इक्रा हसन : घराणेशाहीच्या पलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणारी तरुण खासदार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
इक्रा हसन
इक्रा हसन

 

 

विदुषी गौर, नवी दिल्ली

 

 

राजकारणात अनेकदा प्रस्थापित घराणी आणि वारशाने मिळालेल्या सत्तेचाच दबदबा असतो. पण इक्रा हसन एका नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यात राजकीय वारसा आणि शिक्षणाचा उत्तम मेळ दिसतो. त्यांच्याकडे ठाम विश्वास आणि सावधगिरी आहे. तसेच त्यांच्या महत्त्वाकांक्षेला जबाबदारीची जोड आहे. त्यांचा राजकीय प्रवास म्हणजे केवळ वारसा चालवणे नाही. तर आजच्या भारतात नेतृत्वाची, प्रतिनिधित्वाची आणि प्रेरणेची एक नवी व्याख्या तयार करणे आहे.

इक्रा हसन यांचा जन्म एका राजकीय कुटुंबात झाला. त्यांनी राजकारण केवळ लांबून पाहिले नाही, तर ते प्रत्यक्ष जगले आहे. त्यांचे वडील मुनव्वर हसन हे एक अत्यंत अनुभवी नेते होते. ते उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पश्चिम उत्तर प्रदेशात त्यांचा जनसंपर्क आणि दबदबा खूप मोठा होता. या भागातील राजकीय दिशा ठरवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. इक्रा यांना वडिलांकडून केवळ समाजसेवेचा वारसा मिळाला नाही. तर त्यांना राजकीय आघाड्या, तडजोडी, जनतेच्या अपेक्षा आणि जबाबदारीचे ओझे या सर्व गोष्टींची अगदी लहानपणापासूनच समज मिळाली.

इक्रा हसन यांचा राजकीय प्रवास केवळ त्यांच्या कुटुंबाच्या पुण्याईवर अवलंबून नाही. अनेक जण राजकारणात आपोआप येतात. पण इक्रा यांनी तसे केले नाही. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी पूर्ण तयारी केली. सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी स्वतःला बौद्धिकदृष्ट्या सक्षम केले. हे त्यांच्या शिक्षणावरून स्पष्ट होते. त्यांनी दिल्ली आणि परदेशातून कायद्याचे उच्च शिक्षण घेतले आहे. या शिक्षणामुळे त्यांना संविधानाची मूल्ये, नागरी हक्क आणि संस्थांचे कामकाज याविषयी सखोल ज्ञान मिळाले.

या ज्ञानामुळे त्या राजकारणाकडे केवळ भावनेच्या भरात न पाहता अत्यंत विश्लेषणात्मक नजरेने पाहतात. आजच्या लोकशाहीत ध्रुवीकरण आणि गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा वेळी हा विश्लेषणात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

इक्रा हसन यांच्या मते राजकारणात बोलण्याइतकेच ऐकणेही महत्त्वाचे असते. त्यांनी आपल्या मतदारसंघात सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना शेतीचे प्रश्न, बेरोजगारी आणि समाजातील फूट अशा अनेक समस्या दिसल्या. पश्चिम उत्तर प्रदेशात आर्थिक प्रश्न आणि जाती-धर्माचे राजकारण नेहमीच एकमेकांत मिसळलेले असते. यात अनेकदा सर्वसामान्य नागरिक भरडला जातो.

या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संयम आणि संवेदनशीलतेची गरज होती. विशेषतः एका तरुण महिलेसाठी हे अधिक आव्हानात्मक होते. कारण या क्षेत्रात प्रामुख्याने वयस्कर आणि अनुभवी पुरुषांचीच मक्तेदारी असते.

राजकारणात आव्हाने येणे साहजिकच होते. त्यांच्या वयावर आणि अनुभवावर अनेकांनी शंका घेतली. कुटुंबाच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे लोकांच्या अपेक्षांचे ओझेही त्यांच्यावर होते. पण त्यांनी या अडथळ्यांना घाबरून माघार घेतली नाही. उलट याच आव्हानांतून त्यांनी स्वतःला सिद्ध केले. त्यांनी केवळ पोकळ भाषणे दिली नाहीत. त्या सातत्याने लोकांमध्ये राहिल्या.

त्यांनी लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि स्थानिक प्रश्न सोडवले. पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरही त्यांनी स्वतःचा आवाज ठामपणे मांडला. त्यांच्या राजकीय शैलीत आक्रमकतेपेक्षा संयम अधिक दिसतो. राजकारणात अनेकदा दिखाव्यावर जास्त भर दिला जातो. पण त्यांनी जाणीवपूर्वक या दिखाव्याला फाटा दिला आहे.

परंपरा आणि बदल यांचा सुरेख मेळ त्यांच्या प्रवासात दिसतो. हीच गोष्ट त्यांना अधिक प्रेरणादायी बनवते. त्या आपल्या वडिलांच्या राजकीय वारशाचा खूप आदर करतात. पण त्या केवळ त्याची आंधळी नक्कल करत नाहीत. त्या हा वारसा आजच्या काळाला अनुरूप बनवण्याचा प्रयत्न करतात.

आजच्या तरुण मतदारांना राजकारणात पारदर्शकता हवी असते. महिलांना केवळ नावापुरते प्रतिनिधित्व नको असते. लोक आता नेत्याचा केवळ वारसा पाहत नाहीत, तर त्याच्या कामाचे मूल्यमापन करतात. याच वास्तवाची त्यांना पूर्ण जाण आहे.

इक्रा हसन यांचा राजकारणातील वावर अत्यंत सूचक आहे. संसदेतील एक तरुण मुस्लिम महिला म्हणून त्या जुन्या बुरसटलेल्या धारणांना अत्यंत शांतपणे पण तितक्याच ताकदीने आव्हान देत आहेत. प्रतिनिधित्व म्हणजे केवळ संख्या वाढवणे नाही. तर त्याला एका निश्चित ध्येयाची जोड असली पाहिजे, हे त्यांचा प्रवास अधोरेखित करतो.

त्यांनी स्वतःला कधीही केवळ नावापुरती महिला नेत्या म्हणून समोर आणले नाही. त्यांनी नेहमी शिक्षण, रोजगार, शेतकऱ्यांचे कल्याण आणि संविधानिक हक्क यांसारख्या सर्वसमावेशक प्रश्नांवर भर दिला. राजकारण सर्वांना सामावून घेणारे असावे, त्यात कुणालाही वगळले जाऊ नये, हा विचार त्या वारंवार मांडतात.

त्यांना केवळ सत्तेची लालसा नाही. राजकारण हे परंपरा पुढे नेण्याचे आणि त्यात योग्य सुधारणा करण्याचे एक माध्यम आहे, असे त्या मानतात. लोकांशी जोडले जाण्याची परंपरा पुढे नेणे आणि बदलत्या अपेक्षांनुसार त्यात योग्य ते बदल करणे, हे त्यांचे ध्येय आहे. राजकारणाचा खरा उपयोग उपेक्षित लोकांचा आवाज उठवण्यासाठी झाला पाहिजे. तसेच नागरिक आणि संस्थांमधील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी राजकारण हे एक उत्तम साधन आहे. असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

आजकाल राजकारणाबद्दल लोकांच्या मनात मोठी निराशा आहे. अशा काळात इक्रा हसन यांचा प्रवास एक वेगळीच प्रेरणा देतो. या प्रवासाचा पाया पूर्वतयारी, संयम आणि ध्येय यावर उभा आहे. त्या राजकीय वारसा पूर्णपणे नाकारत नाहीत. पण त्या केवळ त्या वारशावर अवलंबून न राहता स्वतःच्या कामातून आणि अभ्यासातून आपली योग्यता सिद्ध करतात. लोकशाहीत नेहमी नवे आवाज आले पाहिजेत. पण ते केवळ अधिकाराच्या भावनेतून न येता, लोकांबद्दलची सहानुभूती आणि खंबीर निश्चयातून यायला हवेत. त्यांची ही गोष्ट आपल्याला याचीच आठवण करून देते.

इक्रा हसन यांची राजकीय कारकीर्द आता वेगाने फुलत आहे. एक अत्यंत विचारशील नेतृत्व कसे असावे, याचे त्या उत्तम उदाहरण आहेत. हे नेतृत्व भूतकाळाकडून शिकते, वर्तमानात लोकांशी जोडले जाते आणि भविष्याकडे डोळसपणे पाहते. निष्ठा आणि शिक्षणाची जोड असेल तर राजकारण आजही लोकांना प्रेरणा देऊ शकते, हा अत्यंत साधा पण तितकाच प्रभावशाली विचार त्या आपल्या कृतीतून मांडतात.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter