रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतासोबतचे काळाच्या कसोटीवर उतरलेले संबंध अधिक व्यापक आणि दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भारताने रशियासोबतचे सहकार्य कमी करावे, यासाठी अमेरिकेकडून होणारे सर्व प्रयत्न व्यर्थ असून ते आंतरराष्ट्रीय संबंधांना हानी पोहोचवणारे आहेत, असे पुतिन यांनी स्पष्ट केले. जगातील आघाडीच्या वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना पुतिन यांनी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे भरभरून कौतुक केले. भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक विस्तारण्यासाठी रशिया पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
"भारत ही जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असून सध्या भारताचा आर्थिक विकासाचा दर अत्यंत प्रभावी आहे," असे पुतिन यांनी नमूद केले. येत्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रशियासोबतचे संबंध मर्यादित करण्यासाठी भारतावर पाश्चात्य देशांकडून आणल्या जाणाऱ्या दबावाचा कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही, उलट अशी रणनीती आखणाऱ्यांवरच ती उलटणार असल्याचे पुतिन यांनी सुचवले.
पंतप्रधान मोदींवर दबाव आणणे अशक्य
अमेरिकेकडून काही आघाड्यांवर रशियासोबतच्या सहकार्याबाबत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संदर्भ देत पुतिन म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या भारतावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव आणणे आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी तसेच द्विपक्षीय संबंधांसाठी हानिकारक आहे, हे आता सर्वांना समजले आहे. हा दबाव कुठून येतो याने काही फरक पडत नाही, कारण आम्हाला याचे कोणतेही नकारात्मक परिणाम दिसत नाहीत.
या परिस्थितीमुळे आमच्या संबंधांवर कोणतेही गंभीर परिणाम झालेले नाहीत. आम्ही भारतासोबतचे संबंध अधिक विकसित करत आहोत आणि ते यापुढेही सुरूच ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले. पाश्चात्य देशांकडून भारत-रशिया संबंधांबाबत जाहीर केल्या जाणाऱ्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांचे हे वक्तव्य आले आहे. अमेरिका सातत्याने भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी कमी करण्याचे आवाहन करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केलेल्या कठोर परिश्रमांचाच हा परिणाम आहे की आज भारत जगातील सर्वोच्च आर्थिक विकास दर असणारी अग्रगण्य अर्थव्यवस्था बनला आहे, असे पुतिन यांनी पीटीआयच्या मुख्य संपादकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. नवी दिल्ली नेहमीच आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देईल आणि भारताचे अमेरिकेसोबतचे राजनैतिक संबंध रशियासोबतच्या जुन्या आणि विश्वासू संबंधांना कधीही बाधा आणणार नाहीत, यावर त्यांनी भर दिला.
वॉशिंग्टनसोबतच्या भारताच्या वाढत्या संबंधांमुळे रशियासाठी काही अडचण निर्माण होते का, असे विचारले असता पुतिन म्हणाले की, भारताला आपल्या राष्ट्रीय हितासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या सर्व देशांशी भारत संबंध विकसित करत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. रशिया भारताला एक 'विश्वासू भागीदार' मानतो आणि भारताच्या इतर कोणत्याही देशासोबतच्या द्विपक्षीय संबंधांमुळे आमच्या नात्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. भारत हा एक महान देश आणि लोकशाही आहे, रशिया त्यांच्यासोबतचे संबंध सातत्याने वाढवत राहील.
युक्रेन आणि पश्चिम आशिया संकटावर भाष्य
युक्रेन संघर्षाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पुतिन यांनी स्पष्ट केले की, ते हा वाद सोडवण्यासाठी तयार आहेत आणि आता मुख्य काम कीव्हला (Kyiv) पटवून देण्याचे आहे. युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेत युरोपीय युनियनचे देश मध्यस्थ म्हणून काम करू शकतात हा विचार त्यांनी फेटाळून लावला. युरोपीय युनियन युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याऐवजी तडजोड करण्यासाठी तयार करून हा संघर्ष सोडवण्यास मदत करू शकते, असे ते म्हणाले. त्यांनी युक्रेन संकटाला 'स्थानिक' समस्या म्हटले, तर इराणचा मुद्दा हा जागतिक असल्याचे सांगितले.
वर्षानुवर्षे रशियाचा धोरणात्मक पराभव करण्याच्या गोष्टी करणाऱ्या लोकांवर रशिया कसा विश्वास ठेवू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी योगदान देणाऱ्या कोणत्याही निर्णयाला पाठिंबा देण्यास रशिया तयार असल्याचे त्यांनी सांगितले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पुतिन म्हणाले की, युक्रेनच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपला आहे. ते तिथे निवडणुका घेणार आहेत की नाही, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे.