पश्चिम आशियातील बिघडत चाललेली सुरक्षा व्यवस्था आणि इराणकडून संयुक्त अरब अमिरातीवर (UAE) करण्यात आलेले क्षेपणास्त्र हल्ले या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या कठीण काळात भारत यूएईच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.
पंतप्रधान मोदींनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, "माझे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी चर्चा झाली. यूएईवरील हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. अशा कठीण परिस्थितीत भारत यूएईच्या पाठीशी उभा आहे. आम्ही या भागात शांतता, सुरक्षितता आणि तणाव कमी करण्याच्या भूमिकेचे समर्थन करतो."
गेल्या दोन दिवसांत इराणने यूएईवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत. या हल्ल्यांमध्ये एका भारतीय नागरिकासह डझनभर लोक जखमी झाले आहेत, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इराणने डागलेली १५२ क्षेपणास्त्रे आणि ५०६ ड्रोन यशस्वीरित्या नष्ट केले आहेत. मात्र, तरीही पडलेल्या अवशेषांमुळे काही ठिकाणी नागरी मालमत्तांचे नुकसान झाले असून दुबई आणि अबुधाबीमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.
पंतप्रधान मोदींनी यूएईमध्ये राहणाऱ्या सुमारे ३५ लाख भारतीयांची विशेष काळजी घेतल्याबद्दल राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले. आखाती देशांमध्ये सध्या ९० लाखांहून अधिक भारतीय नागरिक नोकरी आणि व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. युद्धाच्या या छायेत या नागरिकांची सुरक्षा ही भारतासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे.
इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या या प्रतिहल्ल्यांमुळे संपूर्ण पश्चिम आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारताने सर्व बाजूंनी संयम बाळगण्याचे आणि राजनैतिक संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीत परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठकही घेतली असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.