अमीन शेख यांनी भूषण राजपूत यांना सोने परत केल्यानंतर त्यांना बक्षीस म्हणून मिळालेला मोबाईल फोन दाखविताना अमीन शेख
कलियुगात वावरताना माणुसकीचे दर्शन घडणे दुरापास्त आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य. मात्र, लोभापेक्षा सदविचारांनी आपले कर्म हेच आपले दैवत समजणारे अमीन शेख या भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीने बाजारभावाप्रमाणे जवळपास दहा लाखांचे सोने परत करून नीतिमत्ता व प्रामाणिकपणा आजही जगात शिल्लक आहे, हे दाखवून दिले. अमीन यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना मोबाईल फोन बक्षीस म्हणून देण्यात आला.
भंगार व्यावसायिक अमीन शेख अय्युब यांचे संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, "दैनंदिन व्यवसायासाठी विकास हायस्कूलच्या पाठीमागे सरांच्या घरी भंगार घेण्यासाठी गेलो असता त्यात सोने आले होते. परंतु, घरी आल्यावर आईने लॉरीवरील सर्व सामान पाहिल्यानंतर सोने घरात सुरक्षित ठेवले. राजपूत कुटुंबियांनी संपर्क केल्यानंतर सर्व सोने त्यांच्या स्वाधीन केले. माझा प्रामाणिकपणा पाहून त्यांनी मला मोबाईल फोन भेट दिला."
नेमके काय घडले?
शहादा येथील विकास हायस्कूलच्या पाठीमागे वास्तव्यास असणारे शिक्षक भूषण संजय राजपूत ८ जूनला आपल्या आईसोबत एका कार्यक्रमाला नंदुरबारला जाणार होते. परंतु, काही कारणास्तव हे रद्द झाल्याने आईचे दागिने घरातील कपाटात ठेवले. नेमके त्याच कपाटात वर्तमानपत्राची रद्दी विकण्यासाठी काढून ठेवली होती. काही वेळाने त्या भागात अमिन शेख अय्युब (रा. गरीब नवाज कॉलनी, शहादा) भंगार घेण्यासाठी त्या परिसरात गेल्यावर त्यांना राजपूत यांनी घरातील भंगार व रद्दी दिली. अनावधानाने त्या रद्दीमध्येच एक मंगलसूळ व चार बांगड्या असे जवळपास दहा तोळे वजनाचे दागिने ठेवलेले होते. वर्तमानपत्राच्या रद्दीसोबतच ते दिले गेले.
दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. ९) राजपूत परिवार नंदुरबारला जायला निघाले. परंतु, दागिने परिधान करतेवेळी घरात सोने नसल्याचे लक्षात आले. घरात सोने नसल्यावर श्री. राजपूत यांच्या आईला धक्काच बसला. रद्दीसोबत सोने गेल्याचा संशय बळावल्यावर त्यांनी तत्काळ अमीन शेख यांच्याशी संपर्क साधला. परंतु, अमीन यांनी त्याच दिवशी सर्व भंगार होलसेल विक्रेत्याला विक्री केले होते. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु, तेथेही काही आढळून आले नसल्याने अमीन शेख यांनी आपल्या घरी संपर्क केला. कारण, कधी कधी घरातील मुले भंगारातून खेळण्याच्या वस्तू शोधतात. त्यामुळे त्यांनी आहे त्या जागेवरून आईला फोन करत हकीगत सांगितली.
त्यावेळी अमीन यांच्या आईने सोने सुरक्षित असल्याचे सांगताच राजपूत कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अमीन यांच्या मातोश्री त्याच दिवशी सेंधवा (मध्य प्रदेश) येथे गेल्याने त्या दुसऱ्या दिवशी परतल्यानंतर सर्व दागिने राजपूत कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. या वेळी भूषण राजपूत यांनी अमीन यांना स्वखुशीने १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन भेट दिला. या घटनेवरून जगात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला. अमीन हा निवृत्त मुख्याध्यापक संजय राजपूत यांचा विद्यार्थी आहे.
अमीन यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करताना भूषण राजपूत म्हणले, "अमीन अर्थात अमु भंगारवाल्याने दिलेले हे प्रामाणिकतेचे उदाहरण सध्याच्या चातुर्याच्या युगात दुर्मिळ आहे. आजच्या जगात भंगारवाल्यांसोबत होत असलेल्या संशयाच्या वातावरणालाही छेद दिला आहे. जगण्यासाठी रोजच्या संघर्षात अमीनने कोणताही मोह न बाळगता आमचे सोने जसेच्या तसे परत केले."