"भारत शरण येणार नाही, हे ट्रम्प यांना कळून चुकले," माजी राजदूतांचे मोठे विधान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
भारताचे अमेरिकेतील माजी राजदूत तरणजीत सिंग संधू
भारताचे अमेरिकेतील माजी राजदूत तरणजीत सिंग संधू

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-विरोधी भूमिकेत आलेल्या नरमाईवर, भारताचे अमेरिकेतील माजी राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी मोठे विधान केले आहे. "भारत कोणत्याही दबावापुढे शरण येणार नाही, हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कळून चुकले आहे," असे म्हणत संधू यांनी भारताच्या कणखर भूमिकेचे कौतुक केले.

अमेरिकेने भारतावर लादलेल्या कठोर व्यापारी शुल्कांनंतर, ट्रम्प यांच्या स्वरात झालेला बदल हा भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेचा विजय असल्याचे संधू यांनी सूचित केले.

एका मुलाखतीत बोलताना तरणजीत सिंग संधू यांनी ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर 'ट्रिपल टी - ट्रम्प्स ट्विटर टँट्रम्स' (Trump's Twitter Tantrums) असा टोला लगावला. ते म्हणाले की, भारताच्या स्वतःच्या 'रेड लाईन्स' (red lines) आहेत आणि देश आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, भारताने स्पष्ट केले आहे की आम्ही आमच्या लोकांसाठी आणि आमच्या हितासाठी उभे राहू. मला वाटते की हा संदेश वॉशिंग्टनपर्यंत पोहोचला आहे," असे तरणजीत सिंग संधू म्हणाले.

व्यापारी तणाव असूनही, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध खूप मजबूत आणि बहुआयामी असल्याचेही त्यांनी नमूद केले. "आपले संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित नाहीत. संरक्षण, तंत्रज्ञान आणि लोकांचे संबंध यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये आपली भागीदारी आहे," असे ते म्हणाले.

तरणजीत सिंग संधू यांनी यावर भर दिला की, दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे आणि ही भागीदारी दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या मते, मुत्सद्देगिरी आणि संवाद हाच या व्यापारी तणावातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग आहे.