राज्यासह देशभरात काल या वर्षातील अखेरचे खग्रास चंद्रग्रहण दिसले. ढगाळ वातावरण असल्याने अनेक ठिकाणी ग्रहण पाहता आले नाही. मात्र, पुण्यासह काही शहरांमध्ये ऐनवेळी ढगांचा पडदा दूर झाल्याने नागरिकांना पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या सावलीत जाताना पाहण्याचा आनंद लुटता आला. हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसले.
दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ग्रहणाचे वेध लागले होते. रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी ग्रहण प्रत्यक्ष सुरू होऊन चंद्रावर डावीकडून पृथ्वीची सावली पसरू लागली. साधारण रात्री ११.११ वाजता चंद्र पूर्णपणे झाकला गेला. रात्री १२.११ वाजेपर्यंत ही स्थिती कायम होती. त्यानंतर उत्तररात्री १.२९ मिनिटांनी ग्रहण संपून संपूर्ण चंद्र पुन्हा दिसू लागला. ग्रहण असल्याने गणेश विसर्जन मिरवणूक आज रात्री नऊ वाजेपर्यंतच संपविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्यानुसार राज्यभरातील, विशेषतः मुंबईतील मिरवणूक रात्री पावणेनऊच्या सुमारास संपली. राज्यात सध्या ढगाळ वातावरण असल्याने मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे आजचे ग्रहण दिसण्याबाबत साशंकता व्यक्त होत होती. ही शंका काही प्रमाणात खरी ठरल्याने काही ठिकाणच्या खगोलप्रेमींचा हिरमोड झाला. काही शहरांमध्ये मात्र नागरिकांना चंद्रग्रहण पाहता आले.