"आमची भूमी तुमच्याविरोधात वापरू देणार नाही"; तालिबानचा भारताला शब्द

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्तकी
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्तकी

 

"अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी होऊ दिला जाणार नाही," असे स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण आश्वासन अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी दिले आहे. नवी दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना, त्यांनी भारताच्या "संतुलित धोरणाचे" कौतुक केले आणि पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

आपल्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मुत्तकी यांनी सांगितले की, "भारताने अफगाणिस्तानसोबत एक संतुलित आणि प्रादेशिक हिताचे धोरण ठेवले आहे. ते कोणत्याही एका गटाला पाठिंबा देत नाहीत." पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका करताना ते म्हणाले की, काही देश अफगाणिस्तानला आपल्या अंतर्गत राजकारणाचा आखाडा बनवू पाहतात, जे चुकीचे आहे.

यावेळी त्यांनी भारत-अफगाणिस्तान व्यापारावरही भर दिला. ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील व्यापार वाढवण्यासाठी पाकिस्तानने वाघा बॉर्डरचा मार्ग खुला करावा आणि भारताने इराणच्या चाबहार बंदराचा अधिक प्रभावीपणे वापर करावा.

भारताने काबूलमधील आपले तांत्रिक पथक पुन्हा 'दूतावास' म्हणून सुरू करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. "ही एक चांगली सुरुवात आहे," असे ते म्हणाले. त्यांनी काबूलमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण हमी दिली.

'इसिस-खुरासान' (Daesh) या दहशतवादी संघटनेच्या धोक्यावर बोलताना, त्यांनी सांगितले की, "आम्ही या संघटनेचा ९८% खात्मा केला आहे. ही केवळ आमचीच नव्हे, तर संपूर्ण प्रदेशाची समस्या आहे आणि आम्ही भारताकडून या लढ्यात सहकार्याची अपेक्षा करतो." मात्र, त्यांनी कोणत्याही संयुक्त लष्करी कारवाईची शक्यता फेटाळून लावली.