पंतप्रधान अमेरिका-भारत संबंधांना खूप महत्त्व देतात - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 Months ago
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

 

 

आवाज द व्हॉइस ब्यूरो / नवी दिल्ली

"पंतप्रधान मोदी अमेरिका-भारत भागीदारीला खूप महत्त्व देतात आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत त्यांचे नेहमीच खूप चांगले वैयक्तिक संबंध राहिले आहेत," असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सांगितले. भारत-अमेरिका संबंधांबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यावर ते प्रतिक्रिया देत होते.

यापूर्वी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलताना भारत-अमेरिका संबंधांना 'एक खास नाते' म्हटले होते आणि आपण व पंतप्रधान मोदी नेहमीच मित्र राहू, असे म्हटले होते. मात्र, त्याच वेळी, "ते (पंतप्रधान मोदी) सध्या जे करत आहेत, ते मला आवडत नाही," असे म्हणत त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली होती.

"मी (पंतप्रधान) मोदींसोबत नेहमीच मित्र असेन. ते एक महान पंतप्रधान आहेत. पण ते सध्या जे करत आहेत, ते मला आवडत नाही. तरीही भारत आणि अमेरिका यांच्यात एक खास नाते आहे. काळजी करण्यासारखे काही नाही," असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केल्याबद्दल आपण "खूप निराश" असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

ट्रम्प यांच्या या वक्तव्याला पंतप्रधान मोदी यांनी 'X' वरून सकारात्मक प्रतिसाद दिला होता. नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांच्या सकारात्मक मूल्यांकनाची मी प्रशंसा करतो. भारत आणि अमेरिका यांच्यात एक अतिशय सकारात्मक आणि भविष्यवेधी 'सर्वसमावेशक जागतिक सामरिक भागीदारी' आहे."

या सर्व घडामोडींवर भाष्य करताना, एस. जयशंकर म्हणाले की, "आम्ही अमेरिकेशी संवाद साधत आहोत आणि सध्या यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही."

यापूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनीही या संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले होते. "अमेरिका आणि भारत यांच्यातील हे नाते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ही भागीदारी अनेक स्थित्यंतरे आणि आव्हानांमधून तावून सुलाखून निघाली आहे. आम्हाला आशा आहे की हे संबंध परस्पर आदर आणि समान हितांच्या आधारावर पुढे जात राहतील," असे ते म्हणाले होते.