अच्छे दिन... ७० हजार तरुणांना मोदींचं गिफ्ट!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 10 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७० हजार तरुणांना जॉइनिंग लेटरचे वाटप करण्यात आले. या तरुणांना शासनाच्या विविध खात्यांमध्ये नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी १०.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे ७०,००० नवनियुक्त नोकरदारांना जॉइनिंग लेटर दिले.

 

देशात ४३ ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्याअंतर्गत ही जॉइनिंग लेटर वितरित करण्यात आली आहेत. रोजगार मेळा हा केंद्र सरकारचा एक विशेष उपक्रम आहे, ज्या अंतर्गत जॉइनिंग लेटर कोणत्याही अडचणीशिवाय दिली जातात. आगामी काळात रोजगार उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळावा महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी सरकारला आशा आहे.

 

कोणत्या विभागात नोकऱ्या मिळाल्या?

केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारही रोजगार मेळाव्यांतर्गत युवकांना जॉइनिंग लेटरचे वाटप करत आहेत. पंतप्रधान मोदींनी काल देशभरातून आर्थिक सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, महसूल विभाग, कल्याण विभाग, अणुऊर्जा विभाग, रेल्वे मंत्रालय, या विभागांमध्ये नवीन भरतीची निवड केली.

 

लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग आणि गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयासह विविध विभागांमध्ये नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जॉइनिंग लेटर देण्यात आले आहेत.

 

आतापर्यंत लाखो तरुणांना मिळाल्या नोकऱ्या:

रोजगार मेळाव्यात १० लाख नोकऱ्या दिल्या जात आहेत. सरकारी पोर्टल अंतर्गत १० लाख तरुणांना प्रशिक्षणही दिले जात आहे. तसेच ८ लाख ८२ हजार लोकांना SAC, UPSC आणि रेल्वे अंतर्गत नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

 

 

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रोजगार मेळावा ही भाजप आणि एनडीए सरकारची वेगळी ओळख बनली आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्तीपत्रे दिली जात आहेत.

 

पंतप्रधान मोदींनी जॉइनिंग लेटर मिळालेल्या तरुणांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. त्यांनी ७० हजार १२६ तरुणांना जॉइनिंग लेटर दिले आहेत.

 

मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत:

पंतप्रधान म्हणाले की, एका बाजूला जागतिक मंदी आहे. दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. मोठ्या कंपन्यांना भारतात यायचे आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.