डॉ. इफ्फत फरिदी : वंचितांच्या आयुष्यात प्रकाश आणणारी संवेदनशील कवयित्री

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
डॉ. इफ्फत फरिदी
डॉ. इफ्फत फरिदी

 

सानिया अंजुम

काही व्यक्तींचे आयुष्य क्रांतिकारी असते. मात्र गोंधळ न घालता केवळ काळजी, दृढ विश्वास आणि करुणेच्या बळावर ते जग बदलून टाकतात. डॉ. इफ्फत फरिदी यांचा प्रवास असाच काहीसा आहे. त्यांच्या आयुष्यात ज्ञान आणि संवेदनशीलतेचा सुरेख संगम पाहायला मिळतो. तिथे कविता आणि ध्येय हातात हात घालून चालतात.

त्या एक शिक्षणतज्ज्ञ, कवयित्री, समुपदेशक, समाजसेविका आणि संस्थापिका आहेत. त्यांच्यात बुद्धिमत्ता आणि सहानुभूतीचा एक दुर्मिळ मेळ दिसतो. त्यांची कथा केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नाही. वारशाने मिळालेली मूल्ये जपणे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या ताकदीचा तो एक उत्तम पुरावा आहे.

डॉ. इफ्फत फरिदी यांचा जन्म ज्ञानाला सर्वोच्च मानणाऱ्या कुटुंबात झाला. पुरोगामी विचार आणि वैचारिक समृद्धी असलेल्या वातावरणात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. समाजाचा दबावही मोठा होता. तरीही त्यांच्या पालकांनी मुलींनाही मुलांइतक्याच शिक्षणाच्या समान संधी मिळायला हव्यात, यावर ठाम विश्वास ठेवला.

त्यांचे वडील एक संपादक होते. त्यांनी अनेक उर्दू वर्तमानपत्रे आणि प्रकाशनांसोबत काम केले. कोलकात्यात स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी भारतातील विविध शहरांमध्ये नोकरी केली. त्यांचे घर तसे साधेच होते. पण तिथे उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि रशियन साहित्यातील पुस्तके, वर्तमानपत्रे आणि मासिकांचा मोठा खजिना होता. ते एका घरापेक्षा शब्दांचे मंदिरच अधिक वाटायचे.

त्यांचे वडील नेहमी सांगायचे, "शिक्षण हा एकमेव असा वारसा आहे, तो वाटल्याने अधिक वाढतो." साहित्य आणि वैचारिक चर्चांनी भरलेल्या अशा वातावरणात इफ्फत वाढल्या. त्यातूनच त्यांच्यात वाचन आणि चिंतनाची मोठी आवड निर्माण झाली.

त्यांचा शैक्षणिक प्रवास समर्पण आणि बौद्धिक कुतूहल दोन्ही दर्शवतो. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर पदवी, बी.एड. आणि एम.फिल.चे शिक्षण पूर्ण केले. ही संस्था चिकित्सक विचार आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जडणघडणीसाठी ओळखली जाते.

त्यानंतर त्यांनी शिमला येथील समर हिल विद्यापीठातून एम.एड. केले. पुढे २००१ मध्ये जामिया मिलिया इस्लामियामधून त्यांनी विशेष शिक्षण या विषयात पीएच.डी. पूर्ण केली. त्यांच्या शिक्षणाचा आलेख इथेच थांबला नाही. बंजारा अकादमीमधून त्यांनी समुपदेशन कौशल्याचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. सोबतच मेक्सिकोमधून टीईएफएल प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केला.

डॉ. फरिदी यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ पदव्या गोळा करणे नव्हते. त्या मानतात, "शिकणे हा मन आणि आत्मा यांच्यात आयुष्यभर चालणारा एक संवाद आहे."

लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात प्रवासाला आणि नवीन संस्कृती अनुभवण्याला सुरुवात झाली. त्यांचे पती परदेशात पेट्रोलियम इंजिनिअर म्हणून काम करत होते. त्यांच्यामुळे डॉ. फरिदी यांना विविध समाज आणि त्यांचे दृष्टिकोन अनुभवता आले.

सततच्या प्रवासाने त्या एकाच नोकरीत स्थिर राहू शकल्या नाहीत. पण त्यांनी आपल्या कामातून अनेक संस्थांना मोठे योगदान दिले. त्यांनी दिल्ली प्रशासन, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया येथे व्याख्याता म्हणून काम पाहिले.

सौदी कल्चरल अटॅशे कार्यालयात त्यांनी विद्यार्थी समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर बंगळूरमधील सिंटॅक्स अकादमीमध्ये त्या संचालक पदावर रुजू झाल्या. व्यावसायिक यशाच्या शिखरावर असतानाही त्यांना आतून एका वेगळ्याच गोष्टीची ओढ वाटत होती. त्यांचे हे ध्येय शाळेच्या चार भिंतींपलीकडचे होते.

बंगळूरमध्ये राहताना त्यांना त्यांच्या ध्येयाचा खरा अर्थ सापडला. तिथे त्यांच्या शेजारी स्थलांतरित मजुरांच्या मुलांचा एक गट राहायचा. भाषेची अडचण असूनही त्यांची या मुलांशी लगेचच घट्ट नाळ जोडली गेली.

या मुलांना शिक्षणाची कोणतीही सुविधा मिळत नव्हती. हे पाहून त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. त्यांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारला. "माझ्या विशेष शिक्षणातील पीएच.डी.चा काय उपयोग? जर मी या अंधारात चाचपडणाऱ्या मुलांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकत नाही."

या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी त्या मुलांना त्यांच्या घराजवळच शिकवायला सुरुवात केली. अत्यंत संयमाने त्यांनी मुलांमधील कुतूहल आणि आत्मविश्वास वाढवला. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे शेवटी या मुलांना शाळेत प्रवेश मिळाला. या छोट्याशा यशामध्येच त्यांना त्यांच्या आयुष्याचे खरे ध्येय सापडले.

२०१७ मध्ये डॉ. इफ्फत फरिदी आणि त्यांच्या पतीने आपल्या समाजसेवेला एक अधिकृत रूप दिले. वंचित मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कोशिश फाऊंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली.

'कोशिश' म्हणजे प्रयत्न. खऱ्या आणि प्रामाणिक उद्देशातूनच मोठे बदल घडू शकतात, हे त्यांच्या या संस्थेच्या नावातूनच स्पष्ट होते. गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ त्या न थकता या मुलांचे मार्गदर्शन करत आहेत.

त्यांनी बालवाडीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शंभरहून अधिक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. केवळ शिक्षण देणे हा त्यांचा उद्देश नाही. मुलांमध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करण्यावर त्यांचा मोठा भर असतो.

त्या नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगतात. "परिस्थितीवरून तुमची ओळख ठरत नाही. त्या परिस्थितीवर मात करण्याच्या तुमच्या धाडसावरून ती ठरते." या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या आजही अत्यंत शांतपणे पण तितक्याच ताकदीने अनेकांचे आयुष्य बदलत आहेत.

शिक्षण आणि समाजसेवेसोबतच डॉ. फरिदी यांनी आपली साहित्याची आवडही तितक्याच निष्ठेने जोपासली आहे. लेखन हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत जवळचा सोबती राहिला आहे. 'चिराग दिल का' हा त्यांचा उर्दू कवितांचा संग्रह आहे. यात त्यांच्या भावनांची खोली आणि सांस्कृतिक जाणिवांचे दर्शन घडते.

त्यांनी 'गाता जाये बंजारा प्रोफेसर रमेश दत्तजी अनोखी संगीत यात्रा' हे हिंदी चरित्रही लिहिले आहे. याशिवाय 'आपकी सुधा एक सच्ची कहानी' हे त्यांचे आणखी एक पुस्तक प्रकाशित झाले आहे.

त्यांच्या मते, कविता हे केवळ भावना व्यक्त करण्याचे साधन नाही. तो एक लढाही आहे. "जेव्हा भावनांना दुसरा कोणताही निवारा मिळत नाही, तेव्हा त्यांचे कवितेत रूपांतर होते," असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

सध्या त्या वंचित मुलांसोबतच्या कामाचे अनुभव शब्दांकित करत आहेत. यातून समाजाची प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी इतरांनाही प्रेरणा मिळेल, अशी त्यांना आशा आहे.

'माँ से दूर क्यूँ रहते हैं' ही त्यांची अत्यंत हृदयस्पर्शी कविता आहे. या कवितेत 'आई' हे चक्क उर्दू भाषेचे प्रतीक आहे. डॉ. फरिदी यांनी एका आईच्या शब्दांत मोठे दुःख व्यक्त केले आहे. भाषिक आणि सांस्कृतिक मुळांपासून दुरावलेल्या मुलांबद्दलची ही खंत आहे.

"मेरे अपने ही मुझे अपना कहने से क्यूँ घबराते हैं" (माझी स्वतःचीच मुले मला आपले म्हणायला का घाबरतात), असा अत्यंत भावूक सवाल ही आई विचारते.

मुले शिकली सवरली आणि श्रीमंत झाली आहेत. तरीही त्यांना आपल्याच आईचे नाव घेण्याची लाज वाटते, हे ती आई उघड्या डोळ्यांनी पाहते. या कवितेत एक अत्यंत सूचक इशाराही दिला आहे. "जडों से जुदा पेड कब तक हरा रहेगा" (मुळांपासून तुटलेले झाड किती काळ हिरवेगार राहील), असा सवाल करत त्या वाचकांना अंतर्मुख करतात.

या आईने एक आर्त हाक दिली आहे. आपली ओळख, आपला समृद्ध वारसा मुलांनी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा, अशी तिची साद आहे. कवितेचा शेवट एका न संपणाऱ्या प्रतीक्षेने होतो. "मै इंतजार करूँगी" (मी वाट पाहीन) असे ती आई अगदी हळूवारपणे म्हणते. आपली मुले एक ना एक दिवस नक्की परत येतील, हा विश्वास तिच्या या शब्दांतून डोकावतो.

डॉ. इफ्फत फरिदी यांचे आयुष्य म्हणजे ज्ञान, सेवा आणि संवेदनशीलतेचा एक सुंदर गोफ आहे. कवयित्री, समुपदेशक, शिक्षिका, मार्गदर्शक किंवा संस्थापिका अशा कोणत्याही भूमिकेत त्या नेहमीच अस्तित्वाचा खरा अर्थ शोधत असतात.

खऱ्या यशाची व्याख्या त्यांच्या प्रवासातून स्पष्ट होते. स्वतःला मिळणाऱ्या सन्मानात यश नसते. आपण किती जणांचे आयुष्य सावरले आणि आपला वारसा कसा जपला, यातच खरे यश दडलेले असते. त्या स्वतःच म्हणतात, "केवळ काहीतरी मिळवणे हा आयुष्याचा उद्देश नसतो. इतरांना जागृत करणे हा खरा उद्देश असतो."

डॉ. इफ्फत फरिदी आपल्या कामातून आणि शब्दांतून अनेकांची मने जागृत करण्याचे काम करत आहेत. शिक्षण आणि भाषेप्रती असलेली त्यांची निष्ठा खरोखरच अफाट आहे. त्या केवळ यशाचे मोठे डोंगर मागे ठेवत नाहीत. करुणेचा आणि धाडसाचा एक अत्यंत प्रेरणादायी वारसा त्या निर्माण करत आहेत.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter