केदारनाथजवळ हेलिकॉप्टर दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 h ago
केदारनाथ येथे झालेली हेलिकॉप्टर दुर्घटना.
केदारनाथ येथे झालेली हेलिकॉप्टर दुर्घटना.

 

उत्तराखंडातील केदारनाथ येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. गौरीकुंड परिसरातील त्रियुगीनारायणजवळ हा अपघात घडला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर 'आयर्न एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड' या खासगी कंपनीचे होते. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे केदारघाटी परिसरात हेलिकॉप्टरला कोसळले आणि त्याला आग लागली. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील जयस्वाल कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे.

खराब हवामानामुळे निर्माण झालेली शून्य दृश्यमानता ही अपघाताचे कारण ठरली. या अपघाताची चौकशी विमान अपघात तपास विभाग (एएआयबी) करणार असल्याचे हवाई वाहतूक विभागाने सांगितले. या हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी, एक बालक आणि एक कर्मचारी होता. 'हेलिकॉप्टरने सकाळी ५.१० वाजता गुप्तकाशी येथून उड्डाण केले आणि सकाळी ५.१८ वाजता श्री केदारनाथजी हेलिपॅडवर उत्तरले. त्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा सकाळी

५.१९ वाजता गुप्तकाशीसाठी उड्डाण केले आणि ते गौरीकुंडजवळ कोसळले,' असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चारधाम मंदिरांवरील हेलिकॉप्टर सेवा दोन दिवसांसाठी स्थगित केली आहे. गेल्या महिन्यात आठ तारखेला गंगोत्री धाम येथे जाणारे हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. 

हेलिकॉप्टर अपघाताच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील हेलिकॉप्टर सेवांसाठी कठोर निर्देश जारी केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात हेलिकॉप्टर सेवांच्या संचालनासाठी एक मार्गदर्शक प्रणाली तयार करणे आवश्यक आहे. त्यामध्ये हेलिकॉप्टरची तांत्रिक स्थिती तपासणे बंधनकारक असावे. तसेच हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यापूर्वी हवामानाची स्थिती देखील तपासली गेली पाहिजे. राज्याच्या मुख्य सचिवांनी तांत्रिक सहकार्य घेऊन याबाबत लवकरात लवकर कार्यप्रणाली जाहीर करावी, असा आदेशही देण्यात आला आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर तीनच दिवसांत हा दुसरा हवाई अपघात झाला आहे. 

सात मृतांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथील यात्रेकरूंचा समावेश आहे. हेलिकॉप्टरचे वैमानिक राजवीर सिंग चौहान यांनी भारतीय सैन्यदलांत १५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली होती आणि विविध भूप्रदेशांवर उड्डाण करण्याचा त्यांना अनुभव होता. जयपूरच्या शास्त्रीनगरचे रहिवासी असलेले चौहान ऑक्टोबर २०२४ पासून आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडसोबत वैमानिक म्हणून कार्यरत होते. 

'आर्यन'ची हेलिकॉप्टर सेवा थांबवली
या अपघातानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने आर्यन एव्हिएशनची चारधाम यात्रेसाठी असलेली हेलिकॉप्टर सेवा तातडीने थांबवली आहे. तसेच दोन हेलिकॉप्टर पायलटचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून डीजीसीएने केदारनाथ भागातील हेलिकॉप्टर उड्डाणांवर देखरेख ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
या दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील जयस्वाल कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची अवघ्या दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल यांचा समावेश आहे. अपघातात कॅप्टन राजवीर सिंग चौहान (वय, ३९, रा. जयपूर), विक्रम रावत (वय, ४७ बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे प्रतिनिधी आणि रासीचे रहिवासी) विनोद देवी (वय ६६) आणि तृष्टी सिंग (वय १९, दोघेही रा. उत्तर प्रदेश) यांचाही समावेश आहे.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter