काश्मीरमध्ये आयएसआयचा नवा कट; ओजीडब्ल्यू कामगारांना राजकीय पक्षांमध्ये सामील होण्याचे आदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी चालवलेल्या धडक मोहिमेमुळे आणि तपासाच्या चक्रातून सुटण्यासाठी पाकिस्तानातील गुप्तहेर संघटना 'आयएसआय'ने (ISI) एक अत्यंत घातक रणनीती आखली आहे. काश्मीर खोऱ्यातील 'ओव्हर ग्राउंड वर्कर्स' (OGWs) च्या प्रस्थापित नेटवर्कला राष्ट्रीय स्तरावरील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांमध्ये घुसखोरी करण्याचे आदेश आयएसआयने दिले आहेत, अशी माहिती वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राजकीय संरक्षणाचा अयशस्वी प्रयत्न

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिकडेच श्रीनगर पोलिसांनी अटक केलेल्या काही ओव्हर ग्राउंड वर्कर्सच्या चौकटीत ही बाब समोर आली आहे. अटक करण्यात आलेले काही संशयित आधीच राष्ट्रीय राजकीय पक्षांचे सदस्य बनल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दहशतवादी संघटनांना रसद पुरवणे, तरुणांची भरती करणे आणि निधी गोळा करण्याचे काम करणाऱ्या या समर्थकांना वैध राजकीय रचनेत समाविष्ट करून सुरक्षा दलांच्या कारवाईपासून वाचवण्याचा आयएसआयचा मुख्य हेतू आहे. जेव्हा सुरक्षा दल शोधमोहीम राबवतात, तेव्हा हे ओव्हर ग्राउंड वर्कर्स स्वतःचा बचाव करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांचे प्राथमिक सदस्यत्व कार्ड दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कोणत्याही राजकीय नेतृत्वाने अशा घटकांना वाचवण्यासाठी कधीही पाऊल उचलले नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

जुन्या संघटनांचे पुनरुज्जीवन करण्याचा डाव

सुरक्षा दलांच्या वाढत्या दबावामुळे आणि स्थानिक पाठिंबा कमी झाल्यामुळे आयएसआय आता कमालीची हताश झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा थेट सहभाग लपवण्यासाठी ९० च्या दशकाच्या सुरुवातीला कार्यरत असलेल्या आणि आता मृतप्राय झालेल्या स्थानिक दहशतवादी संघटनांना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स' (FATF) कडून पाकिस्तानवर सतत देखरेख ठेवली जात असल्याने, काश्मीरमधील दहशतवादाला स्थानिक स्वरूप देण्याचा हा पाकिस्तानाचा प्रयत्न आहे.

सुरक्षा यंत्रणा सध्या 'अल-उमर मुजाहिद्दीन', 'अल बद्र' आणि 'तेहरीक-उल-मुजाहिद्दीन' यांसारख्या जुन्या संघटनांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या संघटनांचे सर्वोच्च कमांडर अद्यापही पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षित आश्रयाला आहेत, तर त्यांचे जमिनीवरील नेटवर्क पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा या सर्व घडामोडींवर कडक नजर ठेवून असून ओजीडब्ल्यूने तयार केलेले जाळे नष्ट करण्यासाठी आणि तरुणांच्या वैचारिक दिशाभूल रोखण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलत आहेत