"बांगलादेशात अल्पसंख्याकांचे प्राण आणि मालमत्ता सुरक्षित ठेवणे ही सरकारची जबाबदारी"

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष मलिक एम. खान
जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष मलिक एम. खान

 

बांगलादेशातील सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती 'जमात-ए-इस्लामी हिंद' अत्यंत चिंतेने पाहत आहे. या संदर्भात जमात-ए-इस्लामी हिंदने बांगलादेश सरकारवर जोर दिला आहे की, देशातील परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्यासोबतच अल्पसंख्याकांच्या जान-मालाच्या सुरक्षिततेची खात्री केली जावी.

शांतता हीच प्राथमिकता
जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष मलिक एम. खान यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, "आम्ही बांगलादेशातील उच्च अधिकाऱ्यांकडे मागणी करतो की, देशातील शांततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. तिथे लोकशाही, सार्वजनिक शांतता आणि कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी प्रामाणिक आणि भक्कम प्रयत्न केले जावेत."

खान पुढे म्हणाले की, "बांगलादेशात सध्या राजकीय अस्थिरता आणि हिंसेचे जे वातावरण दिसत आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. विशेषतः या परिस्थितीत अफवांच्या आधारे एका हिंदू बांधवाची जमावाकडून हत्या करण्यात आली. जमात-ए-इस्लामी हिंद या घटनेचा तीव्र निषेध करते. ही घटना अत्यंत दुःखद आणि गंभीर आहे. हा सिलसिला पुढे वाढण्यापासून रोखण्याची गरज आहे."

नागरी समाजाच्या प्रयत्नांचे स्वागत
मलिक एम. खान यांनी जनतेलाही आवाहन केले की त्यांनी शांतता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपली भूमिका पार पाडावी. ज्या लोकांनी आणि गटांनी अल्पसंख्याकांचे प्राण, मालमत्ता आणि प्रार्थनास्थळांच्या संरक्षणासाठी पावले उचलली, त्यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. तसेच, बांगलादेशच्या पंतप्रधानांनी या घटनेचा निषेध करून गुन्हेगारांना शिक्षा देण्याची जी घोषणा केली आहे, तिचेही त्यांनी स्वागत केले.

अल्पसंख्याकांचे रक्षण हेच यशाचे गमक
व्हिडिओ संदेशात त्यांनी एका महत्त्वाच्या सत्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, "कोणत्याही देशातील शांतता, लोकशाही आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या यशाचे मोजमाप हे तिथे अल्पसंख्याक किती सुरक्षित आहेत, यावरूनच ठरते. त्यामुळे अशा घटनांना अजिबात किरकोळ मानले जाऊ नये. बांगलादेश सरकारने प्रभावी पावले उचलून हिंसाचार थांबवावा."

मलिक खान पुढे म्हणाले की, "निष्पाप माणसाचा जीव घेणे हा एक नैतिकदृष्ट्या गंभीर गुन्हा आहे. अशा कृत्यांनी समाजात गुन्हेगारी वाढते आणि सामाजिक समतोल बिघडतो. या प्रकरणात तातडीने कारवाई करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी. जर त्यांना वेळेवर शिक्षा मिळाली नाही, तर त्यांचे धैर्य वाढेल आणि जनतेचा सरकार, न्यायालय व कायद्यावरचा विश्वास उडेल."

बांगलादेशच्या प्रगतीसाठी सदिच्छा
जमात-ए-इस्लामी हिंदने बांगलादेशच्या जनतेशी सहानुभूती व्यक्त केली आहे. "आम्हाला आशा आहे की लवकरच बांगलादेशातील परिस्थिती सुधारेल, शांतता प्रस्थापित होईल आणि लोकशाही संस्था योग्य दिशेने काम करतील," असे संघटनेने म्हटले आहे.

भारताच्या शेजारी असलेला बांगलादेश हा एक सुदृढ, प्रगत आणि न्यायावर आधारित समाज बनावा, अशी आमची इच्छा आहे. तिथले नागरिक शांतता, कायदा आणि प्रेमावर आधारित समाज घडवण्यासाठी पुढे सरसावतील, अशी अपेक्षा जमात-ए-इस्लामी हिंदने व्यक्त केली आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter