खुशबू मिर्जा : अमरोहाच्या तरुणीचा इस्रोपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
खुशबू मिर्जा
खुशबू मिर्जा

 

स्वप्ने आणि सामाजिक बंधने यांच्यातील संघर्षात खुशबू मिर्जा यांचा प्रवास आशेचा किरण ठरला. त्यांची कहाणी धैर्य, बुद्धिमत्ता आणि क्रांतीची आहे. उत्तर प्रदेशातील सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध पण रूढीवादी अमरोहा गावातून त्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) चमकल्या. त्यांनी भारताच्या चंद्र संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
 
अमरोहाचे प्रसिद्ध पत्रकार सिराज नक्वी त्यांच्या यशाला गावाचा सन्मान म्हणून संबोधतात. ते म्हणतात, “अमरोहाने जौन एलिया, झुबैर रिझवी, रईस अमरोहवी यांसारखे साहित्यिक दिले. आता खुशबू मिर्जा यांच्या रूपाने देशाला वैज्ञानिक मिळाला." अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी असलेल्या खुशबू यांची कहाणी केवळ शैक्षणिक यशाची नाही, तर वैयक्तिक निश्चय आणि सांस्कृतिक बदलाची आहे.

खुशबू सात वर्षांच्या असताना त्यांचे वडील अभियंता सिकंदर मिर्जा यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या आई फरहत मिर्जा या पदवीधर आहेत.  स्वतः शिक्षित असल्यामुळे त्यांनी खुशबू यांच्यासाठी ठाम निर्णय घेतला. कौटुंबिक परिस्थितीचा परिणाम त्यांनी मुलांच्या भविष्यावर होऊ दिला नाही. नवऱ्याचे पेट्रोल पंपाचे व्यवस्थापन करत त्यांनी एकट्याने तीन मुलांचा सांभाळ केला. सामाजिक टीकेला तोंड देत त्या ठाम राहिल्या. मुलांना उत्तम शाळेत दाखल केले. त्यांच्यात शिक्षण, सन्मान आणि स्वावलंबनाची मूल्ये रुजवली. नवऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या तिन्ही मुलांना अभियंता बनवणार होत्या.
 

खुशबू यांनी २००६ मध्ये एएमयूतून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये सुवर्णपदक मिळवले. अभ्यासाबरोबर त्या शालेय स्तरावर व्हॉलिबॉल खेळल्या. एएमयूच्या इतिहासात विद्यार्थी संघ निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या. त्याच वर्षी त्या इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाल्या. चंद्रयान-१ मोहिमेत त्या तपासणी पथकाच्या प्रमुख होत्या. 

भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेने चंद्रावर पाण्याची उपस्थिती सिद्ध केली. खुशबू या पथकातील सर्वात तरुण सदस्य होत्या. त्यांनी मोहिमेच्या यशात मोलाचा वाटा उचलला. नंतर त्या चंद्रयान-२ मोहिमेत सहभागी झाल्या. २०१५ मध्ये त्यांना इस्रो पथक उत्कृष्टता पुरस्कार मिळाला. सध्या त्या इस्रोच्या प्रादेशिक रिमोट सेन्सिंग केंद्रात कार्यरत आहेत.
 

खुशबू यांचे यश विशेष ठरते कारण त्यांनी आपली ओळख पारंपरिक रूढींमध्ये अडकू दिली नाही. त्या म्हणतात, “मुस्लिम महिलांना मागासलेल्या, अशिक्षित किंवा निष्क्रिय समजले जाते. परंतु आम्ही प्रयोगशाळा, विद्यापीठे आणि कार्यालयांत हे खोटे ठरवत आहोत.” 

त्या पुढे म्हणतात, "रमजानमधील उपवास, नमाज आणि सहकाऱ्यांसोबत ईद साजरी करताना त्यांच्या धार्मिक श्रद्धा कधीच कामात अडथळा ठरल्या नाहीत. श्रद्धा आणि व्यावसायिकता यांचा संघर्ष होत नाही. मुळे खोलवर असली तरी तारे गाठता येतात,” असे त्या ठामपणे सांगतात.

आज खुशबू उत्तर प्रदेशातील शाळा आणि महाविद्यालयांत प्रमुख वक्त्या म्हणून बोलावल्या जातात. ग्रामीण आणि वंचित भागातील मुलींच्या शिक्षणासाठी त्या आवाज उठवतात. शिक्षण म्हणजे सक्षमीकरण असा संदेश त्या देतात. ग्रामीण भारतातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा दर्जा सुधारायला हवा, असे त्या म्हणतात. मुस्लिम मुलींना त्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन देतात. अमरोहा आणि आसपासच्या भागात आता अधिक मुली अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेत आहेत.

लेखक आणि अभ्यासक डॉ. राहत अबरार यांनी ‘चिलमन से चंद्रयान तक’ पुस्तकात त्यांचा प्रवास लिहिला आहे. “चंद्रयानचा उल्लेख होतो तेव्हा खुशबू मिर्जा यांचे नाव आपोआप येते,” असे ते म्हणतात.
 

छोट्या गावापासून ते इस्रो आणि चंद्रापर्यंत खुशबू यांचा प्रवास धैर्य, चिकाटी आणि शिक्षणाच्या परिवर्तनशील शक्तीची साक्ष आहे. मुस्लिम महिलांबद्दलच्या मर्यादित कथनात त्यांनी अनोखी कथा लिहिली. त्यांची कहाणी स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलीला आणि प्रतिकूल परिस्थितीतही पाठिंबा देणाऱ्या पालकांना प्रेरणा देते. “ताऱ्यांपलीकडे विश्व आहे आणि ते आपले आहे,” असे त्यांचे म्हणणे आहे.
 
- मन्सूरुद्दीन फरीदी

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter