एनएसए अजित डोवाल यांच्या उपस्थितीत ‘या’ मुद्द्यांवर झाली उच्चस्तरीय बैठक

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

नवी दिल्ली

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच देशाच्या सुरक्षा धोरणावर महत्त्वपूर्ण घडामोडी सुरू झाल्या आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'च्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान, तसेच लष्कर, नौदल आणि वायुसेना प्रमुख उपस्थित होते. 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाचे पुनरावलोकन करून पुढील कार्ययोजना आखण्यात आली.

एनएसए डोवाल यांनी नुकतेच 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबाबत पाकिस्तानी दाव्यांचे खंडन केले होते. 'एकही फोटो दाखवून सत्यता पडताळा,' असे आव्हान त्यांनी विदेशी माध्यमांना दिले. याच पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. भारतीय लष्करी तळांना कोणतेही नुकसान झाले नाही, तर लक्षित नऊही दहशतवादी तळांना यशस्वीरित्या लक्ष्य केले असे डोवाल यांनी स्पष्ट केले. राजनाथ सिंह आणि एनएसए डोवाल यांच्यासोबत तिन्ही सेवा प्रमुखांची उपस्थिती सरकार भारतीय सुरक्षा संरचनेबाबत कोणतीही ढिलाई करणार नाही हा संदेश देते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे  
या बैठकीत 'ऑपरेशन सिंदूर'च्या सध्याच्या उपलब्ध्या आणि रणनीतीचा आढावा घेतला. पाकिस्तानी शस्त्रसंधी उल्लंघनांवर नेमकी कशी प्रतिक्रिया द्यायची आणि नियंत्रण योजनांचा आराखडा कसा तयार करायचा यावरही चर्चा झाली. पुढील योजनांसाठी सीमापार सुरक्षा तयारीचे मूल्यांकनही करण्यात आले. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान वापरलेल्या ब्राम्होस क्षेपणास्त्रांच्या वापराबाबत आणि भविष्यातील ग्राहक मागणीवरही या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीतून भारत एक व्यापक आणि रणनीतिक सुरक्षा दृष्टिकोन वापरत आहे, ज्यात लष्करी कारवाई आणि कूटनीतिक पातळीवर समतोल साधला जातो हे दिसून येते. प्रमुख संरक्षण आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची एकत्रित उपस्थिती आणि पंतप्रधान स्तरावर नियमित संवाद हे दर्शवते, 'ऑपरेशन सिंदूर' केवळ एक तात्काळ प्रतिक्रिया नाही, तर दीर्घकालीन रणनीतीचा एक भाग आहे.

संसदेत विरोधक आक्रमक, सरकार चर्चेसाठी सज्ज
राजनाथ सिंह, अमित शहा, जे. पी. नड्डा आणि किरेन रिजिजू यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी गुरुवारी संरक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी रणनीती बैठक घेतली. २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

रविवारच्या नेहमीच्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी, मंत्र्यांच्या गटाने सरकारच्या भूमिकेवर रणनीती आखली. विरोधकांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. यात बिहारमधील मतदार यादीचे विशेष सघन पुनरीक्षण (SIR), पहलगाम हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर' यांचा समावेश आहे.

बैठकीच्या अजेंड्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. परंतु सूत्रांनी सांगितले, ही बैठक अधिवेशनाशी संबंधित होती. संरक्षण मंत्री सिंह यांच्याशिवाय, गृहमंत्री शहा, आरोग्य मंत्री नड्डा आणि संसदीय कामकाज मंत्री रिजिजू, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी पियुष गोयल आणि जी. किशन रेड्डी हेही रणनीती बैठकीत उपस्थित होते.

विरोधक एसआयआर आणि 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी दबाव टाकत आहेत. सरकारने ट्रम्प यांचा शस्त्रसंधीचा दावा फेटाळला आहे, परंतु विरोधक यावर चर्चेसाठी आग्रही आहेत. त्यांनी या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही केली आहे. सरकारने 'ऑपरेशन सिंदूर'ला मोठे यश म्हटले आहे. या कारवाईत पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे आणि लष्करी सुविधांना मोठे नुकसान झाले आहे.

राजनाथ सिंह सहसा सर्वपक्षीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. संसदेचे अधिवेशन २१ ऑगस्ट रोजी संपणार आहे. सिंह यांनी नंतर संरक्षण दलाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. संसदेत 'ऑपरेशन सिंदूर'वर ते निवेदन देऊ शकतात, अशी शक्यता आहे.