नवी दिल्ली
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्या आगामी नवी दिल्लीतील ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या भेटीपूर्वी इराणने भारताला एक अत्यंत महत्त्वाचा राजनैतिक भागीदार म्हणून अधोरेखित केले आहे. भारत आणि इराणमधील संबंध दीर्घकालीन, ऐतिहासिक आणि सभ्यतापूर्ण असल्याचा पुनरुच्चार करतानाच, या बहुपक्षीय व्यासपीठांमुळे द्विपक्षीय व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य आणखी वेगाने पुढे जाईल, असा विश्वास इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
किर्गिझस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या २६ व्या शाओघाय सहकार संघटनेच्या (SCO) परिषदेच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्यात नुकतीच उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भारतासोबतच्या मैत्रीवर भर दिला. विशेषतः चाबहार बंदर, रस्ते वाहतूक आणि लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाला दोन्ही देशांच्या अजेंड्यावर सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांना परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची आणखी एक मोठी संधी मिळणार आहे, असे बाघाई यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदींनी बिश्केक येथील बैठकीत प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि सागरी व्यापाराच्या स्वातंत्र्यावर भर दिला होता. भारत हा SCO आणि BRICS या दोन्ही महत्त्वाच्या संघटनांचा सदस्य असून, इराणसोबतचे व्यापारी व आर्थिक संबंध अधिक व्यापक करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले होते.