SCO बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची दहशतवादाविरोधात कठोर भूमिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
SCO बैठकीत विविध देशांचे संरक्षण मंत्री.
SCO बैठकीत विविध देशांचे संरक्षण मंत्री.

 

चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) च्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमापार दहशतवाद आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या देशांच्या दुहेरी मानकांविरोधात भारताचा कठोर पवित्रा पुन्हा एकदा मांडला. त्यांनी दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेत SCO ला यासंदर्भात स्पष्ट आणि कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले.

राजनाथ सिंह म्हणाले, “काही देश सीमापार दहशतवादाला धोरणाचा भाग म्हणून वापरतात आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात. अशा दुहेरी मानकांना कोणतीही जागा असता कामा नये. SCO ने अशा देशांना निषेध व्यक्त करण्यास संकोच करू नये.” त्यांनी पुढे सांगितलं की, आपल्या क्षेत्रातील सर्वात मोठी आव्हानं शांतता, सुरक्षा आणि विश्वासाच्या कमतरतेशी संबंधित आहेत. यामागील मूळ कारणं म्हणजे कट्टरतावाद, अतिरेकी विचारसरणी आणि दहशतवाद यांचा वाढता प्रभाव. “शांतता आणि समृद्धी दहशतवाद आणि सामूहिक विनाशकारी शस्त्रांचा (Weapons of Mass Destruction) प्रसार यांच्यासोबत सहअस्तित्वात राहू शकत नाही, विशेषतः जेव्हा ही शस्त्रं गैर-राज्यकर्ते आणि दहशतवादी गटांच्या हातात असतात.”

या आव्हानांना तोंड देण्यासाठी निर्णायक कारवाई आवश्यक आहे, असं सांगत सिंह यांनी एकजुटीने लढण्याचं आवाहन केलं. “या दुष्कृत्यांविरोधात लढण्यासाठी आपण एकत्र यायला हवं, जेणेकरून आपली सामूहिक सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित होईल,” असं ते म्हणाले. यापूर्वी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही SCO च्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत असाच आक्रमक पवित्रा घेतला होता, हे विशेष उल्लेखनीय आहे. डोवाल यांनीही दहशतवादाविरोधात भारताची शून्य सहनशीलतेची नीती अधोरेखित केली होती.

राजनाथ सिंह यांनी भारताच्या दहशतवादाविरोधातील कठोर धोरणाचा पुनरुच्चार केला. “भारताची दहशतवादाविरोधातील शून्य सहनशीलता आज त्याच्या कृतीतून दिसून येते. यामध्ये स्वसंरक्षणाचा आमचा हक्क समाविष्ट आहे. आम्ही दाखवून दिलं आहे की, दहशतवादाचे केंद्रबिंदू आता सुरक्षित नाहीत आणि आम्ही त्यांना लक्ष्य करण्यास संकोच करणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

भारताने गेल्या काही वर्षांत दहशतवादाविरोधात घेतलेल्या कठोर पावलांचा उल्लेख करत सिंह यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांना इशारा दिला की, भारत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यांनी SCO मधील सर्व सदस्य देशांना एकत्र येऊन दहशतवाद आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्या तत्त्वांविरुद्ध ठोस पावलं उचलण्याचं आवाहन केलं. त्यांनी यावेळी कट्टरतावाद आणि अतिरेकी विचारसरणीच्या प्रसारावरही चिंता व्यक्त केली आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं नमूद केलं.

राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला प्राधान्य देताना, दहशतवादाला आळा घालण्यासाठी SCO च्या सदस्य देशांनी एकजुटीने कार्य करावं, असा संदेश दिला. त्यांच्या या भाषणाने भारताच्या दहशतवादाविरोधातील निर्धार आणि आंतरराष्ट्रीय मंचावर त्याची ठाम भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter