'कुस्ती' हा रांगडा खेळ. बल आणि बुद्धीचा संगम घडवत खेळला जाणारा खेळ. शक्ती बरोबरच बुद्धीचातुर्याचा कसबी वापर करणारा खेळाडू हा मल्लयोद्धा, पैलवान म्हणून गणला जातो. अगदी अनादी काळापासून कुस्ती जगभर खेळली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता मॅटवरची कुस्ती खेळविली जाते. मात्र, भारतीय कुस्ती ही प्रामुख्याने लाल मातीवरच विकसित झाल्याचे दिसते. 'कुस्ती' हा मराठी शब्द 'कुश्ती' या फार्सी शब्दावरून तयार झाला आहे. त्याचा अर्थ मल्लयुद्ध, अंगयुद्ध किंवा बाहुयुद्ध असा आहे.
इ.स.पू. ३००० वर्षे ईजिप्त देशातील नाईल नदीजवळ बेनीहसन येथील मशिदीच्या व दर्ग्याच्या भिंतींवर केलेल्या कोरीव कामात कुस्त्यांतील डावपेचांचे शेकडो देखावे पहावयास मिळतात. प्राचीन ग्रीक वाङ्मयातही मल्लयुद्धाचा उल्लेख आढळतो. होमरच्या इलिअड या सुप्रसिद्ध महाकाव्यात ॲजेक्स व ओडिसियस यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीचा उल्लेख आहे. भारतात वैदिक वाङ्मयात कुस्तीचे मोठे दाखले आहेत.
आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव ज्या लढाया व चढाया करीत आला, त्यांतूनच कुस्तीच्या द्वंद्वाचा उगम झाला. पुढे मानवामानवांमधील द्वंद्वात स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मल्लविद्या उपयुक्त ठरली. कालांतराने या प्राथमिक द्वंद्वास जागतिक स्वरूप प्राप्त झाले व त्याचे स्वतंत्र असे शास्त्र बनत गेले.
भारतीय मल्लविद्येचे श्रेष्ठत्व जगाला पटवून देणाऱ्या जगज्जेत्या मल्लाचे नाव गामा पैलवान ऊर्फ गुलाम मोहम्मद. गामा पैलवान हा स्वातंत्र्यपूर्व पंजाब प्रांतातील मल्ल. इ. स. १९१० साली त्याने लंडन येथे कुस्तीचे जागतिक अजिंक्यपद मिळविले. गामाचा धाकटा भाऊ इमामबक्ष हा गामाप्रमाणे नामांकित मल्ल होता. या दोघांच्या तोडीचा गुंगा नावाचा पैलवानही प्रसिद्ध आहे. गुलाम अलिया याने इ. स. १९०२ मध्ये यूरोपातील सर्व प्रसिद्ध मल्लांना जिंकून रुस्तम- इ-हिंद ही पदवी मिळविली होती. कल्लू अलिया व त्याचा मुलगा गामा कल्लू हेही सुप्रसिद्ध मल्ल होते. अहमदबक्ष या मल्लाने इ. स. १९१२ मध्ये यूरोपात जाऊन तेथील मध्यमगट वजनाच्या सर्व प्रसिद्ध पैलवानांना हरविले होते.
महाराष्ट्रात कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा काळ हा मल्लविद्येचा वैभवकाळ समजला जातो. या काळात मल्लविद्येला उत्तम राजाश्रय मिळाला. छोटेमोठे संस्थानिकही आपल्या पदरी मोठ्या अभिमानाने मल्ल बाळगीत. मोगल बादशहांच्या काळातही कुस्तीला राजाश्रय मिळत असे. हिंदू राजे, सरदार तसेच मुस्लिम नबाब आपल्या पदरी नामांकित मल्ल बाळगत. गावोगाव जत्रा, उत्सव, उरूस यांमध्ये कुस्त्यांचे फड होत. याच काळात प्रसिद्ध आखाडे निर्माण झाले. शाहू महाराजांनी कुस्ती या खेळावर पुत्रवत प्रेम केले. जगज्जेता गामा ऊर्फ गुलाम मोहम्मद या मल्लाला त्यांनी खुराक पुरवला. गामाचा धाकटा भाऊ इमाम बक्ष हा शाहू महाराजांच्या संस्थानाचा आश्रित मल्ल होता. पुढे पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबी हा देखील कोल्हापुरात वास्तवास होता.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर विविध संस्थाने खालसा झाली अन् कुस्तीला, मल्लांना मिळणारा राजाश्रय थांबला. या कठीण काळात कुस्तीला लोकाश्रयाचा आधार मिळाला. यात्रा, जत्रा, उरूसात भरणाऱ्या स्पर्धेतून कुस्ती जिवंत राहिली.
महाराष्ट्राच्या कुस्तीत मुस्लिम मल्लांचा शड्डू...
दख्खन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्यात तसेच निजामशाही व आदिलशाहीत मल्लविद्येला विशेष स्थान होते. या तिन्ही साम्राज्यात सहभागी असणारे अनेक मुस्लिम सरदार, सैनिक तसेच बरीच सामान्य रयत कुस्ती या खेळात पारंगत होती. याचवेळी कुस्तीच्या झुंजींना मनोरंजक दृष्टीकोनातून न पाहता बलोपासना म्हणून ध्यानी घेतले जावु लागले. अलीकडच्या शतकात महाराष्ट्रात कृषीजण संस्कृतीशी निगडीत वर्ग कुस्ती खेळात सक्रिय असल्याचा आढळतो. शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांच्या अनेक मुलांनी मल्लविद्येत प्राविण्य मिळवले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर तसेच मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, लातूर जिल्ह्यात मुस्लिम मल्ल आढळतात. महाराष्ट्राला लागून असणाऱ्या बेळगाव, विजापूर, हैद्राबाद भागात ही मुस्लिम मल्लांनी कुस्ती या खेळाचा वारसा जपला आहे. कुस्ती हा असा खेळ आहे, ज्या खेळात धर्म, जात, वर्ग, वंशाला कोणतेही स्थान नाही. तांबड्या मातीलाच सर्वस्व मानुन प्रत्येक मल्ल एकाच आखाड्यात सर्वांच्या बरोबर घाम गाळत असतो, सर्वांच्या सोबतीने राहून एकाच ताटात जेवन करत असतो. कुस्तीचा आखाडा हे ठिकाण समता, बंधुत्वाचे महत्वाचे उदाहरण म्हणून घेता येईल.
महाराष्ट्रातील दिग्गज मुस्लिम मल्लांवर महाराष्ट्राच्या जनतेने अफाट प्रेम केले. यामध्ये कुस्ती सम्राट पै.आस्लम काझी, महान भारत केसरी पै.सिकंदर शेख, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, एकाच कुटूंबातील तीन महाराष्ट्र केसरी ईस्माईल शेख, आप्पालाल शेख, मुन्नालाल शेख, हिंदकेसरी हजरत पटेल, महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख, राष्ट्रीय कुस्तीगीर व भारतीय महिला कुस्ती संघाची प्रशिक्षक शबनम शेख यांची नावे प्रामुख्याने घेता येतील. याच मल्लांच्या कारकिर्दीचा आढावा खालील प्रमाणे आपण घेणार आहोत.
कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत 'आस्लम काझी'...
तब्बल ५१ चांदी गदा जिंकत, असंख्य किताब आपल्या नावे करत, एक विक्रम प्रस्थापित करणारं महाराष्ट्रातील कुस्तीतलं एक तेजोमय नाव म्हणजे आस्लम काझी. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सापटणे हे त्यांचे गाव. शेतकरी कुटूंबातून आलेल्या आस्लम यांनी कोल्हापूर च्या गंगावेस तालमीत सराव केला. घरातूनच त्यांना कुस्तीचा वारसा मिळाला. त्यांचे चुलते तुराब व वडील शफेरद्दीन काझी जुन्या काळातले नामवंत मल्ल होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा गाजायाची आस्लम यांच्या शड्डूच्या आवाजाने. काझींनी तब्बल एक तप महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अस्लम काझी ची कुस्ती पहायला लोक हजारो किलोमीटर चा प्रवास करून मैदानाला हजेरी लावत असत. घरातून भाजी भाकरी बांधून घेवून काही कुस्ती शौकीन खास आस्लम यांची वादळी कुस्ती पहायला येत असत. देशातल्या अनेक मैदानात कुस्ती आस्लम यांची कुस्ती नंबर एकला असायची. देशभरातील दिग्गज मल्लांशी दोन हात करुन आपल्या कुस्ती कौशल्याने कुस्ती शौकीनांच्या मनात वेगळीच आदराची जागा निर्माण केली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 'कुस्ती सम्राट' हा किताब देवून त्यांचा व त्यांच्या वादळी खेळीचा सम्मान केला. सध्या ते कुर्डूवाडी येथे 'शिवराय कुस्ती संकुल' स्थापन करुन नवोदित मल्लांना प्रशिक्षण देत आहेत. २०१२ला त्यांनी कुस्तीतून त्यांनी निवृत्ती घेतली परंतू महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात 'आस्लम काझी' या नावाचे गारुड आज ही कायम आहे.
महाराष्ट्र केसरी जिंकणारा सिकंदर शेख...
सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अशाच एका मल्लांची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे एका हमालाचा पोरगा म्हणून ओळखला जाणारा पैलवान सिकंदर शेख. पुण्याजवळील फुलगाव येथे झालेल्या ६६ व्या महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखनं गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर अवघ्या तेवीस सेकंदांत झोळी डावावर चीतपटीने विजय मिळवत ''महाराष्ट्र केसरी'' हा मानाचा किताब जिंकून विक्रम नोंदवला. सिकंदरच्या या विजयाचा जल्लोष संबंध महाराष्ट्रात झाला.
कमी वयात अधिक क्षमता असलेला मल्ल म्हणून सिकंदरची ओळख आहे. सकाळी सहा तास व संध्याकाळी सहा तास तो कसून सराव करतो. मातीतल्या कुस्तीसह मॅट वरील कुस्तीचं तंत्र त्यानं लवकर आत्मसात केलंय. पुरेपूर उंची, बलदंड शरीर, लवचीकता, डावबाजी व आक्रमकता ही सर्व गुणवैशिष्ट्ये सिकंदरच्या अंगी दिसून येतात. प्रतिस्पर्धी मल्लाने हल्ला चढवण्याआधीच आक्रमण करत त्या मल्लास चीतपट करण्याचे तंत्र सिकंदरच्या अंगी आहे. कुस्ती लढताना झोळी, घिस्सा, भारंदाज, घुटना यांसारख्या डावांचे बाण त्याच्या भात्यात असतात. महाराष्ट्र केसरी किताब जिंकून कुस्तीतून निवृत्ती घेणाऱ्या मल्लांचं प्रमाण जास्त आहे. हा मान मिळाला की प्रतिष्ठा मिळते, तो मल्ल नावारूपाला येतो आणि इथेच तो आपल्या कुस्तीची समाप्ती करतो. या मूळ कारणामुळं आपले मल्ल ऑलिम्पिकपासून दूर आहेत, असा एक निष्कर्ष काढला जातो. परंतु या किताबावरच समाधान न मानता सिकंदरला भारताचं प्रतिनिधित्व जगभर करायचं असल्याचं तो सांगतो. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन भारतासाठी पदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न आहे. यानिमित्तानं सिकंदर कुस्तीचं जग जिंकण्याचं स्वप्न पाहत आहे.
बुरुजबंद ताकदीचा 'सईद चाऊस'...
तब्बल साडे सहा फुट उंची, धिप्पाड शरीरयष्टी, प्रचंड ताकद आणि कुस्तीतील जबरदस्त खेळी, अशी ओळख असणारा 'सईद चाऊस' हा मल्ल. बीड जिल्ह्यातील आष्टी या गावचा हा मल्ल. सईदचे वडील अली हे जुने नामवंत मल्ल. वडिलांकडूनच त्याला कुस्तीचा वारसा मिळाला. २००५मध्ये इंदापूर येथे झालेल्या स्पर्धेत पै.सईद महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला होता. या काळी मातीतल्या कुस्तीत त्याने आपला दबदबा वाढवला होता. शक्ती आणि युक्तीचा संगम करत तो लढायचा. अनेक मल्ल त्याच्या समोर खुजे वाटायचे. शांत, संयमी, मितभाषी स्वभावाचा सईद आखाड्यात मात्र आक्रमक व्हायचा आणि समोरच्या मल्लाला चितपट करायचा. त्याच्या याच खेळीचे हजारो चाहते होते. आष्टी सारख्या दुष्काळी प्रदेशात तो सध्या अनेक नवोदित मल्लांना कुस्तीचे प्रशिक्षण देत आहे.
बोरामणीच्या 'शेख' घराण्यात तीन महाराष्ट्र केसरी...
घरातल्या एका तरी मुलानं पैलवान बनावं, अशी जुन्या जाणत्या माणसांची अपेक्षा असायची. त्या मुलाला मोठा मल्ल बनवण्यासाठी घरदार प्रयत्न करत. कुस्तीची अशी परंपरा महाराष्ट्रात पाहायला मिळते. चक्क एकाच घरातच्या मल्लांनी तीन महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या 'शेख' घराण्याचा मात्र अनोखा विक्रम आहे. सोलापूर नजिकच्या बोरामणी गावचे इस्माईल शेख. १९८०च्या दशकात कुस्तीत त्यांचा दबदबा होता. बेधडक कुस्ती लढणारा मल्ल म्हणून त्यांची ओळख होती. एकदा का समोरच्या मल्लावर आक्रमक केले की, त्याला नामोहरम केल्या शिवाय ते सोडत नसत. खोपोली येथे झालेल्या स्पर्धेत ते जिंकले आणि सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून देणारे ते पहिले मल्ल ठरले. पुढे आपल्या मोठ्या बंधूच्या पावलावर पाऊल ठेवत आप्पालाल शेख कुस्तीच्या आखाड्यात उतरले. आप्पालाल लंगोट लावून आखाड्यात उतरले की चांगल्या चांगल्या मल्लांची धडकी भरायची. शड्डू ठोकुन प्रतिस्पर्धी मल्लाच्या मनगटाची पकड घेतली की त्या मल्लाला चित करुनच ते मैदान सोडायचे अशी त्यांची खासीयत होती.
१९९०चे दशक आप्पालाल यांनी गाजवले. दोन्ही शेख बंधू कोल्हापुरच्या शाहुपुरी तालमीचे मल्ल. १९९१ला न्युझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत अनेक विदेशी मल्लांना चितपट करत आप्पालाल शेख यांनी सुवर्णपदक जिंकले. या काळात महाराष्ट्रासाठी ही मोठी गोष्ट होती. १९९२मध्ये त्यांनी महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. शेख घराण्याचा कुस्तीचा वारसा पुढे सुरु ठेवण्यासाठी ईस्माईल व आप्पालाल यांचे पुतणे मुन्नालाल शेख कुस्तीचे धढे गिरवू लागले. कमी वजन, कमी उंची परंतू कुस्ती लढण्याचे कौशल्य मुन्नालाल यांनी चांगलेच अवगत केले होते. न थकता कुस्ती लढर राहणे व जिंकणे हे त्यांचे वैशिष्ट्य. समोरचा मल्ल हल्ला करण्या अगदोरच आपण हल्ला करत त्याला गारद करण्याची खेळी ते करत. २००२मध्ये त्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. सध्या ते भारतीय रेल्वेच्या सेवेत आहेत. तर ईस्माईल व आप्पाला शेख यांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले.
हिंदकेसरी हजरत पटेल...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव हे पै.हजरत पटेल यांचे गाव. या गावात १९३८मध्ये पटेल यांचा जन्म झाला. १९६७मध्ये अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या कुस्ती स्पर्धत हजरत पटेल यांनी महाराष्ट्रासाठी 'हिंदकेसरी' हा मानाचा किताब पटकावला. कुस्तीचा वारसा त्यांना वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांचे काका चांगले पैलवान होते. त्यांचा छोटा भाऊही त्यांच्याबरोबर कुस्तीचा सराव करीत होता. कोल्हापुरात शाहूपुरी तालमीत त्यांनी अनेक वर्ष सराव केला. आपल्या कारकिर्दीत हजरत पटेल यांनी शेकडो कुस्त्या मारल्या. देशभरातील मैदाने गाजविली. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते. हिंदकेसरी होण्याआधी १९६५मध्ये हिंदकेसरी मास्तर चंदीग्राम यांच्याबरोबर सव्वातास ते लढले होते. ते रोज सकाळी दोन हजार बैठका मारत. पाच मैल धावण्याचा सराव करीत. सलग पाच-सहा जणांशी लढतीचा सराव करीत. संध्याकाळी सुमारे बाराशे दंड मारत. दोरखंडावर चढण्यासारखे अन्य व्यायामही करत.
धिप्पाड महाराष्ट्र केसरी 'बालारफिक'...
बालारफिक शेख मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील खडकी गावचा. घरची परिस्थिती अगदी बेताचीचं. दोन वेळचा खुराक मिळणेसुद्धा त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरत होते. गेल्या पाच पिढ्या कुस्तीची परंपरा जोपासलेल्या या पैलवानाच्या रक्तातच कुस्ती होती. शेख कुटुंबाने गेल्या पाच पिढ्या कुस्तीची परंपरा कायम ठेवली आहे. त्याचे वडील आझम शेख यांनी मुलांच्या कुस्तीसाठी गांभीर्याने मेहनत घेतली. कोल्हापुरच्या मोतीबाग तालमीत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी बाला रफीकला कुस्तीचे धडे दिले. धिप्पाड शरीरयष्टी लाभलेला बालारफिक बेधडक कुस्ती करण्यासाठी ओळखला जातो. हार जित न पाहता लढत राहण्याचे त्याचे सुत्र असते. आपल्या बाहूबलाच्या जोरावर त्याने अनेक मल्लांना चितपट केले. २०१८मध्ये त्याने महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावे केला.
कुस्तीत करिअर करणारी 'शबनम'...
कुस्ती हा पुरुषी खेळ. 'मुलींनी कुठे कुस्ती खेळायची असते का?' अशी हेटाळणी होत असतानाच शबनम शब्बीर शेख या मुस्लिम युवतीनं कुस्तीच्या आखाड्यात उडी घेतली. शबनम अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातल्या आंबीजळगाव या छोट्याशा गावातली. राष्ट्रीय स्तरावरील महान भारतकुमारी कुस्ती स्पर्धेची मुस्लीम समाजातलीच नव्हे, तर महाराष्ट्रातील ती पहिली विजेती आहे. विद्यापीठस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धा तिने आपल्या खेळीने गाजवल्या आहेत. तिचे आजोबा, वडील शब्बीर शेख हे पंचक्रोशीतील नावाजलेले मल्ल होते. काका, भाऊ हेही कुस्तीगीर. लहानपणी आपल्या भावांना कुस्ती खेळताना पाहून पाहून छोट्या शबनमच्या मनातही कुस्ती विषयी आकर्षण निर्माण झाले. तिचे वडील सैन्य दलात होते. त्यांनी तिला चांगला पाठिंबा दिला. कुस्तीबरोबरच शारीरिक शिक्षण विषयात तिने पीएचडी पर्यंत शिक्षण पुर्ण केले आहे. तसेच पंजाब येथे एनआयएस हा कुस्ती प्रशिक्षणाचा कोर्स पुर्ण करुन सध्या ती भारताच्या कुस्ती महिला संघाची प्रशिक्षक म्हणून काम करत आहे.
महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभली आहे. तांबड्या मातीत घाम गाळून अनेक मल्लांनी महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर केले आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात मुस्लिम मल्लांनी वेळोवेळी भरीव अशी कामगिरी केली आहे. आपल्या प्रांताचे प्रतिनिधि करत त्यांनी कुस्तीचे आखाडे गाजवले आहेत. याच मल्लांची प्रेरणा घेत अनेक उद्योमुख मल्ल कुस्तीत करिअर करण्याचे उद्देशाने वळताना दिसत आहेत. महाराष्ट्रात कुस्तीत येवू पाहणाऱ्या नव्या मल्लांसाठी हे मुस्लिम मल्ल मार्गदर्शक, आदर्श ठरताना दिसून येत आहेत.
- मतीन शेख