विकासाच्या नावाखाली संस्कृतीचा बळी देऊ नका - NSA अजित डोवाल

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
नवी दिल्लीत बोलताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
नवी दिल्लीत बोलताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

 

आवाज द व्हॉइस / नवी दिल्ली

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी विकासाची कास धरतानाच आपली सांस्कृतिक ओळख जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. शनिवारी नवी दिल्लीत आयोजित 'रैबार-७' कार्यक्रमात या दोन्ही दिग्गज मान्यवरांनी उत्तराखंडच्या भविष्यातील भूमिकेवर प्रकाश टाकला.

'रैबार' हा एक गढवाली शब्द असून त्याचा अर्थ 'संदेश' असा होतो. ही एक पारंपारिक संवाद पद्धत आहे जी विश्वास आणि भावनिक जोडणीवर आधारित आहे. अजित डोवाल यांनी या शब्दाचा सखोल अर्थ उलगडून सांगताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपण स्थानिक परंपरा विसरू नये, अशी भीती व्यक्त केली. ते म्हणाले, "रैबार हा गढवाली लोकांसाठी केवळ शब्द नसून एक महत्त्वाची भावना आहे. ही एक अशी संवाद यंत्रणा आहे जी पूर्णपणे विश्वासार्ह आणि अवलंबून राहण्याजोगी आहे." तंत्रज्ञानाने संवाद वाढवला असला तरी त्यात पूर्वीसारख्या भावना उरल्या नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

विकासाबाबत बोलताना डोवाल यांनी स्पष्ट केले की, प्रगती ही केवळ गुंतवणूकदारांपुरती मर्यादित नसावी. उत्तराखंडचा विकास म्हणजे तिथल्या भूमिपुत्रांचा आणि तिथे प्रामाणिकपणे गुंतवणूक करणाऱ्यांचा विकास असावा. "जर उत्तराखंड हे फाईव्ह स्टार पर्यटन स्थळ बनले तर ती चांगली गोष्ट आहे, पण त्या नादात आपली मूळ संस्कृती हरवली तर ती मोठी हानी असेल," असा इशाराही त्यांनी दिला. आपल्या पालकांनी दिलेल्या संस्कारांची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्या परंपरा विसरू नयेत, हाच खरा 'रैबार' आहे.

याच कार्यक्रमात बोलताना सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी २०४७ पर्यंत भारताला 'विकसित राष्ट्र' बनवण्याच्या प्रवासात उत्तराखंडच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले. ते म्हणाले, "जेव्हा भारत २०४७ मध्ये विकसित होईल, तेव्हा उत्तराखंडने केवळ त्याचे फायदे घेऊ नयेत, तर त्यात मोठे योगदानही दिले पाहिजे." राज्याचा विकास हा देशाच्या विकासाच्या गतीने व्हावा यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, उत्तराखंडने केवळ सहभागी न होता, या विकास प्रक्रियेचे 'नेतृत्व' करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.