कारगिलच्या शूरवीरांना 'सरहद शौर्यथॉन'ने सलाम: लडाखमध्ये भव्य आयोजन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
सरहद शौर्यथॉन २०२५
सरहद शौर्यथॉन २०२५

 

कारगिल युद्धातील शूरवीरांच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी 'सरहद शौर्यथॉन' या शर्यतीचे आयोजन करण्यात आले. रविवार २२ जूनला द्रास येथील ऐतिहासिक कारगिल युद्ध स्मारकावर हा भव्य सोहळा पार पडला. लडाखसह देशभरातून मोठ्या संख्येने नागरिक यात सहभागी झाले.

कारगिल विजय दिवसाची नांदी
ही शर्यत २६ जुलैला येणाऱ्या कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची सुरुवात आहे. कारगिल विजय दिनी भारताने १९९९ च्या कारगिल युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे आणि त्यावेळी भारतीय सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले जाते.

उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एलएएचडीसी-कारगिलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी नगरसेवक मोहम्मद जाफर अखून आणि लष्कराचे तसेच नागरी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कारगिल युद्धातील वीरांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या पर्वतांच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यात फिटनेस, देशभक्ती आणि स्मरण यांचा मिलाफ झाला.

शौर्यथॉनमधील सहभाग
लष्कर आणि सरहद पुणे यांनी या 'शौर्यथॉन'चे आयोजन केले होते. यात पाच किमी, १० किमी आणि २१ किमी अशा विविध शर्यत गटांमध्ये तरुणाई, शाळकरी विद्यार्थी, सशस्त्र दलाचे जवान आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सहभागींनी द्रासच्या खडबडीत भूभागातून धाव घेतली. कारगिल संघर्षादरम्यान भारतीय शूर सैनिकांनी केलेल्या प्रवासाचे हे प्रतीकात्मक स्मरण होते.

उपमुख्यमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन
अखून यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सशस्त्र दलांनी दिलेल्या बलिदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, शर्यतीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. "सरहद शौर्यथॉन आपल्याला आपल्या सैनिकांचे धैर्य आणि लोकांच्या एकजुटीची आठवण करून देते," असे ते म्हणाले. नंतर, अखून यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कारगिलच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. शिंदे यांनी द्रास उप-जिल्हा रुग्णालयाला सीटी-स्कॅन मशीन आणि कारगिल जिल्ह्यासाठी काही रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले. द्रासमध्ये पर्यटनालाही पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कारगिल विजय दिन
कारगिल युद्धात मातृभूमीसाठी प्राणार्पण केलेल्या ५५९ सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिन साजरा केला जातो.