दानिश अली
बर्फाच्छादित पर्वतांच्या खोऱ्यांमध्ये सरवर बुलबुल यांचा आवाज काश्मिरी लोकसंगीताच्या परंपरा जपत आहे. नात (पैगंबर मोहम्मद यांच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी कविता) ख्वान, कवी आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षक असलेले सरवर वयाच्या ५३व्या वर्षी काश्मीरच्या समृद्ध कलात्मक परंपरांचे प्रतीक बनले आहेत. आवाज-द व्हॉइसशी बोलताना ते म्हणतात, “प्रेषितांचे गुणगान गाणं हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्यासाठी हे केवळ संगीत नाही, तर इबादत (उपासना) आहे."
नातख्वान म्हणून सरवर यांनी प्रेषित मुहम्मद यांच्या स्तुतीपर नातीय कवितांच्या सादरीकरणातून आध्यात्मिकता आणि काश्मीरच्या कलात्मक वारशाचे संगम साधला आहे. त्यांचा आत्मीय आवाज आणि भक्तीपूर्ण सादरीकरणाने त्यांना काश्मीरमध्ये विशेष स्थान मिळवून दिलं आहे.
सरवर यांचा जन्म रफियाबाद डंगीवाचा येथे १९६९ मध्ये झाला. त्यांचे वडील गुलाम नबी शाह हे काश्मीरचे प्रसिद्ध लोकगायक होते. काश्मिरमध्ये त्यांना बुलबुल म्हणून ओळखले जायचे. सरवर यांच्या वडिलांनी त्यांच्या मधुर आवाजाने जम्मू-काश्मीरच्या सांस्कृतिक आत्म्याला देशभरात पोहोचवलं. १९६६ मध्ये श्रीनगरमधील एका मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणानंतर तत्कालीन मुख्यमंत्री बख्शी गुलाम मोहम्मद यांनी त्यांना 'बुलबुल'(काश्मिरीत कोकिळा) ही उपाधी दिली होती.
वयाच्या सातव्या वर्षी सरवर यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली संगीताची तालिम घ्यायला सुरू केला. तेव्हापासूनच त्यांनी नकळत केवळ नावच नव्हे, तर एक सांस्कृतिक वारसा आणि महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारली होती. सुरुवातीला सरवर यांनी फोक आणि शास्त्रीय संगीतात प्रशिक्षण घेतलं असलं. गायकीचा सराव करत अस्तानचा त्यांनी नातीय कलम स्वीकारलं आणि काश्मीर खोऱ्यात भक्तीपूर्ण सादरीकरणाने सर्वत्र ख्याती मिळवली. त्यांच्या 'गमझदां दिल फुलिन, खुदा बोजिन' आणि 'नबिया बर हक रसूल अन्ना ख' या नात त्यांच्या आध्यात्मिक खोली आणि गायन कौशल्यामुळे खूप लोकप्रिय आहेत.
सरवर यांचा आवाज आध्यात्मिकता आणि पिढ्यांचे भावनिक बंध जोडतो. त्यांच्या सादरीकरणाने तरुण पिढीला कलात्मक रचनेतून श्रद्धेची ओळख करून दिली आहे. या वारशाला पुढे नेण्यासाठी त्यांनी रफियाबाद येथे बुलबुल अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापन केली आहे. या अकादमीत ३० हून अधिक विद्यार्थी विशेषतः ग्रामीण आणि वंचित पार्श्वभूमीतील, काश्मिरी शास्त्रीय, सूफी आणि भक्ती संगीताचं प्रशिक्षण घेत आहेत.
याविषयी सरवर सांगतात. “बुलबुल अकादमीमध्ये आम्ही फक्त संगीत शिकवत नाही, तर काश्मीरची ओळख जपत आहोत. इथल्या प्रत्येक स्वरात आमचा विशिष्ट इतिहास आहे.” ही संगीत अकादमी पारंपरिक वाद्य, प्राचीन रचना आणि मौखिक परंपरांचं संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करत आहे. सरवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही अकादमी काश्मीरच्या सांस्कृतिक वारशाचं मंदिर बनली आहे.
सरवर हे प्रसिद्ध कवी देखील असून ते रफियाबाद अदबी मार्काझशी सक्रियपणे जोडलेले आहेत. त्यांच्या कविता प्रेम, अध्यात्म आणि बंधुता यावर आधारित आहेत. १९९२ मध्ये त्यांनी शब्दबद्ध केलेली 'दमा आक येती यमपरी मनी गब्रो' ही मातृप्रेमावर आधारित नझम दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. ही त्यांची कविता आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
२००६ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरवर यांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संगीतासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. याशिवाय माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या काश्मीर दौऱ्यावेळी सरवर यांनी त्यांच्यासमोर आपल्या कलेचे सादरीकरण केलं होतं.
आजच्या डिजिटल युगात सरवर बुलबुल काश्मीरच्या आध्यात्मिक आणि कलात्मक आत्म्याचे रक्षण करत आहेत. त्यांनी आपल्या कलेतील कसब व्यावसायिक न करता समाजाशी जोडण्याचं काम केलं. ते म्हणतात, “आपल्या समाजाची, संस्कृतीची आणि सृजनकर्त्याची सेवा कारण हेच माझं ध्येय आहे."
सरवर बुलबुल यांच्या एका विद्यार्थ्याने म्हटलं, “उस्ताद आम्हाला फक्त संगीत शिकवत नाहीत, तर अर्थपूर्ण जीवन कसं जगावं हे शिकवतात. यामुळे आम्हाला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळते.” आपल्या कलेच्या माध्यमातून सरवर बुलबुल काश्मीरच्या दैवी स्वर आणि सांस्कृतिक शहाणपणाला अमर ठेवत आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter