दिल्ली स्फोटाचा केंद्रीय मंत्रिमंडळाकडून तीव्र निषेध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटाच्या दहशतवादी घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बुधवारी झालेल्या या बैठकीत, मंत्रिमंडळाने निष्पाप बळींच्या सन्मानार्थ दोन मिनिटे मौन पाळले.

या बैठकीनंतर, मंत्रिमंडळाने या घटनेचा तीव्र निषेध करणारा आणि देशाच्या सुरक्षेप्रती वचनबद्धता व्यक्त करणारा एक ठराव संमत केला.

मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार :

"राष्ट्रविरोधी शक्तींनी १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी लाल किल्ला परिसरात कार स्फोट घडवून आणला. देशाने एका अमानुष दहशतवादी घटनेचा अनुभव घेतला आहे. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला आणि इतर अनेक जण जखमी झाले," असे ठरावात म्हटले आहे.

मंत्रिमंडळाने या निरर्थक हिंसाचाराच्या बळींना विनम्र आदरांजली वाहिली आणि शोकसंतप्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त केल्या.

"मंत्रिमंडळ सर्व जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे. तसेच, पीडितांना काळजी आणि आधार देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांच्या तत्पर प्रयत्नांचे कौतुक करत आहे.", असे यावेळी नमूद करण्यात आले.

"निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या नीच आणि भ्याड कृत्याचा मंत्रिमंडळ निःसंदिग्धपणे निषेध करत आहे," असे ठरावात ठामपणे नमूद करण्यात आले.

या ठरावाद्वारे, दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या (zero tolerance) धोरणाप्रती भारताची अतूट वचनबद्धता मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा व्यक्त केली.

तसेच, जगभरातील अनेक सरकारांकडून मिळालेल्या एकजुटीच्या आणि समर्थनाच्या संदेशांचीही मंत्रिमंडळाने दखल घेत कौतुक केले.

"संकटाच्या प्रसंगी धैर्य आणि करुणेने वागणाऱ्या अधिकारी, सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांच्या वेळेवर आणि समन्वित प्रतिसादाची मंत्रिमंडळ कौतुकाने नोंद घेत आहे. त्यांचे समर्पण आणि कर्तव्यभावना अत्यंत प्रशंसनीय आहे," असेही ठरावात म्हटले आहे.

तपासाला सर्वोच्च प्राधान्य

मंत्रिमंडळाने या घटनेच्या तपासाबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. "या घटनेचा तपास अत्यंत तातडीने आणि व्यावसायिकतेने केला जावा, जेणेकरून गुन्हेगार, त्यांचे साथीदार आणि त्यांचे सूत्रधार यांना ओळखून, विलंब न लावता त्यांना न्याय दिला जाईल.परिस्थितीवर सरकारच्या सर्वोच्च स्तरावरून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे." असे निर्देश देण्यात आले. 

शेवटी, सर्व भारतीयांचे जीवन आणि कल्याण सुरक्षित ठेवण्याच्या सरकारच्या दृढ संकल्पाची पुष्टी या ठरावाद्वारे करण्यात आली.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter