नवी दिल्ली
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १२ वीच्या बोर्ड परीक्षेसाठी पुनर्मूल्यांकन (Re-valuation) आणि गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रविवारी जाहीर केले आहेत. मंडळाने अधिकृतपणे ही माहिती एक्स (X) वर पोस्ट करून दिली आहे.
सीबीएसईने स्पष्ट केले की, हे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर केले जात आहेत. आतापर्यंत प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी ८७ टक्क्यांहून अधिक अर्जांवर प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांची प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल, असे मंडळाने म्हटले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता, ते आता सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि ‘डिजीलॉकर’च्या (DigiLocker) माध्यमातून आपले अपडेटेड गुण पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करावा लागणार आहे.
उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या निकालांची प्रतीक्षा होती. मंडळाने निकाल जाहीर करण्यापूर्वी गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवणे आणि पुनर्मूल्यांकन यासाठी विद्यार्थ्यांसाठी खिडकी खुली केली होती. दरम्यान, नुकतेच काही विद्यार्थ्यांनी सीबीएसईद्वारे अपलोड केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती आणि त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात तफावत असल्याचा दावा केला होता, ज्यामुळे ओएसएम (OSM) प्रणालीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर पुनर्मूल्यांकनाचे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.