१९७०च्या दशकात देशाचे प्रेरणास्रोत बनलेले पाच भारतीय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
अल्बर्ट एक्का, राजेश खन्ना, विजय अमृतराज, किरण बेदी, सुनील गावसकर
अल्बर्ट एक्का, राजेश खन्ना, विजय अमृतराज, किरण बेदी, सुनील गावसकर

 

साकिब सलीम 

 
१९७०चे दशक देशातील अनेक मोठ्या घटनांनी गाजले होते. याच काळात भारताचा पहिला अणुचाचणी प्रयोग झाला. पाकिस्तानचा पराभव झाला. देशात आणीबाणी लागली. जनता पक्षाचा उदय आणि पतन झाले. तर याच काळात संजय गांधी यांचा प्रभावही वाढला.  या स्फोटक दशकातील पाच युवा आदर्शांविषयी लेखातून जाणून घेऊया.   
 
किरण बेदी :

१९७२मध्ये भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिला किरण बेदी निश्चितच तरुण मुलींसाठी एक आदर्श आहेत. त्या काळात पोलिसिंगसारखी कठीण कामे आणि उच्च प्रशासकीय पदे महिलांसाठी अयोग्य मानली जात होती. वयाच्या २३व्या वर्षी किरण बेदी यांनी ही मान्यता मोडीत काढली. 
 

अमृतसरमध्ये शिक्षण घेताना त्यांनी लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली. अनेक राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी जिंकल्या. १९७०मध्ये बेदी यांनी अमृतसरच्या खालसा कॉलेजमध्ये अध्यापन सुरू केले. पण तिथेच त्या थांबल्या नाहीत. १९७२मध्ये त्या आयपीएसमध्ये पहिल्या महिला अधिकारी बनल्या. १९७५मध्ये त्यांची पहिली नियुक्ती दिल्लीत झाली. ते आंतरराष्ट्रीय महिला वर्ष होते. त्याच वर्षी त्यांनी नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पोलिस पथकाचे नेतृत्व केले. महिलाही पोलिसांचे नेतृत्व करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले.

नोव्हेंबर १९७८मध्ये निरंकारीविरुद्ध अकालींच्या आंदोलनात हिंसाचार उसळला. डीसीपी असलेल्या किरण बेदी यांनी डोक्याला जखम झालेली असतानाही परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. यासाठी १९७९मध्ये त्यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक मिळाले. भारतात नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण मुलींसाठी किरण बेदी आजही प्रेरणास्थान आहेत.  

विजय अमृतराज :

१९७३-१९७४ मध्ये विजय अमृतराज यांनी रॉड लेव्हर आणि ब्योर्न बोर्ग यांसारख्या टेनिस दिग्गजांना हरवून जगाला आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे भारतात टेनिस हा प्रमुख खेळ म्हणून पाहिला जाऊ लागला. 
 

३० जुलै १९७३ ला ‘द टेलिग्राफ’ने लिहिले की, “एक टक्कल पडलेला टेनिसप्रेमी पत्रकाराला विचारताना दोषी वाटत होतं, ‘तुम्ही टेनिस स्पर्धा कव्हर करता. यापूर्वी विजय अमृतराज नाव ऐकलं आहे का?’ या नावाने युरोप आणि अमेरिकेत टेनिस विश्वात कोणतीही खळबळ उडाली नव्हती. मग हा १९ वर्षांचा सडपातळ मुलगा, ज्याने प्रकृती खराब असल्याने टेनिस खेळायला सुरुवात केली, माउंट वॉशिंग्टन हॉटेलच्या लाल मातीच्या कोर्टवर आला. २५,००० डॉलरच्या व्हॉल्वो आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत त्याने तीन दिवसांत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज रॉड लेव्हर, जॉन अलेक्झांडर आणि अमेरिकेचे नवे प्रो टेनिस विजेते जिमी कॉनर्स यांना हरवले. त्याने स्पर्धा, ५,००० डॉलर आणि ६,००० डॉलर किंमतीची व्हॉल्वो स्पोर्ट्स कार जिंकली.”

विजय अमृतराज यांनी यूएस ओपन आणि विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी अनेक दिग्गजांना पराभूत केले. आपला भाऊ आनंद अमृतराज यांच्यासोबत १९७६ मध्ये त्यांनी विम्बल्डनच्या दुहेरीत भाग घेतला. भारतीयांनी हा खेळ पाहायला सुरुवात केली. त्यावेळी टेनिसप्रेमींचे भारताकडे लक्ष लागले होते.

विजय यांनी जेम्स बाँड चित्रपटातही भूमिका केली होती. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवे आयाम मिळाले. लियेंडर पेस, महेश भूपती, रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा यांच्यासारखे खेळाडू पुढील दशकांत टेनिसमध्ये यशस्वी झाले. त्याची पायाभरणी मृतराज यांनी केली होती.  


राजेश खन्ना :

“आज माझा मुलगा सलमान खान मोठा स्टार आहे. आमच्या घरासमोर दररोज चाहत्यांची गर्दी जमते. लोक मला सांगतात की त्यांनी यापूर्वी कोणत्याही स्टारसाठी अशी क्रेझ पाहिली नाही. पण मी त्यांना सांगतो की कार्टर रोडवर आशीर्वादच्या समोर, मी अशी अनेक दृश्यं पाहिली आहेत. राजेश खन्नानंतर कोणत्याही स्टारसाठी अशी लोकप्रियता पाहिली नाही,” असे सलीम खान यांनी म्हटले होते.
 

१९७०च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार जन्मला. त्यापूर्वी दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद यांना स्टार म्हटले जायचे. पण राजेश खन्नांनी सगळ्यांवर मात केली. त्यांची लोकप्रियता अतुलनीय होती. त्यांचे चित्रपट रोमँटिक पण भारताच्या सामाजिक वास्तवात रुजलेले होते. त्यांच्या चित्रपटांनी सामाजिक दुष्कृत्यं, राजकीय भ्रष्टाचार आणि मानवी भावनांवर प्रभावी पद्धतीने भाष्य केले. तरुणांनी त्यांच्या कपड्यांचा स्टाइल कॉपी केली. खन्ना कट कुर्ता त्यांच्याच नावाने प्रसिद्ध झाला.

‘काका’ म्हणून लोकप्रिय असलेल्या राजेश खन्ना यांच्याबद्दल त्यांचे चरित्रकार यासर उस्मान लिहितात, “राजेश खन्ना यांच्या स्टारडमच्या संदर्भात चित्रपटसृष्टीत एक रोचक म्हण वापरली जायची: ‘वर आका, खाली काका.’ यापूर्वी कोणत्याही स्टारसाठी असे शब्द वापरले गेले नव्हते. त्यांच्यानंतरही कोणासाठी ते वापरले गेले नाहीत. मुंबईच्या विलेपार्ले येथील मिथिबाई कॉलेजबाहेर एक भिकारी राजेश खन्ना यांच्या नावाने भीक मागायचा. ही बाब दर्शवते की राजेश यांचे माणसापासून ईश्वरात रूपांतर झाले होते.”  

सुनील गावसकर :

सी. डी. क्लार्क यांनी १९८० मध्ये लिहिले की, “भारताने तीन प्रमुख क्रिकेट खेळणाऱ्या देशांना आव्हान दिले तेव्हा त्यांच्या फलंदाजांमध्ये एक खेळाडू उदयास आला. या खेळाडूने रातोरात जगाचे लक्ष वेधले. हा फलंदाज नवे मानदंड आणि विक्रम प्रस्थापित करू शकतो, असं यापूर्वी अशक्य मानलं गेलं, कारण तो कमकुवत देशाचा खेळाडू होता. परंतु सुनील गावसकर यांनी ही समजूत खोटी ठरवली. कालांतराने ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज बनले.”
 

क्रिकेटला धर्म मानणाऱ्या, पण दुबळा संघ असलेल्या देशात गावसकर मसिहा बनून आले. १९७१मध्ये त्यांच्या पहिल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजच्या भयंकर वेगवान गोलंदाजीसमोर त्यांनी ७७४ धावा केल्या. पदार्पणात हा सर्वोच्च धावांचा विक्रम आहे आणि आजही भारतीय विक्रम आहे. हा विक्रम आणखी उल्लेखनीय आहे, कारण त्यांनी पाचपैकी फक्त चार कसोटी सामने खेळले आणि पूर्णपणे तंदुरुस्त नव्हते. त्यांची १५४ ची सरासरी ही सर डॉनल्ड ब्रॅडमन यांच्यापाठोपाठ दुसरी होती. 

वेस्ट इंडिजमध्ये भारताने पहिली कसोटी मालिका जिंकली. सहजासहजी पराभव न स्वीकारणारा माणूस भारताला मिळाला. पुढचे दशक गावसकर यांचे होते. प्रत्येक भारतीय मुलाला त्यांच्यासारखे व्हायचे होते. सचिन, मांजरेकर, अझरुद्दीन, कांबळी यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांनी वेगवान गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाज धावा काढू शकतात, असा विश्वास दिला.  

अल्बर्ट एक्का :

युद्धभूमीवरील अंतिम पराक्रम हाच तरुणांचा अंतिम ध्यास आहे. १९४७ पासून भारताने युद्धनायक निर्माण केले आहेत. परमवीर चक्र मिळवणारे पहिले आदिवासी अल्बर्ट एक्का यांनी वयाच्या २९व्या वर्षी प्राणार्पण करून सैनिक म्हणून कर्तव्याची पराकाष्टा केली. 

३ डिसेंबर १९७१ च्या रात्री लेफ्टनंट कर्नल ओ. पी. कोहली यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्य गंगासागर येथे होते. पाकिस्तानी सैन्य एमएमजीसह बंकर्समध्ये होते. भारतीय सैनिकांकडे रायफल्स होत्या. अल्बर्ट एक्का यांनी पाहिले की "शत्रूची मशीन गन (एलएमजी) त्यांच्या टोळीचे मोठे नुकसान करत आहे. स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता त्यांनी शत्रूच्या बंकरवर हल्ला केला. दोन शत्रू सैनिकांना संगीनने भोसकले आणि एलएमजी बंद केली.

या चकमकीत ते गंभीर जखमी झाले. तरीही त्यांनी एक मैलापर्यंत पुढे जाऊन सहकाऱ्यांसोबत लढा दिला. त्यांनी एकामागून एक बंकर साफ केले. उद्दिष्टाच्या उत्तर टोकाला एका मजबूत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून शत्रूच्या हद्दीतील मध्यम मशीन गन (एमएमजी) उघडला. त्यांच्या कृतीने मोठी हानी टळली. याने मोठी हानी होत होती आणि हल्ला थांबला होता. या धाडसी सैनिकाने, गंभीर जखम आणि शत्रूच्या प्रचंड गोळीबाराची पर्वा न करता, पुढे सरकत इमारतीपर्यंत पोहोचले. त्यांनी बंकरमध्ये ग्रेनेड टाकला. एक शत्रू सैनिक ठार झाला आणि दुसरा जखमी झाला. पण एमएमजी सुरूच होता.
 
 
असामान्य धैर्य आणि निश्चयाने लान्स नाईक अल्बर्ट एक्का यांनी बाजूच्या भिंतीवर चढून बंकरमध्ये प्रवेश केला. गोळीबार करणाऱ्या शत्रू सैनिकाला संगीनने भोसकून मशीन गन बंद केली. 

त्यांच्या या अतुलनीय पराक्रमामुळे कंपनीची पुढील हानी टळली आणि मोठे यश मिळाले. मात्र यावेळी त्यांना गंभीर जखमा झाल्या. ध्येय साध्य केल्यानंतर त्यांनी प्राण सोडले. या कृतीतून लान्स नाईक अल्बर्ट एक्का यांनी अप्रतिम शौर्य आणि निश्चय याचे दर्शन घडवले. त्यांनी सैन्याच्या सर्वोत्तम परंपरेला साजेसे बलिदान दिले. त्यामुळे ते आदिवासींचे नायक बनले." त्यांच्या बलीदानाने हजारो आदिवासींना भारतीय सैन्यात सामील होण्याची प्रेरणा दिली.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter