इंडोनेशियाच्या पीपल्स कन्सल्टेटिव्ह असेंब्ली (एमपीआर) चे उपसभापती आणि नॅशनल मॅनडेट पार्टी (पॅन) चे उपाध्यक्ष एडी सोपर्नो यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, इस्लामी देशांमधील जागतिक सहकार्य वाढवून जगभरात सौहार्द आणि शांती वाढवण्यासाठी त्यांचा देश कटिबद्ध आहे.
भारतीय खासदारांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ इंडोनेशियात गेले आहे, अशावेळी हे वक्तव्य करण्यात आले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व जेडीयू खासदार संजय कुमार झा करत आहेत. या भेटीत भारतीय शिष्टमंडळाने इंडोनेशियातील तज्ज्ञ आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
दहशतवादाविरुद्ध सहकार्यावर एकमत
एडी सोपर्नो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, “भारतीय खासदारांसोबत आम्ही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली. विशेषतः आतंकवाद रोखणे आणि त्यावर कठोर कारवाई करण्यावर भर दिला.” दोन्ही देशांनी आतंकवादाविरुद्ध सहकार्य अधिक मजबूत करण्यावर सहमती दर्शवली.
सोपर्नो यांनी स्पष्ट केले की, भारताने अपेक्षा व्यक्त केली आहे की, इस्लामी सहकार्य संघटनेत (ओआयसी) इंडोनेशिया भारताच्या आतंकवादविरोधी प्रयत्नांना पाठिंबा देईल. भारतीय शिष्टमंडळाने ठामपणे सांगितले की, भारत आता आतंकवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्या देशांमध्ये फरक करणार नाही. भारताची धोरणे आतंकवादाविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’ची आहे. या कामी इंडोनेशियाच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
संजय झा यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो आणि सरकारचे आभार मानले. त्यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि भारतासोबत एकजूट दाखवली.
शिष्टमंडळाचे नेते संजय झा म्हणाले, “आम्ही येथील प्रमुख विचारवंत आणि शैक्षणिक तज्ज्ञांना भेटत आहोत. हे तज्ज्ञ आतंकवादविरोधी धोरणे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ही चर्चा भारताचा दृष्टिकोन जगासमोर मांडण्यासाठी गरजेची आहे. विशेषतः पाकिस्तानातून येणाऱ्या आतंकवादाबाबत कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.”
‘अण्वस्त्र धमकी खपवून घेणार नाही’
संजय झा यांनी ठामपणे सांगितले की, भारत कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र धमकी सहन करणार नाही. त्यांनी स्पष्ट केले की, भविष्यात भारतावर मोठा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत कठोर लष्करी प्रत्युत्तर देईल.
या भारतीय शिष्टमंडळात बीजेपी खासदार अपराजिता सारंगी, बृजलाल, हेमांग जोशी, प्रदन बरुआ, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी, सीपीआय-एमचे राज्यसभा सदस्य जॉन ब्रिटास, काँग्रेस नेते सलमान खुरशीद आणि फ्रान्समधील भारताचे माजी राजदूत मोहन कुमार यांचा समावेश आहे.