा आता दूरवर होत आहे. त्यांनी तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यात जमा केले आणि नंतर ते खऱ्या मालकाकडे सोपवले. त्यांच्या या प्रामाणिक हेतूमुळे सर्वांचीच मान अभिमानाने उंचावली आहे.

या घटनेची सुरुवात गेल्या वर्षी जानेवारीत झाली. फरीदाबादचे रहिवासी अशोक शर्मा आपल्या कुटुंबासह कुंभमेळ्याला जाणार होते. घर काही दिवसांसाठी रिकामे राहणार असल्याने त्यांना चोरीची भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी मौल्यवान दागिने अशा ठिकाणी लपवून ठेवण्याचा विचार केला, जिथे कोणाचेही लक्ष जाणार नाही. त्यांनी सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने एका जुन्या डब्यात ठेवले आणि तो डबा चक्क भंगाराच्या पोत्यात लपवून ठेवला. कोणताही चोर भंगारात मौल्यवान वस्तू शोधणार नाही, हा त्यामागचा विचार होता.

यात्रा पूर्ण झाली. काळ पुढे सरकला आणि आयुष्य नेहमीच्या गतीने सुरू राहिले. त्यानंतर दिवाळी आली. घराची साफसफाई सुरू झाली. जुने सामान वेगळे करण्यात आले आणि भंगार विकण्याची तयारी सुरू झाली. या गडबडीत ते पोतेही भंगार समजून वेगळे काढले गेले. दागिने लपवलेला डबा त्याच पोत्यात आहे, याचा कुटुंबाला पूर्णपणे विसर पडला होता. अखेर ते पोते भंगारवाल्याला विकले गेले.

काही दिवसांनंतर दिवाळीच्या पूजेच्या तयारीत दागिन्यांची गरज भासली. कपाट उघडले गेले, डब्याची शोधाशोध सुरू झाली; पण तो कुठेच सापडला नाही. घरात एकच धांदल उडाली. हळूहळू सत्य समोर आले. दागिने भंगाराच्या पोत्यात ठेवल्याचे आणि तेच पोते विकले गेल्याचे सर्वांना आठवले. हे लक्षात येताच कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. सुमारे १०० ग्रॅम सोने, ज्याची किंमत साधारण १५ लाख रुपये होती, ते सर्व हातचे गेले होते.

कुटुंब तातडीने त्या भंगारवाल्याकडे पोहोचले. त्यांनी आपली चूक सांगितली आणि दागिने कदाचित भंगारात आले असावेत, अशी शंका व्यक्त केली. भंगारवाल्याने त्यावेळी गोदामात शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण भंगाराचा ढिगारा खूप मोठा होता. हाती काहीच लागले नाही. कुटुंब निराश होऊन परतले. दिवस उलटत गेले आणि आशा मावळू लागली.

असेच चार महिने लोटले. मग एके दिवशी गोदामातील सामानाची तपासणी करत असताना खान साहेब यांची नजर एका जुन्या डब्यावर पडली. तो डबा काहीसा वेगळा वाटल्याने त्यांनी तो उघडला. आत चक्क सोन्याचे दागिने होते. सुरुवातीला त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. मग त्यांनी बारकाईने पाहिले. हे तेच दागिने होते, ज्यांच्या शोधात शर्मा कुटुंब आले होते. खान साहेब यांनी तत्काळ ओळखले की ही संपत्ती आपली नाही. ती दुसऱ्या कोणाची तरी आहे आणि कदाचित त्याच कुटुंबाची असावी, जे काही महिन्यांपूर्वी येथे आले होते.

त्यांनी डबा बंद केला आणि घरी जाऊन कुटुंबाला सर्व हकीकत सांगितली. गोदामात सोने सापडले असून ते परत करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. घरच्यांनीही त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. कोणीही पैशांचा मोह धरला नाही. 'जे आपले नाही, ते जवळ ठेवणे योग्य नाही,' असे सर्वांनी एकमुखाने सांगितले.

खान साहेब यांचे गोदाम भगतसिंग कॉलनीजवळील शेती फार्मजवळ आहे. तिथे नेहमीच भंगाराचा मोठा ढिगारा असतो. इतक्या महिन्यांनंतर तो डबा सापडणे हेच मुळात एका आश्चर्यापेक्षा कमी नव्हते. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तो डबा योग्य हातांपर्यंत पोहोचवणे ही होती. खान साहेब यांनी पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर एसीपी जतिश मल्होत्रा यांच्या उपस्थितीत हे दागिने अशोक शर्मा आणि त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.

जेव्हा कुटुंबाने आपले दागिने पुन्हा पाहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. चार महिन्यांनंतर आपले हरवलेले सोने पुन्हा मिळेल, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. खान साहेब यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितले की, "आम्ही हरामचे खात नाही. आमचा कष्टाच्या कमाईवर विश्वास आहे. जी वस्तू आपली नाही, ती ठेवून घेणे चुकीचे आहे." त्यांचे शब्द साधे होते, पण त्याचा प्रभाव खूप खोल होता. "एखाद्याची ठेव त्याला सुखरूप परत करण्यातच खरे समाधान आहे," असेही ते म्हणाले.

या घटनेने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे. अनेकदा फसवणूक आणि लालचेच्याच बातम्या कानावर पडतात. अशा वातावरणात ही गोष्ट खूप वेगळी आहे. इथे एक साधासुधा जीवन जगणारा भंगारवाला आहे; पण तो आपल्या तत्त्वांशी ठाम आहे. त्याच्यासमोर एक मोठी संधी होती. त्याने ते सोने ठेवले असते तरी कोणालाही काहीच समजले नसते. मात्र, त्याने योग्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग निवडला.

शर्मा कुटुंबानेही आपली चूक मान्य केली. निष्काळजीपणा आपलाच होता, हे त्यांनी कबूल केले. पण त्याच वेळी, या जगात अजूनही चांगली माणसे अस्तित्वात आहेत आणि त्यांनी आपला विश्वास तुटू दिला नाही, याची जाणीवही त्यांना झाली.

आज या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. लोक खान साहेब यांच्या प्रामाणिकपणाचे तोंडभरून कौतुक करत आहेत. ही केवळ सोने परत केल्याची गोष्ट नाही; तर ती विश्वासाची आणि माणुसकीची कहाणी आहे. प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे, हेच यातून सिद्ध होते. छोट्या वस्त्यांमध्ये असे मोठ्या मनाचे लोक राहतात. त्यांच्याकडे कदाचित संपत्ती कमी असेल, पण त्यांचे चारित्र्य खूप मोठे असते. खान साहेब यांनी जे केले, ते कायद्याच्या भीतीपोटी नाही, तर स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला जागून केले. आणि हीच गोष्ट त्यांना खास बनवते.

कधी कधी आयुष्य आपली परीक्षा घेते. एक डबा... त्यात ठेवलेले सोने... आणि समोर उभा ठाकलेला मोह... अशा वेळी जो योग्य निर्णय घेतो, तोच खरा श्रीमंत असतो. फरीदाबादच्या या घटनेने हेच सिद्ध केले आहे की, प्रामाणिकपणा हाच जगातील सर्वात मौल्यवान दागिना आहे!


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter