अजमेर दर्गा उर्सनिमित्त पंतप्रधान मोदींनी पाठवली चादर आणि शुभेच्छा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण करताना अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू
राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण करताना अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू

 

राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यात सध्या ८१४ वा वार्षिक उर्स सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने दर्ग्यावर एक मानाची चादर अर्पण करण्यात आली. केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधानांनी पाठवलेली ही चादर स्वतः अजमेरला आणली. त्यांनी संपूर्ण धार्मिक परंपरा आणि रितीरिवाजांचे पालन करत ही चादर दर्ग्यात अर्पण केली. या भेटीदरम्यान त्यांनी देशातील शांतता, समृद्धी आणि सामाजिक सौहार्दासाठी प्रार्थना केली.
 
चादर अर्पण केल्यानंतर केंद्रीय मंत्री रिजिजू मेहफिलखाना येथे गेले. तिथे उपस्थित खादिमांनी पारंपरिक दस्तरबंदी करून त्यांचा यथोचित सन्मान केला आणि त्यांना प्रसाद (तबर्रुक) दिला. यानंतर बुलंद दरवाजा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी दिलेला संदेश वाचून दाखवण्यात आला. या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दर्गा परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात होता.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रिजिजू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "मला पुन्हा एकदा अजमेर शरीफला भेट देण्याची संधी मिळाली. यासाठी मी स्वतःला अत्यंत नशीबवान समजतो," असे त्यांनी सांगितले. हे पवित्र स्थान लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. येथून प्रेम, माणुसकी आणि एकतेचा संदेश जगभर पसरतो, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्व समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. या भेटीत दर्गा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि खादीम यांनी रिजिजू यांचे स्वागत केले. देशाच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक एकोपा टिकून राहण्यासाठी आपण विशेष प्रार्थना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिजिजू यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, आम्हाला अजमेर शरीफसाठी खूप काम करायचे आहे. संसदेच्या कायद्यांतर्गत याचे कामकाज चालते. त्यामुळे सर्व गोष्टींचा आढावा घेणे ही माझी जबाबदारी आहे. 

या भेटीपूर्वी रिजिजू म्हणाले होते की, आम्ही दरवर्षी येथे येतो. गेल्या वर्षीही आम्ही आलो होतो. सर्व लोक आणि देशाची भरभराट व्हावी, तसेच सर्वत्र सौहार्द आणि शांतता कायम राहावी, अशी मी प्रार्थना करेन. आपण सर्वांनी विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करावी, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

अजमेर शरीफ दर्गा हे भारतातील सर्वात पवित्र सुफी स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी उर्स उत्सव साजरा करण्यासाठी जगभरातून लाखो भाविक येथे जमतात. ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिस्ती यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

तत्पूर्वी, किरेन रिजिजू यांनी रविवारी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी हिमाचल प्रदेशातील बौद्ध शिष्टमंडळाची भेट घेतली. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या भेटीची झलक शेअर करत त्यांनी माहिती दिली. त्यांनी लाहुल, स्पीती, किन्नौर आणि धर्मशाळा येथील बौद्ध समुदायाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. सौहार्द, संस्कृती आणि सामायिक मूल्यांवर आधारित हा एक अतिशय उबदार आणि अर्थपूर्ण संवाद असल्याचे त्यांनी नमूद केले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter