पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी-७ शिखर परिषदेतील उपस्थिती भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आकारमान आणि गतिशीलतेचा तसंच जागतिक नेतृत्वाचा दाखला आहे, असं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कॅर्नी यांनी सांगितलं. मंगळवारी कॅनडातील जी-७ परिषदेच्या समारोपात कॅर्नी यांनी मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा केली.
कॅर्नी म्हणाले, “मोदी २०१८ पासून प्रत्येक जी-७ परिषदेत सहभागी होताहेत. भारताची अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि जी-२० मधील नेतृत्व यामुळे त्यांची उपस्थिती स्वाभाविक आहे. पुढील वर्षीही भारताचे पंतप्रधान जी-७ मध्ये असतील, याची मला खात्री आहे.”
मोदींसोबतची द्विपक्षीय बैठक महत्त्वाची होती, असं कॅर्नी यांनी नमूद केलं. “ही बैठक पायाभूत होती. कायद्याची अंमलबजावणी, आंतरराष्ट्रीय दहशतवाद यावर मोकळी चर्चा झाली. परस्पर आदर, सार्वभौमत्व आणि विश्वासावर आधारित संबंध पुन्हा बांधण्याचा पाया घातला गेला,” असं त्यांनी सांगितलं.
दोन्ही नेत्यांनी उच्चायुक्त पुन्हा नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. “भारत आणि कॅनडामधील लोक आणि व्यवसायांचे घनिष्ठ संबंध आहेत. सध्या दूतावास सेवा आणि उच्चायुक्तांच्या अनुपस्थितीमुळे अडचणी येताहेत. या सेवा पुन्हा सुरू करणं गरजेचं आहे. आम्ही यासाठी वचनबद्ध आहोत,” असं कॅर्नी म्हणाले.
गेल्या वर्षी कॅनडाने प्रो-खलिस्तानी कार्यकर्ते हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येशी भारताच्या उच्चायुक्तांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारताने उच्चायुक्त आणि पाच राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावलं. भारतानेही कॅनडाच्या समान संख्येच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना हद्दपार केलं.
भारताने माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारवर खलिस्तानी समर्थकांना आश्रय देण्याचा आरोप केला होता. मार्चमध्ये ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर कॅर्नी यांनी सत्ता स्वीकारली. नव्या सरकारसोबत भारताने परस्पर विश्वासावर आधारित संबंध पुन्हा बांधण्याची आशा व्यक्त केली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter