'जय हिंद' म्हणत इराणने 'असे' मानले भारतीयांचे आभार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

अमेरिका आणि इस्त्राईलच्या अलीकडील लष्करी हल्ल्यांदरम्यान तेहरानला समर्थन आणि एकजुटीचा संदेश देणाऱ्या भारतासह इतर देशांचे आणि संघटनांचे इराणने बुधवारी आभार मानले. दिल्लीतील इराणी दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, इराण स्वातंत्र्यप्रिय भारतीयांचे,  खरे आणि मौल्यवान समर्थन याची कदर करतं. त्यांनी संकटाच्या काळात संवेदनशीलता आणि धैर्य दाखवलं. मात्र, या निवेदनात भारत सरकारचा थेट उल्लेख टाळण्यात आला आहे.

रविवारी पहाटे अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रांवर केलेल्या बाँबहल्ल्यांमुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती. यामुळे इराण आणि इस्त्राईल यांच्यातील हिंसक संघर्ष आणखी तीव्र झाला. मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. बुधवारी लागू झाल्याचं दिसून आलं.

भारताने या युद्धविरामाचं स्वागत केलं आणि प्रादेशिक शांतता आणि समाधानासाठी रचनात्मक भूमिका निभावण्याची तयारी दर्शवली. इराणच्या दूतावासाने सांगितलं की, जेव्हा इराणी जनतेवर लष्करी हल्ल्यांचा धोका होता, तेव्हा भारतातून मिळालेला पाठिंबा, एकजुटीचे संदेश, सार्वजनिक निवेदनं आणि शांततेच्या अपील यांनी त्यांना उत्साह आणि प्रेरणा दिली.

इराणने भारतीयांच्या या समर्थनाला “उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी” संबोधलं. यावेळी त्यांनी भारतातील व्यक्ती आणि संस्थांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेची प्रशंसा केली. इराणच्या दूतावासाने या कठीण काळात भारतीयांनी दाखवलेल्या एकजुटीचं स्वागत करत त्यांना कृतज्ञता व्यक्त केली. युद्धविरामानंतरही इराणने शांततेच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचं आवाहन कायम ठेवलं आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter