आमीर सुहैल वानी
पवित्र रमजान महिन्याची सांगता ईद-उल-फित्र या सणाने होते. मुळात हा सण संयम, कृतज्ञता आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक मोठा उत्सव आहे. तीस दिवसांचे उपवास, शिस्त, दानधर्म आणि आत्मचिंतनानंतर हा मंगल दिवस उजाडतो. अल्लाहच्या अधिक जवळ जाण्यासाठी भाविक या काळात अनेक कायदेशीर सुखांवरही स्वतःहून मर्यादा घालतात.
पण इथे एक मोठा विरोधाभास पाहायला मिळतो. या शिस्तीचा गोडवा अनुभवण्याच्या दिवशीच अनेकदा अतिरेक, चंगळवाद आणि सामाजिक दिखावेबाजीला उधाण येते. रमजानची पवित्र भावना पुढे नेण्याऐवजी अनेकदा अगदी विरुद्ध वर्तन घडते. ईदचा खरा आदर राखायचा असेल, तर आपण साधेपणाची कास धरायला हवी. विशेषतः खाण्यापिण्यात, सामाजिक वर्तनात आणि भौतिक सवयींमध्ये संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. साधेपणाने हा सण साजरा केल्यास त्याला एक खरा आणि सखोल अर्थ प्राप्त होईल.
ईदच्या दिवशी अन्नाचा अतिरेक ही एक अत्यंत नाजूक पण सर्वत्र आढळणारी समस्या आहे. महिनाभराच्या कडक उपवासानंतर चांगले अन्न खाण्याची इच्छा होणे अगदी स्वाभाविक आहे. इस्लामने सणाचा आनंद लुटायला अजिबात मनाई केलेली नाही. पण संयमाकडून अतिरेकाकडे जाणारा हा प्रवास अनेकदा खूप वेगाने आणि विचार न करताच घडतो.
मोठमोठ्या मेजवान्या, चमचमीत पदार्थांची रेलचेल आणि अतिखाण्याची सवय ईदच्या मूळ कृतज्ञतेच्या भावनेला झाकोळून टाकते. दिवसाची सुरुवात 'जकात-अल-फित्र'ने होते. समाजातील अत्यंत गरीब घटकांनाही ईदचा आनंद घेता यावा, हा यामागचा मुख्य हेतू आहे. हे दान सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आणि सहानुभूतीची शिकवण देते. तरीही अतिरेकी मेजवानीच्या संस्कृतीतून श्रीमंती आणि गरिबी यांच्यात एक मोठी दरी निर्माण होते.
ईदच्या दिवशी खाण्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे सणाचा आनंद हिरावून घेणे नव्हे. अन्नाचा आदर करत केवळ गरजेपुरतेच अन्न शिजवणे आणि साधेपणा जपणे यात अभिप्रेत आहे. कुटुंबासोबत घेतलेले साधे जेवण आणि मनातील कृतज्ञतेची भावना रमजानच्या शिकवणुकीशी अधिक सुसंगत असते. अवाढव्य मेजवानीतून केवळ अन्नाची नासाडी होते आणि शारीरिक त्रास पदरी पडतो.
कपडे, भेटवस्तू आणि सामाजिक अपेक्षांमधूनही ईदचा हा भपका प्रकर्षाने दिसून येतो. नवे कपडे घालणे ही एक 'सुन्नत' आणि नवनिर्माणाचे प्रतीक आहे. पण या परंपरेचे रूपांतर आता संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या प्रदर्शनात झाले आहे. यामुळे तिचा मूळ उद्देशच हरवला आहे. खरी गरज नसतानाही अनेक कुटुंबे सामाजिक दबावापोटी ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतात.
यातून केवळ आर्थिक ओढाताणच होत नाही. समाजात तुलना आणि स्पर्धेची एक चुकीची संस्कृती फोफावते. अशा वेळी सणाचे मूल्य आंतरिक समाधानापेक्षा बाह्य देखाव्यावर मोजले जाते. इथे साधेपणाचा अर्थ आपला मूळ हेतू पुन्हा शोधणे हा आहे. कपड्यांमध्ये साधेपणा निवडणे, थाटमाटापेक्षा स्वच्छता आणि प्रतिष्ठेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. खरी सुंदरता ही नम्रतेतच दडलेली असते.
जेव्हा एखादी व्यक्ती इतरांवर छाप पाडण्याची गरज सोडून देते, तेव्हा तिला एक वेगळेच स्वातंत्र्य मिळते. याच स्वातंत्र्यातून खऱ्या अर्थाने आणि मनापासून ईदचा निखळ आनंद अनुभवता येतो.
सध्या ईदला अशा अनेक प्रथा चिकटल्या आहेत, ज्यांचा अध्यात्माशी काहीही संबंध नाही. यातून अतिरेकाची आणखी एक पातळी तयार होते. केवळ ओझे म्हणून एकमेकांच्या घरी भेटीगाठी घेण्याची सवय वाढली आहे. घरगुती कार्यक्रमांमध्ये मोठेपण मिरवण्याचा एक प्रकारचा दबाव असतो.
सणाचे सेलिब्रेशन सोशल मीडियावर दाखवण्याच्या नादात मूळ गांभीर्य आणि प्रामाणिकपणा नष्ट होतो. या प्रथांमधून खरी नाती जोडली जात नाहीत. उलट यातून थकवा येतो आणि आपण कुठे तरी कमी पडत आहोत, अशी नकारात्मक भावना निर्माण होते.
मुळात ईद हा कृतज्ञता, परमेश्वराचे स्मरण आणि समाज बांधणीचा दिवस आहे. जेव्हा दुय्यम प्रथा मूळ उद्देशावर वरचढ ठरतात, तेव्हा सणाचे आध्यात्मिक महत्त्व कमी होते. यावरील खरा उपाय म्हणजे जाणीवपूर्वक साधेपणा स्वीकारणे. अर्थपूर्ण गोष्टींनाच वेळ देणे आणि लोकांशी प्रामाणिकपणे संवाद साधणे गरजेचे आहे. सणाच्या आनंदाच्या वातावरणातही आत्मचिंतन, प्रार्थना आणि नामस्मरणासाठी आवर्जून वेळ काढायला हवा.
ईदच्या दिवशी साधेपणा स्वीकारल्याचे भौतिक फायदे तात्काळ आणि दूरगामी असतात. अन्नाचा अतिरेक टाळल्याने आरोग्य चांगले राहते आणि अन्नाची नासाडी टळते. ही गोष्ट जबाबदार जीवनशैलीशी पूर्णपणे मिळतीजुळती आहे. आर्थिकदृष्ट्या अनावश्यक खर्च टाळल्यास कुटुंबाला पैशांचा अधिक योग्य वापर करता येतो.
हा वाचलेला पैसा दानधर्म, मुलांचे शिक्षण किंवा दीर्घकालीन भल्यासाठी वापरता येतो. सामाजिक पातळीवर विचार केल्यास स्पर्धेचा दबाव कमी होतो. समाजातील सर्व स्तरांतील लोक कोणतीही कमी न वाटून घेता सणात उत्साहाने सहभागी होऊ शकतात. साधेपणाला महत्त्व देणाऱ्या समाजात ईद हा सण भेदभाव निर्माण करण्याऐवजी सर्वांना एकत्र आणणारा एक सुंदर अनुभव बनतो.
याचे आध्यात्मिक फायदे तर याहूनही अधिक खोल आहेत. साधेपणामुळे रमजानमध्ये लावलेली शिस्त कायम राहते. मानवी मन पुन्हा जुन्या बेसावध सवयींकडे वळत नाही. उपभोग घेण्याऐवजी आहे त्याबद्दल आदर बाळगण्याची सवय लागते. भपक्याकडून प्रामाणिकपणाकडे कल वाढल्याने कृतज्ञतेची भावना जोपासली जाते.
जाणीवपूर्वक अतिरेक टाळणे म्हणजे रमजानची भक्ती ईदच्या दिवसापर्यंत पुढे नेणे होय. यातून हा दिवस भक्तीचा केवळ समारोप न ठरता तिची सर्वोच्च पातळी ठरतो. या दृष्टिकोनातून सहानुभूतीची भावना अधिक गडद होते. सणाच्या दिवशीही संघर्ष करणाऱ्या गरीब बांधवांची जाणीव मनात जागी राहते. दिखावा आणि चंगळवादावर जगणाऱ्या अहंकाराला यामुळे वेसण घातली जाते.
थोडक्यात सांगायचे तर, साधेपणाने ईद साजरी करणे म्हणजे स्वतःला आनंदापासून दूर ठेवणे अजिबात नाही. ती आनंदाची एक नवी व्याख्या शोधण्याची प्रक्रिया आहे. साधेपणात, सामूहिक प्रार्थनेत आणि खऱ्याखुऱ्या हास्यात खरा आनंद शोधणे यात अभिप्रेत आहे. महिनाभराची खडतर भक्ती पूर्ण केल्याचे एक शांत समाधान यातून मिळते.
रमजानचे धडे सण संपल्यावर विसरून न जाता ते वर्षभर पाळणे अत्यंत गरजेचे आहे. संयम, कृतज्ञता आणि करुणा हे ते मोलाचे धडे आहेत. अशा पद्धतीने विचार केल्यास ईद हा केवळ एक सण राहत नाही. तो माणसाच्या बदललेल्या आणि उन्नत व्यक्तिमत्त्वाचा आरसा बनतो. हे व्यक्तिमत्त्व भपक्यापेक्षा अर्थपूर्णतेला, दिखाव्यापेक्षा प्रामाणिकपणाला आणि भौतिक संपत्तीपेक्षा आध्यात्मिक श्रीमंतीला अधिक महत्त्व देते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -