अनगडशाह आणि तुकाराम महाराज : हिंदू - मुस्लीम सौहार्दाची परंपरा

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 2 Years ago
संत तुकाराम महाराजांची पालखी आणि अनगडशाह बाबांचा दर्गा
संत तुकाराम महाराजांची पालखी आणि अनगडशाह बाबांचा दर्गा

 

वारकरी संप्रदाय हा संतपरंपरेचा वारसा लाभलेल्या या महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या संप्रदायांपैकी एक. समाजातील सर्व घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न हा संप्रदाय कायमच करत आलाय. आपल्या चाली-रीतींमधून समाजासमोर नेहमीच आदर्श निर्माण करत आलाय. या संप्रदायातील सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या चालीरीती समाजात दुहीचा विचार पेरणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या आहेत. हिंदू-मुस्लीम समन्वयाचा इतिहास सांगणाऱ्या अशाच एका परंपरेविषयी... 

-छाया काविरे ([email protected]
--------------------------------------------------------------- 

सर्व जातींना, सर्वधर्मीयांना एकाच छताखाली आणणाऱ्या सोहळ्याला, म्हणजेच पंढरपूरच्या आषाढी वारीला, नुकतीच (ता. १० जून) सुरुवात झाली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी देहूनगरीत मोठ्या संख्येनं भक्तांचा जनसागर लोटला होता. पहिल्या दिवशी तुकाराममहाराजांची पालखी देहूमध्येच इनामदारवाड्यात मुक्कामास थांबते. तशी ती यावेळीही थांबली. 

तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होताच, हिंदू-मुस्लिम एकतेचं दर्शन घडतं आणि साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’, या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव येतो. जात-धर्म-परंपरा यांच्या पलीकडे गेलेला पालखीसोहळा अवघ्या जगाला एकात्मतेचा संदेश देतो. कारण गेल्या शेकडो वर्षांपासून तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा घेते ती हजरत अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात.

दर्ग्यासमोरील मेघडंबरीत तुकाराम महाराजांची पालखी ठेवली जाते. ही मेघडंबरी अभंग-आरतीस्थान म्हणून ओळखली जाते. अनगडशाह बाबांच्या समाधीसमोर तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर तिथं अभंग गायिले जातात. यादरम्‍यान दर्ग्‍यात पालखीची पूजाही केली जाते. पुढं वारी पंढरपूरकडे मार्गस्थ होताना वारकरी अनगडशाह बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला निघतात. 

अनगडशाह बाबा आणि  तुकाराम महाराज यांच्या पालखीसोहळ्याची सुमारे चारशे वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम समाजाची एकता-समता-बंधुभाव यांचं प्रतीक म्हणून ही प्रथा आजही जपली जाते. तुकाराम महाराज आणि अनगडशाह बाबा या दोन संतांच्या भेटीचं प्रतीक म्हणून या भेटीकडे आजही पाहिलं जातं. या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी हजारो हिंदू-मुस्लिम भाविक या ठिकाणी येतात.

तुकाराम महाराजांच्या ‘अल्ला एक तू, नबी एक तू।...’, ‘अल्ला देवे अल्ला दिलावे।...’, ‘अल्ला करे सो होय, बाबा करतारका सिरताज।...’ यांसारख्या अभंगांमधून हिंदू-मुस्लिम सलोखा, समता, बंधुभाव, ममता, एकात्मता यांच्या खुणा दिसून येतात.

नेमके कोण होते अनगडशाह बाबा?
अनगडशाह बाबा हे स्वत: वारकरी संप्रदायातील होते. त्यामुळे जेव्हा त्यांचा उरूस भरतो तेव्हा त्यांचे मुस्लिम भाविक दर्ग्यात कोणतीही कुर्बानी देत नाहीत किंवा मांसाहारी पदार्थांचा नैवेद्यही दाखवत नाहीत. बाबांच्या समाधीसमोर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. 

तुकाराम महाराजांच्या चरित्रकारांपैकी एक पांडुरंग बालाजी कवडे 'संतश्रेष्ठ तुकाराम महाराज' या आपल्या ग्रंथात अनगडशाह यांच्याविषयी लिहितात... 'देहूपासून काही अंतरावर चिंचवड हे गाव आहे. तुकाराम महाराजांच्या काळी चिंचवड येथे मोरया गोसावी (चिंतामणि देव) या नावाचे गणपती भक्त होते. ते महान् भक्त असून त्यांना सिद्धिसामर्थ्य आहे, अशी त्यांच्या - संबंधी पुणे प्रांतात प्रसिद्धी होती. त्या काळी पुणे शहरात अनगडशाह या नावाचे मुसलमान फकीर होते. ते ईश्वरभक्त असून मोठे अवलिया होते. भक्तीच्या जोरावर त्यांनाही सिद्धीची प्राप्ती झाली होती. 

ते चिंचवड येथे चिंतामणी देवाच्या भेटीस गेले. चिंतामणी देवाच्या वाड्यासमोर अनगड शाहांनी भिक्षेची आरोळी ठोकली. चिंतामणी देवांनी त्यांना भिक्षा वाढण्यास सांगितले. भिक्षा वाढण्यास आलेल्या इसमास अनगडशाह म्हणाले, 'कटोरा भरून पाहिजे' फकिराची इच्छा चिंतामणी देवास कळविली. त्यांनी कटोरा भरून भिक्षा वाढण्यास सांगितले, भिक्षा बरीच वाढली तरी कटोरा भरत नाही, ही आश्चर्यकारक गोष्ट चिंतामणी देवास सांगण्यात आली. त्यांनी धान्याची पेवे उघडून भिक्षा घालण्यास सांगितले. तरी अनगडशाह सिद्धीच्या जोरावर कटोरा भरू देईनात. याचे मुख्य कारण चिंतामणी देवाने जाणले. ते स्वतः उठले व बाहेर आले. त्याने सिद्धि-सामर्थ्याने कटोरा भरविला. पण फकिराने सिद्धीच्या बळावर तो तत्काळ रिकामा केला. त्यावेळी चिंतामणी देवांस अनगडशाहाची खरी योग्यता कळली. त्यांनी अनगडशाहांचा सन्मान केला व त्यांना वाड्यात आणून बसविले.

तुकाराम महाराजांचे साधुत्व व कीर्ती अनगडशाहाच्या ऐकिवात होती. त्यांचीही परीक्षा पाहण्याचे त्यांनी ठरविले. अनगडशाह देहू गावी आले. त्यांनी महाराजांच्या दाराशी भिक्षेची आरोळी ठोकली. 'आपल्या दाराशी भिक्षा मागण्यास आलेल्या कोणासही घरात धान्य असल्यास देत जाणे. नसल्यास गोड शब्दाने बोलून समाधानपूर्वक परत करणे', असे महाराजांचे जिजाबाईस सांगणे होते. पतिदेवाची आशा जिजाबाई तंतोतंत पाळीत असे. 

फकीराने भिक्षा मागताच जिजामातेने मुलगी गंगू हीस सांगितले, 'मडक्या - दन त्या फकीरास पीठ वाढ, 'गंगूने आपल्या चिमकुल्या हाताच्या ओंजळीत पीठ घेतले व फकीराच्या कटोऱ्यात टाकले. पीठ कटोऱ्यात पडताच तो भरून खाली सांडू लागला. हे दृश्य पाहून अनगडशाह एकदम चकित झाला. सिद्धीसामर्थ्याचा विसर पडून तो मुलीकडे आश्चर्याने पाहत उभा राहिला. नंतर त्यांनी प्रश्न केला 'तुझे नाव तुकाराम ?' हे ऐकून गंगूस हसू आले ती म्हणाली, 'तुकाराम माझे बाबा आहेत.' ते कोठेतरी भजन करीत असतील. 

अनगडशाह न थांबता महाराजांच्या दर्शनास गेले. नंतर ते देहूस वरचेवर येऊ लागले. शेवटचे दिवस देहूत घालवून तेथेच त्यांनी देहाचे विसर्जन केले. त्यांची समाधी (कबर) देहू गावाजवळ आजही सुस्थितीत आहे. त्या समाधीची सर्व व्यवस्था महाराजांच्या वंशजाकडून होत आहे.’ वरील आख्यायिका अनेक चरित्रकारांनी आपल्या पुस्तकात लिहिली आहे. प्रस्तुत लेखकासही ती महाराजांच्या वंशजाकडून देहू येथे समजली आहे.

काय आहे या परंपरेचा इतिहास?
तुकाराम महाराजांचा नावलौकिक ऐकून अनगडशाह पुण्याहून देहू या गावी आले होते. तेव्हा त्यांना तुकाराम महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचीती आली. तुकाराम महाराजांची विठोबाविषयीची भक्ती, श्रद्धा, तसंच तुकाराम महाराजांचा दानशूरपणा यामुळे या मुस्लिम संतानं त्यांच्याशी सौहार्दाचे संबंध जोडले. पुढं दोघांमध्ये मैत्रीचं नातं तयार झालं. देहूतील अंधेरीबाग या ठिकाणी अनगडशाह राहत असत. याच ठिकाणी मागील तीनशेहून जास्त वर्षांपासून तुकाराम महाराजांची पालखी थांबते.

आजही अनगडशाह बाबा दर्ग्याच्या पुजाऱ्याचा मान हिंदुधर्मीय मुसुडगे कुटुंबाकडे आहे. सध्या गोविंद मुसुडगे हे दर्ग्याचे पुजारी आहेत. त्यांच्या तीन पिढ्या या दर्ग्याची सेवा करत आहेत. गोविंद यांच्या आजोबांनी या दर्ग्याची सेवा करायला सुरुवात केली होती. त्यानंतर काही वर्षं गोविंद यांच्या वडिलांनीदेखील या ठिकाणी सेवा केली. त्या दोघांनंतर २००९ पासून गोविंद हे या दर्ग्यात सेवा करत आहेत. गोविंद सांगतात, “आम्ही आणि आमचं कुटुंब मनोभावे या दर्ग्याची सेवा करतो आणि पुढंही करत राहू.”

तुकाराम महाराजांनी जमीन दिली
तुकाराम महाराजांचे वंशज माणिकमहाराज मोरे सांगतात, "तुकाराम महाराजांची जीवनप्रणाली ज्या तत्त्वानं कार्यरत झाली ते सर्वधर्म समभावाचं तत्त्व आहे. याच भक्तिसंप्रदायाच्या चळवळीत तुकाराम महाराजांना सगळ्या धर्मांच्या लोकांनी मदत केली. त्यामुळे हे मंदिर भक्तिसंप्रदायाचं प्रतीक आहे. तुकाराम महाराजांनी आयुष्यभर जात-धर्म बाजूला ठेवून काम केलं. अनेकांचा उद्धार केला. त्याकाळी अनगडशाह बाबा तुकाराम महाराजांसोबत कीर्तनालादेखील जात असत. त्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग अनगडशाह बाबा यांना दिला होता. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून पालखीनं प्रस्थान ठेवलं की पहिलं कीर्तन व आरती बाबांच्या दर्ग्यात होते.”

धार्मिक हिंसेचा परिणाम नाही
राज्यात अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिमांचे वाद आणि तेढ निर्माण झाल्याचं आपण पाहत आहोत. मात्र, या प्रकारच्या वादांचा पालखी सोहळ्यावर किंवा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि होतही नाही. याबाबत अधिक बोलताना माणिक महाराज सांगतात, "संत हे जाती-धर्माच्या पलीकडे असतात. जोपर्यंत माणसाला एखाद्या गोष्टीचा खरा अर्थ कळत नाही तोपर्यंत कोणताही माणूस काठीचा आधार घेऊन चालत असतो. मात्र, ज्या वेळी समग्र जगाचं कल्याण संतांना कळतं त्यावेळी स्थिती बदलते. मग संतांपुढं, संतांनी दिलेल्या अखिल मानवतेच्या शिकवणुकीपुढं समाज नतमस्तक होत असतो." 

महाराष्ट्राची सामाजिक, आध्यात्मिक जडणघडण आणि एकोपा कायम ठेवण्यात अशाच कृती महत्त्वाच्या ठरत आल्या आहेत. अशा उदाहरणांनी सामाजिक वीण अधिकाधिक मजबूत होण्यास मदत मिळते. त्यामुळे राज्यात किंवा देशात धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटना घडत असल्या तरी तुकाराम महाराजांची पालखी आणि अनगडशाह बाबांचा दर्गा आपली सामाजिक वीण उसवू देत नाहीत.

अनगडशाह बाबा दर्ग्याचे भाविक सुहेल अत्तार सांगतात, ‘‘माझे आजोबा अबुल अत्तार माळकरी होते. ते एकादशीचा उपवास करायचे. दरवर्षी आषाढी वारीला जायचे. अनगडशाह बाबांइतकीच आमची संत तुकाराम महाराजांवरही श्रद्धा आहे.’’ 

कसा आहे दर्गा?
दर्ग्याच्या गाभाऱ्यात चादर पांघरलेली कबर आहे. तिथं अरबी भाषेत कुराणातील 'आयात' (श्लोक) छापलेल्या आहेत. दर्ग्यात नेहमीच मोगरा, गुलाब, जास्वंद या फुलांनी सजावट केलेली असते. एका भिंतीच्या कोनाड्यात तेलाचा दिवा ठेवलेला आहे व तो अहोरात्र तेवत असतो. कोपऱ्यात दोन मोरपिसं आणि भिंतीवर 'चाँद-तारा'ची प्रतिकृती आहे. इथली पूजा ज्येष्ठ नागरिक पोपट बिरदवडे व गोविंद मुसुडगे करतात. अक्षय्यतृतीयेला अनगडशाह बाबांचा उरूस असतो. सर्वधर्मीय भाविक या उरसात मोठ्या उत्साहानं सहभागी होत असतात.